गजानन मोहोड , अमरावतीयंदाच्या हंगामात उशिरा पावसामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. नैराश्यापोटी यंदा शेतकरी आत्महत्या होऊ नयेत, यासाठी शेतकरी आत्महत्याप्रवण १४ जिल्ह्यांतील केशरी (एपीएल) कार्डधारक शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात धान्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयानंतर १५ ते ३० आॅगस्ट या कालावधीत विभागातील ५ लाख ९१ हजार ६२१ एपीएल शिधाधारक शेतकरी कुटुंबातील २० लाख ३७ हजार ८८१ सदस्यांना २ हजार ९०१ मेट्रिक टन धान्याचे वितरण करण्यात आले. औरंगाबाद, अमरावती तसेच नागपूर विभागातील वर्धा या १४ जिल्ह्यांमधील १ लाखाच्यावर उत्पन्न असणाऱ्या केशरी कार्डधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. १५ आॅगस्टला या जिल्ह्यांमधील पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना धान्य वाटून योजनेचा शुभारंभ केला व तालुका पातळीवर संबंधित आमदारांनी धान्य वाटपाचा शुभारंभ केला आहे. या योजनेत ३ रुपये प्रति किलो तांदूळ व २ रुपये प्रतिकिलो गहू शेतकरी कुटुंबातील सदस्याला प्रतिव्यक्ती प्रतिमहिना ५ किलोपर्यंत देण्यात येत आहे. लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ घेणारे लाभार्थी शेतकरी राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत इष्टांक मर्यादेत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट होऊ शकले नाहीत, अशा केशरी कार्डधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. अमरावती विभागात ३० आॅगस्टपर्यंत १,७४१ मे. टन गहू, ११२४ मे. टन तांदूळ असे एकूण २,८६७ मे. टन धान्याची भारतीय खाद्य निगमच्या गोदामातून उचल करण्यात आली होती. यापैकी २६५५ मे. टन धान्याचे वाटप करण्यात आलेले आहे.
६ लाख शेतकऱ्यांना २९०१ टन धान्य वाटप
By admin | Updated: August 31, 2015 22:27 IST