नवी दिल्ली : साठेखोरांकडून जप्त केलेली १.१२ लाख टन डाळ सरकारने खुल्या बाजारात पाठविली आहे. त्यामुळे भाव खाली येण्याची तसेच बाजारात उपलब्धता वाढण्याची शक्यता आहे. आॅक्टोबरात डाळींचा भाव २०० रुपये किलोवर गेला होता. सरकारने केलेल्या उपाययोजना व जप्त साठा खुल्या बाजारात आणल्यामुळे भाव १६० रुपयांपर्यंत खाली आला. कमी पावसामुळे २०१४-१५ हंगामात डाळींचे उत्पादन जवळपास २ दशलक्ष टनांनी कमी झाले. परिणामी तूर व उडीदसह इतर डाळींचे भाव गेल्या काही महिन्यांपासूनकडाडले. राज्य सरकारांकडून गुरुवारपर्यंत आलेल्या अहवालानुसार १ लाख १२ हजार ५४५ टन डाळ खुली करण्यात आली. त्यामुळे भाववाढ कमी होईल तसेच बाजारात डाळ उपलब्ध होईल, असे अधिकृत पत्रकात म्हटले आहे. पत्रकात म्हटले आहे की, साठ्यांवर मर्यादा घातल्यामुळे साठेबाजांकडून १ लाख ३१ हजार २९ टन डाळी जप्त करण्यात आल्या. जीवनावश्यक कायद्यानुसार प्रत्येक राज्याने त्यांच्याकडील डाळ बाजारात खुली करावी असे सांगण्यात आले आहे.
१.१२ लाख टन जप्त डाळ बाजारात
By admin | Updated: January 2, 2016 08:36 IST