Join us

शेतकऱ्यांनो विषमुक्त अन्नासाठी परसबाग ठरेल तुमच्या आरोग्याला वरदान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 5:05 PM

ग्रामीण भागातील शेतकरी बांधव ज्यांच्याकडे मुबलक शेती उपलब्ध असुनही भाजीपाला आणण्यासाठी आठवडे बाजारात जावेच लागते आणि त्यामुळे होणारा खर्चही वेगळाच हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आजच्या लेखात आपण परसबागेतील विषमुक्त भाजीपाल्याबद्दल माहिती घेणार आहोत.

दिवसेंदिवस शहरी लोकांसोबत ग्रामीण भागातील लोकांना सुद्धा आजारांनी ग्रासले आहे. जीवनमान जगत असताना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातील एक समस्या म्हणजे रोजच्या आहारात विषमुक्त भाजीपाल्याची कमतरता, अपूर्ण माहितीच्या आधारे शेतकरी बऱ्याच अनावश्यक रसायनाच्या फवारण्या करत असतो.

फवारण्या केलेल्या भाज्या शेतातून २-३ दिवसात आहारात येत असतात त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो. तो कुठे तरी कमी व्हावा तसेच आपण शहरी लोकाचे एक वेळ समजू शकतो परंतु ग्रामीण भागातील शेतकरी बांधव ज्यांच्याकडे मुबलक शेती उपलब्ध असुनही भाजीपाला आणण्यासाठी आठवडे बाजारात जावेच लागते आणि त्यामुळे होणारा खर्चही वेगळाच हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आजच्या लेखात आपण परसबागेतील विषमुक्त भाजीपाल्याबद्दल माहिती घेणार आहोत.

घरालगत असलेल्या मोकळ्या जागेवर आणि सांडपाण्यावर आधारित उपयुक्त भाजीपाल्यांची बाग म्हणजे परसबाग होय. परसबाग करताना आपला हेतु असतो तो आपल्या रोजच्या खाण्यामध्ये आवश्यक असलेला भाजीपाला काढणे, यात कमीत कमी जागेत जास्तीत जास्त प्रकारची भाजी कशी घेता येईल, याचा विचार करून जागेचे नियोजन करावे हे नियोजन करताना सर्वप्रथम आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यानुसार भाजीपाला पिकांची निवड करावी लागते.

अधिक वाचा: खड्डा पद्धतीने घरच्या घरी कंपोस्ट खत कसं बनवायचं

भाजीपाल्याची लागवड करावयाची असल्यास त्यास चार ते सहा इंच खोली पुरेशी होते, पालक, मेथी, कोथिंबीर, शेपू अशा पालेभाज्यांची लागवड करताना बियाणे किंवा देठाची लागवड केली तरी चालते. एकदा बियाणे अंकुरले व त्यांना पाने फुटली की ती कापून घ्यावीत खोडे तसेच जमिनीत ठेवातीत. पुन्हा वीस ते पंचवीस दिवसांत त्यास नवीन फूटवा येतो व आपल्याला भाजी मिळते.

फळभाजी रोपांची लागवड साधारणत: सायंकाळी करावी म्हणजे रात्रभरात ती मूळ धरतात. शक्य झाल्यास त्यांना सुरुवातीला दोन-तीन दिवस अर्ध ऊन-सावलीत ठेवावीत म्हणजे तग धरतात. वांगी, मिरची आदी फळवर्गीय भाज्यांना फळ येऊन गेली की ते महिनाभराचा विसावा घेतात व पुन्हा फळे येतात. झाड जुनं झालं की त्यास खोडापासून चार इंचांवर छाटावे त्यास पुन्हा बहर येतो. 

विविध वेलवर्गीय भाज्या वाफा लागवड पद्धतीत छान बहरतात या पद्धतीत वाल आणि त्याचे विविध प्रकार, कारलं, डांगर, देवडांगर, भोपळा, दोडके, पडवळ, काकडी, तोंडली, चवळी यांचीही लागवड करता येते.

महेश रुपनवर तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मा दौंड