Join us

मंगळवेढा 'ज्वारीचं कोठार', इथल्या मालदांडी ज्वारीची ही रंजक गोष्ट तुम्हाला माहित आहे का?

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 15, 2024 1:26 PM

मंगळवेढ्यात एकदा दुष्काळानं टोक गाठलं. लाेकांची अन्नान दशा झाली. मग दामाजी पंतांनी असं काय केलं की पंचक्रोशीत हे गाव लोकप्रीय झालं..

दक्षिणगंगा समजल्या जाणाऱ्या भीमा काठचा सपाट प्रदेश. सूपीक काळीभोर जमीन. ज्वारीचं कोठार म्हणून प्रसिद्ध असलेली मंगळवेढ्याची नगरी विठ्ठलाच्या पंढरपूरापासून अवघ्या २३ किमीच्या अंतरावर. त्यामुळं संतांची भूमी म्हणूनही मंगळवेढ्याचं नाव झालं.

मंगळवेढ्याचा इतिहास तसा बराच जूना. शालिवाहन शके काळात  बाजारपेठ म्हणून गावची भरभराट झाली. त्यामुळे पुढे या भागात लोकवस्ती वाढू लागली.  वेगवेगळ्या राजांच्या अधिपत्याखाली हे गाव वैभवाच्या सगळ्या दंडकांवर खडे उतरले. 

काळी कसदार जमीन पण दूष्काळ पाचवीला पुजलेला. सुपीक काळ्या जमिनीचा सलग पट्टा असणारा हा प्रदेश. महाराष्ट्रात इथली जमीन वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते. म्हणूनच मंगळवेढ्याच्या  मालदांडी ज्वारीला भौगोलिक मानांकनही देण्यात आलं. नक्षीदार सुंदर दगडी शिल्प, सोन्या चांदीची नाणी, अशा अनेक पुरातन वस्तू उत्खननानंतर मंगळवेढ्यात सापडल्या. पुढे दामाजी पंतांचा मंगळवेढा म्हणून त्याला आणखी एक ओळख मिळाली. जी आजही अनेकांच्या तोंडी ही गोष्ट असते.

सोलापूर जिल्ह्यापासून ५५ किमी  मंगळवेढा तालुक्याला हजारो वर्षांपासून तीव्र दुष्काळाला सामोरं जावं लागलं आहे.बहामनी राजाच्या काळात या भागात मोठा दुष्काळ पडला होता. याला दुर्गाडीचा दुष्काळ असंही म्हटलं जातं. तब्बल १०० वर्ष हा दुष्काळ चालला. अन्नपाण्यावाचून लोक तडफडू लागली. अनेकजण गाव सोडून गेली..काहींनी मरणाला कवटाळलं. एकेकाळी वैभवशाली असलेलं हे गाव भकास झालं.

एकीकडे लोकांची अन्नान दशा झाली असताना दुसरीकडे सुलतानाची धान्य कोठारे मात्र तुडुंब भरलेली होती. लोक एक वेळच्या अन्नासाठी भीक मागत होती. या काळात दामाजीपंत मंगळवेढ्याचे तहसीलदार होते. त्यांना लोकांची ही अवस्था सहन झाली नाही. त्यांनी शासकीय गोदामे फोडली आणि ज्वारीची कोढारं मंगळवेढ्याच्या प्रजेला खूली करून दिली. ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली.

पंचक्रोशीतील लोक एक वेळचे जेवण मिळावे म्हणून मंगळवेढ्याच्या दिशेने शेकडो मैल पायपीट करू लागले. दामाजी पंतांच्या या दातृत्वाची खबर सुलतानाला लागलीच. त्यानं दामाजीपंतांना दरबारी बोलावलं आणि त्यांना बेड्या ठोकल्या. स्वत:ची पर्वा न करता दुष्काळात लोकांना अन्न देण्याची सेवा केल्यानं दामाजीपंताचं नाव मंगळवेढ्यासह पंचक्राशीत लोकप्रीय झालं.

 

टॅग्स :ज्वारीइतिहासअन्नसोलापूर