Join us  

1 सप्टेंबरपासून बदलणार बँकांशी संबंधित 7 नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 9:30 AM

1 सप्टेंबर 2019पासून बँकेशी संबंधित अनेक नियम बदलणार आहे.

नवी दिल्लीः 1 सप्टेंबर 2019पासून बँकेशी संबंधित अनेक नियम बदलणार आहे. ज्याचा प्रभाव आपल्यावर सरळ सरळ पडणार आहे. एकीकडे बँकेच्या माध्यमातून घर खरेदी करणं स्वस्त होणार असलं तरी दुसरीकडे बँकेची वेळ बदलणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून घेतलेलं गृह कर्ज स्वस्त होणार आहे. अशा प्रकारचे बँकांचे 7 महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. 

  • 59 मिनिटांत मिळणार वैयक्तिक, वाहन आणि गृह कर्ज

कार आणि घर खरेदी करण्यासाठी 59 मिनिटांत आपल्याला आता कर्ज मिळू शकणार आहे. 1 सप्टेंबरपासून अनेक बँका नव्या सुविधा पुरवणार आहेत. बँकेकडून कर्ज घ्यायचे असल्यास अनेकांच्या फेऱ्या मारण्यापासून सुटका होणार असून, एका फेरीतच तुम्हाला कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे. सध्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना 1 कोटी रुपयांपर्यंत अवघ्या 59 मिनिटांत कर्ज देण्याची योजना एमएसएमई (MSME) पोर्टलवर सुरू आहे. तसेच भारतीय स्टेट बँक (एसबीआय), युनियन बँक ऑफ इंडिया आणि कॉर्पोरेशन बँक यांनी ही मर्यादा 5 कोटींवर वाढविली आहे. बँक ऑफ इंडियाने आता बरीच रिटेल कर्ज या श्रेणीत आणण्याची योजना तयार केली आहे. आणखी एक सरकारी इंडियन ओव्हरसीज बँक (आयओबी) देखील यासाठी तयारी करत असल्याचे समजते. 1 सप्टेंबरपासून 59  मिनिटांत ग्राहकांना गृह आणि ऑटोसाठी कर्जे मिळणार आहेत. 

  • SBIच्या ग्राहकांसाठी RLLRवर मिळणार कर्ज

SBIच्या माध्यमातून घर खरेदी करणं स्वस्त होणार आहे. एसबीआयनं गृह कर्जावरच्या व्याजदरात 0.20 टक्के कपात केली आहे. 1 सप्टेंबरपासून वाहन कर्जावरचं व्याजदर 8.05 टक्के होणार आहे. आरबीआयनं ऑगस्टमध्ये रेपो रेट कमी करून 5.40 टक्क्यांवर आणला आहे. 

  • 15 दिवसांत बँक जारी करणार किसान क्रेडिट कार्ड (KCC)

1 सप्टेंबरपासून किसान क्रेडिट कार्ड (KCC) तयार करणं आणखी सोपं होणार आहे. जास्त करून 15 दिवसांत बँकांकडून किसान क्रेडिट कार्ड जारी केलं जाणार आहे. केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बँकांना 15 दिवसांत क्रेडिट कार्ड देण्यास सांगितलं आहे.  

  • बँक ऑफ महाराष्ट्र लागू करणार नवे व्याजदर 

सार्वजनिक क्षेत्रात मोठी बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र रविवारपासून रिटेल कर्जाला रेपो रेटशी जोडणार आहे. त्यामुळे या बँकेच्या माध्यमातून कर्ज घेणं स्वस्त होणार आहे. बँकेनं रिटेल कर्जावरच्या व्याजदराला रेपो रेटशी जोडल्यानंतर याचा थेट फायदा ग्राहकांना होणार आहे. रेपो रेटशी कर्जाचे व्याजदर जोडल्यानं आरबीआय जेव्हा जेव्हा रेपो रेटमध्ये बदल करेल, तेव्हा तेव्हा त्याचा प्रभाव कर्जाच्या दरावर पडणार आहे. 

  • ...तर 1 सप्टेंबरपासून बंद होणार मोबाइल वॉलेट

पेटीएम, फोनपे आणि गुगलपे यांसारख्या मोबाइल अॅपचा जे युजर्स वापर करतात, त्यांना 31 ऑगस्टपर्यंत केवायसी करावं लागणार आहे. केवायसी पूर्ण न केल्यास 1 सप्टेंबरपासून मोबाइल वॉलेट काम करणं बंद करणार आहे. आरबीआयनं मोबाइल वॉलेट कंपन्यांना ग्राहकांचं केवायसी पूर्ण करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंतची मर्यादा दिली आहे. तरीही केवायसी न केल्यास आपलं वॉलेट बंद होणार आहे.   

  • एसबीआयनं फिक्स्ड डिपॉझिट दरांमध्ये केली कपात 

देशातली सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयनं फिक्स्ड डिपॉझिट आणि बल्क डिपॉझिटच्या व्याजदरांत कपात केली आहे. तसेच सेव्हिंग बँक खात्याच्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. 1 लाख रुपयांपर्यंत डिपॉझिट ठेवणाऱ्या ग्राहकाच्या सेव्हिंग अकाऊंटवर 3.5 टक्के व्याज मिळतं. तर बँकेनं रिटेल टर्म डिपॉझिटवर 0.1 टक्क्यापासून 0.5 टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. बल्क डिपॉझिट रेटमध्ये 0.3 पासून 0.7 टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. 

  • बँक उघडण्याचे नियम बदलणार

केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या बँकींग विभागाने सर्वच सरकारी आणि ग्रामीण भागातील सहकारी बँकांनी सकाळी 9 वाजताच बँक खुली करण्याचा प्रस्ताव दिला आहे. भारतीय बँकिंग असोसिएशनने ग्राहक सुविधांसाठी गठित केलेल्या उपसमितीच्या बैठकीत बँक उघडण्यासाठीच्या वेळेबाबतचे तीन प्रस्ताव दिले होते. त्यानुसार, सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत. दुसरा सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत आणि तिसरा पर्याय सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अशा वेळांत बँक ग्राहकांसाठी खुली करावी. त्यानंतर, सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेबाबत निश्चित करण्यात आल्याचे समजते. 1 सप्टेंबरपासून ही नवीन नियमावली लागू होणार आहे. याबाबतची सर्वच सरकारी प्रक्रिया पूर्ण झाली असून केवळ जिल्हास्तरावरील समन्वय समित्यांनी तीनपैकी एक वेळ निश्चित करायचा आहे. 

टॅग्स :बँक