Sanjay Raut: शिवसेना भवनावरुन संजय राऊत थेट उद्धव ठाकरेंच्या भेटीला; दीड तास चर्चा अन् इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 08:55 PM2022-02-15T20:55:40+5:302022-02-15T21:13:15+5:30

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन ईडी आणि भाजपवर गंभीर आरोप केले.

शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला एक मंत्र दिला. तो आयुष्यभराचा मंत्र आहे. 'तू काही पाप केलं नसशील, गुन्हा केला नसेल तर कुणाच्या बापाला घाबरू नका'...आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही याच पद्धतीने ही शिवसेना पुढे घेऊन जात आहेत, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

संजय राऊत म्हणाले की, भाजपाचे किरीट सोमय्या ईडीचे दलाल आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. तसेच मुलुंडचा दलाल पत्रकार परिषद घेऊन सांगतो की कुणाच्या घरावर धाडी पडणार, अशी टीकाही संजय राऊतांनी यावेळी केली. त्याचप्रमाणे किरीट सोमय्या ईडीच्या कार्यालयात बसून दही-खिचडी खात असतो, असा दावा देखील संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला.

तसेच सध्या फक्त ट्रेलर आहे, पुढील काळात काही व्हिडीओ समोर आणणार, असा इशारा देखील संजय राऊत यांनी यावेळी केला. तसेच आज आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद असल्यासारखं वाटतंय. आजची पत्रकार परिषद ईडी, सीबीआयसह देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री देखील बघत असतील, असं संजय राऊतांनी म्हटलं.

माझ्या निकटवर्तीयांना मध्यरात्री त्रास दिला गेला. त्यांच्या घरी ईडीचे अधिकारी पोहोचले. त्या रात्री मी अमित शाहांना कॉल केला होता. मला तुमच्याबद्दल अतिशय आदर आहे. माझ्याशी दुश्मनी आहे, तर मला अटक करा. माझे नातेवाईक, मित्र, निकटवर्तीय त्यांना का टॉर्चर करता?, असा सवाल मी त्यांना विचारला होता, असं राऊतांनी सांगितलं.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा अजून एक फ्रंटमॅन आहे त्याचे नाव मोहित कंबोज आहे. तो फडणवीसांना डुबवणार आहे. पत्रा चाळ जमिनीत कंबोजचा पैसा आसून पीएमसी बॅंक घोटाळ्याचा पैसा त्यात लागला आहे. राकेश वाधवान त्यांच्याकडून केबीजी ग्रुपनं १२ हजार कोटींची जागा १०० कोटींना घेतली. अनेक व्यवसाय कंबोजच्या केबीजी ग्रुपचे, पैसे कुठून आलेत याच माहिती फडणवीसांना माहिती आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपाचे काही प्रमुख लोक मला भेटले आणि त्यांनी मला सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडण्यास सांगितलं. आमची संपूर्ण तयारी झाली आहे. राष्ट्रपती राजवट आणू अन्यथा आमदार फोडू पण सरकार आणू असं मला सांगितलं गेलं. तुम्ही आम्हाला मदत केली नाही तर तुम्ही केंद्रीय तपास यंत्रणा टाईट करतील अशा धमक्या दिल्या जात असल्याचं संजय राऊत म्हणाले. तसंच माझ्या जवळच्या लोकांवर रेड सुरू झाल्यानंतर मी अमित शाह यांना फोन केला होता आणि त्यांनाही सांगितलं की माझ्याशी दुष्मनी असेल तर मला पकडा पण माझ्या जवळच्या लोकांना त्रास देऊ नका, असंही संजय राऊत म्हणाले.

शिवसेना भवनावरील पत्रकार परिषद झाल्यानंतर संजय राऊत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले होते. संजय राऊतांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत दीड तासांहून जास्त वेळ बैठक चालली होती. पत्रकार परिषदेत मांडलेल्या मुद्यावर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीमध्ये जी काही चर्चा झाली आहे, त्याचे फलीत दोन दिवसांमध्ये दिसणार आहे, असं सूचक विधानही संजय राऊत यांनी केलं आहे.