Join us

रोज ३५० ट्रक कापूस गुजरातकडे

By admin | Updated: December 5, 2015 09:10 IST

महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातमध्ये कापसाचे भाव अधिक असल्याने दररोज सुमारे ३५० ट्रक कापूस गुजरातमध्ये पास होत आहेत. कापसाचे घटलेले उत्पादन लक्षात घेता संक्रांतीनंतर बाजारात

यवतमाळ : महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातमध्ये कापसाचे भाव अधिक असल्याने दररोज सुमारे ३५० ट्रक कापूस गुजरातमध्ये पास होत आहेत. कापसाचे घटलेले उत्पादन लक्षात घेता संक्रांतीनंतर बाजारात दरवाढ होण्याचे संकेतही दिले जात आहेत. कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडियाचे (सीसीआय) अकोला येथील महाव्यवस्थापक एस.के. सिंग यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. सिंग म्हणाले, राज्यात यावेळी ७५ लाख रुईगाठी बनतील एवढ्या कापूस उत्पादनाची अपेक्षा आहे. तरीही राज्याच्या बऱ्याच भागात कापसाचे पीक फसले आहे. जेथे कापूस पिकला तेथे सरासरी व गुणवत्ता घटली आहे. कापसाचा पेरा व उत्पादन घटल्याने बाजारात दरवाढीचे संकेत मिळत आहेत. संक्रांतीनंतर ही दरवाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातेत कापसाला अधिक भाव असल्याने दररोज ३०० ते ३५० ट्रक कापूस गुजरातमध्ये पाठविला जात आहे. त्यात सर्वाधिक ट्रक हे खान्देशातील आहे. मराठवाड्यात मात्र कापसाला कमी भाव आहे. पावसाअभावी तेथील कापसाची गुणवत्ताही कमी आहे. खामगावच्या कापूस बाजारात गेल्या १० वर्षांत सर्वाधिक भाव राहिला आहे. अकोला, बुलडाणा जिल्ह्णात कापसाचे उत्पादन कमी आहे. त्या तुलनेत जिनिंग प्रेसिंग व्यवसाय आणि फॅक्टरी मालकांची संख्या अधिक आहे. जिनिंग स्ट्राँग असल्याने तेथे भाव अधिक मिळतो. त्या तुलनेत यवतमाळ-अमरावती व अन्य जिल्ह्णात जिनिंग स्ट्राँग नसल्याने भावात फरक पडतो. सिंग म्हणाले, सीसीआयला कापूस बाजारातून बाद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सीसीआय-पणन महासंघ हटल्यास व्यापाऱ्यांना कमी भावात कापूस खरेदीचा मार्ग मोकळा होणार आहे. म्हणून सीसीआयच्या खरेदीत अप्रत्यक्ष अडचणी निर्माण केल्या जात आहेत. कापूस साठविण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध न करून देणे, खरेदी केलेल्या कापसाचे प्राधान्याने आणि वेगाने जिनिंग न करणे यासारखे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्णात शिंदोला, पांढरकवडा, मुकुटबन येथील कापूस खरेदी काही दिवसांसाठी बंद करावी लागत आहे. कापसाची आवक अधिक आणि जिनिंगचे प्रमाण कमी असल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. सीसीआयने आतापर्यंत ५० हजार गाठींचा कापूस खरेदी केला आहे. दरवर्षी आंध्र प्रदेशात कापूस नेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. मात्र यावर्षी तेलंगणा-आंध्र प्रदेशात कापसाचे भाव कमी असल्याने तिकडे जाण्यास शेतकरी तयार नाही. या उलट लगतच्या गुजरात राज्याकडे शेतकऱ्यांचा कल अधिक आहे. (प्रतिनिधी)