गजानन मोहोड, अमरावतीभरघोस उत्पादनासाठी बियाणे शुद्ध व दर्जेदार असावे लागते. सदोष व अप्रमाणित बियाणांमुळे उत्पादनात मोठी घट येते. त्यामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या मूलभूत बाबींचा विचार करून कृषी विभागातर्फे बीज परीक्षण प्रयोगशाळेत सन २०१४-१५ या वर्षात ३७,७४० बियाणांची आनुवंशिक शुद्धता, उगवणशक्ती व गुणवत्ता तपासणी करण्यात आली. यामध्ये ४८३७ नमुने हे नापास ठरविण्यात आले आहेत. सर्वाधिक सोयाबीन व कपाशीची पेरणी विभागात होते. कपाशीचे संकरित बियाणे हे सर्वात महाग आहे. त्यामुळे या बियाणांची शुद्धता पारखणे महत्त्वाचे ठरते. शेतकरी शेतातील बियाणे पुढील वर्षासाठी राखून ठेवतात. ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी साठवण केलेले बियाणे इतर शेतकऱ्यांनादेखील विकण्यात येते. मात्र या बियाणांचा दर्जा, प्रतवारी, गुणवत्ता प्रमाणित केलेली नसते. अशा बियाणांबाबत खात्री देता येत नाही. परस्पर विश्वासावर या बियाणांची खरेदी-विक्री होते. अशा बियाणांमुळे शेतकऱ्यांची फसगत होत असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बियाणांची तपासणी करून खातरजमा करणे महत्त्वाचे आहे. दर्जेदार, आनुवंशिक शुद्धता, गुणवत्ता असणारे बियाणे शेतकऱ्यांना बियाणे प्रमाणीकरण यंत्रणा व बीज परीक्षण प्रयोगशाळा पुणे, परभणी व नागपूर या ठिकाणी स्थापन करण्यात आल्या आहेत. तेथे प्रामुख्याने बियाणांची आनुवंशिक शुद्धता व उगवण्याची शक्ती तपासण्यात येते. कायद्यांतर्गत नियमांचे पालन करून काढलेल्या नमुन्यांची आवश्यकतेनुसार आनुवंशिक शुद्धता, बियाणातील आर्द्रता, ओलावा आदी बाबींची तपासणी करण्यात येते. या निकषावर कापूस बियाणांची तपासणी केली.
कपाशीचे २० हजार नमुने नापास!
By admin | Updated: February 27, 2015 00:07 IST