Join us

कर्ज वाटपात हात आखडता घेऊ नका, बँकांना प्रशासनाचे आवाहन  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2024 12:19 PM

शेतकऱ्यांना कर्ज वाटप करताना हात आखडता घेऊ नका, असे आवाहन ठाणे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जापोटी १२० कोटी रुपयांचे वितरण करणे अपेक्षित असताना कर्ज वाटपात जिल्ह्यातील बँका कमी पडल्याबद्दल जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी बँकांच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. पात्रताधारकांची कर्ज प्रकरणे प्रलंबित न ठेवता तातडीने मंजुरी देण्यास त्यांनी सांगितले. यापुढे ज्या बँका जिल्हा प्रशासन आणि पात्र लाभाथ्यर्थ्यांना सकारात्मक प्रतिसाद देणार नाहीत, त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, अशा कडक शब्दात त्यांनी बँक अधिकाऱ्यांना तंबी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली बँकाच्या डी. एल. सी. सी. व डी. एल. आर. सी.ची बैठक पार पडली. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जासह गरजू व युवा उद्योजकांना वाटप झालेल्या कर्ज पुरवठ्याचा आढावा घेतला. दिलेल्या उद्दिष्टापेक्षा कर्जपुरवठा कमी म्हणजे ७६ टक्के झाल्याचे निदर्शनात आले.

फेब्रुवारीपर्यंत दिलेली उदिष्ट्ये पूर्ण करा!

२८ फेब्रुवारीपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना दिले. या बैठकीला जिल्हा अग्रणी बँक अधिकारी नागेंद्र मंचाल, रिझर्व बँकेचे अधिकारी अरुण बाबू, नाबार्डचे सहायक महाप्रबंधक सुशांत कुमार, उद्योग विभाग कोकण विभागाचे सहसंचालक विजू शिरसाठ, तसेच सर्व राष्ट्रीयकृत बँकेचे मुख्याधिकारी शिवाय काही खाजगी बँकांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

सर्व बँकांनी प्राथमिकता क्षेत्रातील कर्ज वाटप वाढवावे, पीएम स्वनिधीचे ठाणे जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे, मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेंतर्गत बँकानी उद्दिष्ट पूर्तीसाठी विशेष प्रयत्न करावेत व जास्तीत जास्त अर्जदारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हातभार लावावा, जनधन योजनेंतर्गत कातकरी समाजाच्या जास्तीत जास्त लोकांची खाती उघडावीत, शिवाय पात्र कातकरी बांधवांना केसीसी कर्ज द्यावे, जिल्हा प्रशासनाने बँकाकडे मागितलेली माहिती वेळच्या वेळी द्यावी, असे स्पष्ट निर्देश बैंक अधिकाऱ्यांना दिले.

असा आहे कर्जाचा तपशील

दरम्यान 449 कोटी 51 लाखांचे पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी 326 कोटी 73 लाखांचे डिसेंबर अखेर कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचं सांगण्यात आला आहे. जवळपास 33 हजार 181 शेतकऱ्यांना डिसेंबर अखेर वाटप करण्यात आला आहे तर 120 कोटी 78 लाख कर्जाचे आज पर्यंत वाटप झालेले नाही, अशी माहिती समोर येत आहे.

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :शेतीठाणेपीक कर्जपीक विमा