Join us  

महाराष्ट्रातील 'या' सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेची कारवाई, ग्राहकांना पैसेही काढता येणार नाहीत; जाणून घ्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 8:44 AM

भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) सोमवारी खात्यातून पैसे काढण्यासह अनेक सेवांवर बंदी घातली. बँकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता रिझर्व्ह बँकेनं हे पाऊल उचललं आहे. पाहा काय म्हटलंय रिझर्व्ह बँकेनं?

महाराष्ट्रस्थित शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेची ढासळती आर्थिक स्थिती पाहता, भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) सोमवारी खात्यातून पैसे काढण्यासह अनेक सेवांवर बंदी घातली. शिरपूर मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता रिझर्व्ह बँकेनं हे पाऊल उचललं आहे. यामध्ये, सर्व बचत किंवा चालू खाती किंवा ठेवीदाराच्या इतर कोणत्याही खात्यातील एकूण शिल्लक रकमेमधून कोणतीही रक्कम काढण्याची परवानगी दिली जाणार नाही. दरम्यान, बँक ग्राहक रिझर्व्ह बँकेच्या या अटी व शर्तींनुसार त्यांच्या खात्यात जमा केलेल्या रकमेतून कर्जाची परतफेड करू शकतील. 

काय म्हटलं रिझर्व्ह बँकेनं? 

सोमवारी कामकाज बंद झाल्यानंतर ही सहकारी बँक कोणतंही नवीन कर्ज देऊ शकणार नाही किंवा कोणतीही गुंतवणूक करू शकणार नाही, असं रिझर्व्ह बँकेनं एका निवेदनात म्हटलं आहे. यासह, बँकेला रिझर्व्ह बँकेच्या पूर्वपरवानगीशिवाय तिची मालमत्ता किंवा मालमत्ता हस्तांतरित करण्याची परवानगी दिली जाणार नाही. 

ग्राहकांवर काय परिणाम होणार? 

आरबीआयनं म्हटलंय की पात्र ठेवीदारांना डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून ५ लाख रुपयांपर्यंतच्या दाव्याची रक्कम मिळण्यास पात्र असेल. ८ एप्रिल २०२४ रोजी व्यवसाय बंद झाल्यापासून शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेवर लादलेले निर्बंध सहा महिन्यांपर्यंत लागू राहतील. मात्र, या सूचनांचा अर्थ बँकेचा परवाना रद्द केलाय असा घेतला जाऊ नये, असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय. बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत बँक या कारवाईसह बँकिंग व्यवसाय सुरू ठेवेल असं त्यात म्हटलं आहे.

टॅग्स :बँकभारतीय रिझर्व्ह बँक