बार्सिलोना : चायना मोबाईल, वोडाफोन, भारती एअरटेल आणि सॉफ्ट बँकसह जगातील अनेक प्रमुख मोबाईल कंपन्यांनी सध्याच्या ४-जी तंत्रज्ञानाच्या पुढे झेप घेऊन ५-जी तंत्रज्ञान वापरात आणण्यासाठी हातमिळवणी केली आहे. त्यासाठी कंपन्यांनी जीटीआय २.0 या नावाने एक पंचवार्षिक कार्यक्रम येथे जाहीर केला आहे. भारती एअरटेलने अधिकृत निवेदन जारी करून या उपक्रमाची माहिती दिली. त्यात म्हटले आहे की, दूरसंचार क्षेत्रातील पाच प्रमुख कंपन्यांचे चेअरमन, सीईओ यांचे समर्थन आणि मार्गदर्शन यामुळे जीटीआय २.0 उपक्रम अधिकृतरीत्या सुरू झाला आहे. या पाच जणांत भारती इंटरप्रायजेसचे चेअरमन सुनील मित्तल, चायना मोबाईलचे चेअरमन शांग बिंग, सॉफ्टबँक समूहाचे चेअरमन मासायोशी सोन, केटीचे चेअरमन चांग-ग्यू हवांग आणि वोडाफोनचे सीईओ व्हिटोरिओ कोलाओ यांचा समावेश आहे. जीटीआय २.0 ही पंचवार्षिक योजना आहे. सध्या अस्तित्वात असलेले ४-जी तंत्रज्ञान जागतिक पातळीवर पोहोचविणे तसेच आगामी ५-जी प्रणालीचा विकास आणि सध्याच्या तंत्रज्ञानाशी त्याची सांगड घालणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. फेब्रुवारी २0११ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या जीटीआयसोबत १२२ कंपन्या आणि १0३ तंत्रज्ञान भागीदार आहेत.
जगभरातील प्रमुख पाच मोबाईल कंपन्यांची ५-जीसाठी हातमिळवणी
By admin | Updated: February 26, 2016 03:18 IST