Join us

गांडूळ खत कसं तयार करायचंय? या सोप्या स्टेप्स फॉलो करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2024 5:37 PM

आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी गांडूळ खत उत्कृष्ट खत असून त्यावर भर देण्याची नितांत गरज आहे.

रासायनिक सुपीकता भौतिक व जैविक सुपीकतेमुळे बदलता येते. मात्र भौतिक सुपिकता बदलणे व टिकवणे अत्यंत अवघड गोष्ट आहे. त्यासाठी फार मोठा कालावधी लागतो. म्हणूनच सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर शेतीत केला पाहिजे. गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत असून त्यावर भर देण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे नेमकं गांडूळ खत कसं तयार करायचं, हे सोप्या शब्दांत पाहूया... 

गांडूळखत तयार करावयाचे टप्पे :

जागा निवडणे :

गांडुळखत निर्मितीसाठी योग्य जागा निवडणे. त्यासाठी सावली असणारी, पाण्याची सोय जवळ असणारी व गांडुळांना लागणारे खाद्य तेथेच उपलब्ध होऊ शकणारी जागा शक्यतो निवडावी.

सुका, ओला कचरा निवडणे :

सुका, कोरडा कचरा निवडून घेवून त्यातील असेंद्रिय पदार्थ उदा. काटे, काचा, कॅरीबॅग, लोखंडी भंगार, प्लास्टीकच्या वस्तू इ. बाजुला काढाव्यात. फक्त कचरा एका वर एक थर लावून त्यात मधोमध, जागोजागी शेणाचा थर द्यावा किंवा शेणाचा सडा टाकावा व पाणी मारुन ओला करुन ठेवावा.

शेणाचा थर देवून सहा टाकणे :

खत निर्मितीच्या चारही प्रकारात सारख्याच पद्धतीचा वापर केला जातो. सुरुवातीला अर्धवट कुजलेल्या कचऱ्याचा एक मीटर रुंदीचा, ६ इंच जाडीचा थर लावावा. लांबी आपल्या सोईनुसार ठेवावी, शेणाची स्लरी किंवा पाणी त्यावर मारावे. पुन्हा त्यावर कचरा व नंतर शेणाचा थर अशा प्रकारे दोन ते अडीच फुटापर्यंत उंची घ्यावी व नंतर सर्व बेडवर सर्व बाजुंनी शेणाची स्लरी किंवा शेणाचे पाणी मारावे.

गांडुळ सोडणे :

बेडवर सोडावयाची गांडुळे मोकळी करुन एकत्र सारख्या प्रमाणात तुटक तुटक सोडावेत. बेडवर गांडुळे सोडल्यानंतर काही क्षणात ते आत शिरतील व नाहीसे होतील. बेडवर मुंग्या, उधी असे दिसल्यास त्यावर हळद पावडर किंवा हळदीचे पाणी मारावे. बेडमध्ये हात घालून तापमान वाढले आहे का ते तपासावे. तापमान जास्त असल्यास त्यावर गार पाणी दोन ते तीन वेळेस मारावे.

रोज इएम पाण्याची फवारणी व शेणसडा करणे :

गांडुळ सोडल्यानंतर खत निर्मिती लवकर होण्यासाठी व गांडुळाचे कार्य सोपे होण्यासाठी बेडवर इएम (इफेक्टीव्ह मायक्रो ऑरगॅनिझम) ची फवारणी करावी व शेणाचे पाणी करून मारावे. त्यामुळे अर्धवट व न कुजलेले पदार्थ लवकर कुजण्यास मदत होईल व गांडुळाचे कार्य सोपे होईल. तसेच शेणाच्या पाण्यामुळे सेंद्रिय पदार्थ खाण्यायोग्य होईपर्यंत गांडुळांची उपासमार होणार नाही. ते तब्येतीने चांगले राहतील.

खत चाळून गांडुळे वेगळी करणे :

गांडुळे २४ तासात अंदाजे २० वेळा ये-जा करीत असतात व त्यांच्या वजनाच्या पटीत ते खत तयार करीत असतात. त्यामुळे त्यांनी वर येवन टाकलेली विष्ठा जेवढी जास्त असेल त्यावर त्यांची तब्येत चांगली आहे, असे समजावे. तसेच खत चाळण्या अगोदर २ ते ४ दिवस पाण्याचा ताण द्यावा व नंतर खत वाळुच्या चाळणीने चाळावे. चाळणीच्या वरील बाजूस गांडुळे जमा होतील, खालील बाजुस चहापत्तीसारखे तयार खत मिळेल. ते जमा करून थंड ठिकाणी ठेवावे व नंतर जमल्यास तयार खतावर रोज पाणी मारुन ओले ठेवावे. त्यात अंड्यातून बाहेर येणारी गाडुळे १५ ते २० दिवसात मिळू शकतील, ती वेचन घ्यावी व पुन्हा बेडवर सोडावीत.

या सर्व बाबींचा उपयोग करून गांडुळखताच्या वापरामुळे उत्पादनात गुणात्मक वाढ झाल्याचे दिसून येते. तेव्हा भविष्यातील शेती कमी खर्चाची, बिन कर्जाची, अधिक उत्पन्नाची करावयाची असेल, शाश्वत संजीवनी करायची असेल तर या कृषि मित्र गांडुळाचा शेती उद्योगात सक्रिय सहभाग वाढविणे ही आजची गरज आहे.

स्रोत : महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी 

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :शेतीसेंद्रिय शेतीसेंद्रिय भाज्याखते