Join us

२० लाख टन डाळींचा राखीव साठा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2016 04:25 IST

बाजारातील चढ्या दरांवर नियंत्रण करणे शक्य व्हावे यासाठी डाळींच्या राखीव साठ्यात (बफर स्टॉक) वाढ करून तो २० लाख टन करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली.

नवी दिल्ली : बाजारातील चढ्या दरांवर नियंत्रण करणे शक्य व्हावे यासाठी डाळींच्या राखीव साठ्यात (बफर स्टॉक) वाढ करून तो २० लाख टन करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या आर्थिक बाबींविषयक समितीने ही मंजुरी दिल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे.डाळींचा राखीव साठा २० लाख टनांपर्यंत करावा असा प्रस्ताव ग्राहक व्यवहार विभागाने केला होता. देशांतर्गत बाजारांतून खरेदी करून आणि परदेशांतून आयात करून डाळींचा हा राखीव साठा केला जाईल, असेही या सरकारने स्पष्ट केले आले. कोणत्या प्रकारच्या डाळीचा किती व केव्हा साठा करायचा आणि त्यासाठी खरेदी केव्हा करायची याचा निर्णय देशी आणि विदेशी बाजारपेठांतील उपलब्धतेनुसार वेळोवेळी घेतला जाईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)