नवी दिल्ली : सबसिडी व्यवस्थेत सुधारणा करण्यास सरकार बांधील असून, ८३ लाख लोकांनी स्वेच्छेने एलपीजी सबसिडी त्यागली आहे, असे केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राज्यसभेत सांगितले.सबसिडीचा बोजा कमी करण्यासाठी सरकार किरीट पारीख समितीच्या शिफारशी स्वीकारणार का? या प्रश्नाला उत्तर देताना प्रधान म्हणाले की, पंतप्रधानांनी सधन वर्गाला एलपीजी सबसिडी सोडण्याचे आवाहन केले आहे. मागच्या वर्षी पंतप्रधानांनी ‘गिव्ह इट अप’ अभियान सुरू केले होते. त्यानुसार आजवर ८३ लाख लोकांनी स्वेच्छेने एलपीजी सबसिडीचा त्याग केला आहे. यात मध्यमवर्गीय लोकांचाही समावेश आहे. सबसिडी गरजूंसाठीच असावी, असा आमचा दृष्टिकोन असून सबसिडी व्यवस्थेत सुधारणा करण्याप्रती आम्ही बांधील आहोत.असा पुनरोच्चारही प्रधान यांनी केला. एलपीजी सिलिंडर सबसिडीत दिले जातात. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिलांच्या नावे सरकार तीन वर्षांत अत्यंत सवलतीत पाच कोटी एलपीजी जोडणी देणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
८३ लाख लोकांनी सोडली स्वेच्छेने एलपीजी सबसिडी
By admin | Updated: March 10, 2016 03:05 IST