सुहास सुपासे, यवतमाळमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने २०१३-१४ या आर्थिक वर्षात सुमारे ५७ कोटी रुपयांचा नफा मिळविला आहे. यामध्ये मंडळाचे भागधारक असलेल्या राज्य आणि केंद्र सरकारला प्रत्येकी दोन कोटी रुपयांचा लाभांश देण्यात आला. सरकारला लाभांश देणारे हे पहिले महामंडळ ठरले आहे. शेतमालाच्या साठवणुकीसाठी वखार महामंडळ शेतकऱ्यांना गोदामे उपलब्ध करून देते. यातून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाच्या सुरक्षिततेची हमी महामंडळाकडून देण्यात येते. चार वर्षांत गोदामांची एकूण क्षमता सहा लाख टनहून अधिक वाढली आहे. २००९ मध्ये ११ लाख टन इतकी क्षमता होती. गेल्या चार वर्षांत नवीन गोदामांची उभारणी करीत महामंडळाने साठवण क्षमता वाढविली. क्षमता वाढविण्याबरोबरच आॅनलाईन ट्रेडिंग योजना, कर्ज तारण योजना, साठविलेल्या मालाचा विमा उतरविणे अशा विविध प्रकारच्या योजना राबविल्या आहेत. त्याचा फायदा महामंडळाकडील गोदामातील साठा वाढण्यावर झाला आहे. राज्यात सध्या १७० वखार केंद्र असून, आणखी काही गोदामे उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. विदर्भात १५ नवीन गोदामांचे नियोजन आहे. महामंडळाने २०१४-१५ या आर्थिक वर्षात २५० कोटी रुपयांची उलाढाल केली असून ५७ कोटी रुपये निव्वळ नफा मिळविला आहे. उल्लेखनीय म्हणजे राज्य शासनाच्या मदतीशिवाय महामंडळाचे काम सुरू आहे.
वखार महामंडळाला ५७ कोटींचा नफा
By admin | Updated: August 5, 2015 22:52 IST