Join us

शेतीत रसायनांचा वापर वाढतोय? कृषी रसायनांचा उद्योग ९ टक्के वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 12:21 PM

कृषीप्रधान देश असलेल्या भारतातून आगामी काळात कृषी रसायने आणि औषधींच्या निर्यातीला मोठा वाव असणार आहे. त्यामुळे हा उद्योग १४ अब्ज डॉलर इतका मोठा होण्याची शक्यता आहे.

बदलते हवामान, उत्पादकता वाढीची गरज यातून शेतीसाठी रसायनांचा वापर दिवसेंदिवस वाढत असून येणाऱ्या काळात त्यात ९ टक्के दराने वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यातही भारतापेक्षा जगातील इतर कृषी प्रधान देशांत रसायनांचा वापर वाढत आहे. त्यामुळे भारताची कृषी रसायने निर्यात क्षेत्रातही वाढ होत आहे. 

येणारे वर्ष २०२५ ते २०२८ या काळात ही वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज रुबिक्स डेटा सायन्सेस या कंपनीने वर्तविला आहे. एका संकेतस्थळाने यासंदर्भात वृत्त दिले आहे. त्यानुसार देशातील कृषी रसायन उद्योगाचा आकार सध्या १०.३ अब्ज डॉलर इतका असून आगामी काळात तो वाढत जाऊन आर्थिक वर्ष २०२८ मध्ये तो १४.५ अब्ज डॉलर इतका होऊ शकतो.

दरम्यान या अहवालात म्हटल्याप्रमाणे कृषी २०१९ ते २०१३ या काळात देशाची कृषी रसायन निर्यात १४ टक्क्यांनी वाढली आहे. कृषी रसायन क्षेत्रात, तणनाशके निर्यातीत देशात 23 टक्के इतकी जलद वाढ झाली आहे. याच कालावधीत, एकूण कृषी रासायनिक निर्यातीतीत वनस्पतीजन्य औषधी उत्पादनांचा वाटा 31 टक्क्यांवरून 41 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

भारताचा देशांतर्गत कृषी रासायनिक वापर सध्या केवळ ०.६ किलो प्रति हेक्टर आहे, आशियाई सरासरीचा एक अंश (३.६ किलो/हेक्टर) आणि जागतिक सरासरीच्या फक्त एक चतुर्थांश (२.४ किलो/हेक्टर). या कमी वापरामुळे येत्या काही वर्षांत कृषी रसायने बाजाराच्या विस्ताराची देशाची अफाट क्षमता दिसून येते ज्यामुळे उद्योग वाढीसाठी सुपीक जमीन उपलब्ध होईल.”

असे असले तरी जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि चीनसारख्या प्रस्थापित देशांतील कंपन्यांकडून वाढता स्पर्धात्मक दबाव, तसेच हवामान बदलामुळे हे कृषी रसायने निर्यात आणि वापर यांचे समीकरण आणखी गुंतागुंतीचे झाले आहे. हे एक मुख्य आव्हान भारतीय कृषी रसायन उद्योगापुढे असणार आहे. तसेच अनियमित मान्सूनमुळे शेतीचे स्वरूप आणि पीक उत्पादनावर परिणाम होत असून तेही एक प्रमुख आव्हान असेल.

टॅग्स :कीड व रोग नियंत्रणशेती