Maharashtra Election 2019 : ठाण्यात चार मतदारसंघांत युतीपुढे बंडखोरांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 04:20 AM2019-10-09T04:20:46+5:302019-10-09T04:24:59+5:30

जिल्ह्यातील सहापैकी पाच महापालिकांमध्ये युतीची सत्ता आहे.

Maharashtra Election 2019: Rebels challenged in four constituencies in Thane | Maharashtra Election 2019 : ठाण्यात चार मतदारसंघांत युतीपुढे बंडखोरांचे आव्हान

Maharashtra Election 2019 : ठाण्यात चार मतदारसंघांत युतीपुढे बंडखोरांचे आव्हान

Next

- नारायण जाधव

ठाणे जिल्ह्यात विधानसभेचे १८ मतदारसंघ असून जागावाटपात शिवसेना आणि भाजपाच्या वाट्याला नऊनऊ जागा आल्या आहेत. मात्र, कल्याण पूर्वसह पश्चिम, बेलापूर आणि मीरा-भार्इंदर या चार मतदारसंघांत बंडखोरांनी युतीची डोकेदुखी वाढविली आहे.
ठाणे जिल्हा हा युतीचा बालेकिल्ला असून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंब्रा-कळवा अन् भिवंडी ग्रामीण वगळता सर्वच विधानसभा मतदारसंघांत युतीला मोठे मताधिक्य मिळाल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे वजन वाढले आहे.
जिल्ह्यातील सहापैकी पाच महापालिकांमध्ये युतीची सत्ता आहे. नवी मुंबई ही राष्ट्रवादीची सत्ता असलेली एकमेव महापालिकाही गणेश नाईकांच्या भाजपप्रवेशामुळे भाजपकडे आली आहे. भिवंडीत शिवसेनेने काँगे्रसचा हात पकडून तेथील महापालिकेत सत्तेच्या मलईत खारीचा वाटा उचलला आहे.
जिल्ह्यात पुरस्कृत अपक्ष मिळून भाजपचे आठ, शिवसेनेचे सहा आमदार, तर राष्ट्रवादीचे मुंब्रा-कळवा, उल्हासनगर, ऐरोली आणि शहापूर असे चार आमदार होते. त्यातील ऐरोलीचे संदीप नाईक यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून भाजपात प्रवेश केला आहे. पाठोपाठ त्यांचे वडील माजी मंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबई महापालिकेतील ४२ नगरसेवकांसह भाजपात प्रवेश केला आहे. सध्या जिल्ह्यात काँगे्रस-राष्ट्रवादीकडे मुंब्रा-कळवा वगळता कुठेच तगडा उमेदवार मिळालेला नाही. युतीच्या जागावाटपात नवी मुंबईतील बेलापूर आणि ऐरोली या दोन्ही जागा भाजपच्या वाट्याला गेल्या आहेत. मात्र, बेलापूरमधून गणेश नाईकांना डावलून पक्षाने विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांनाच उमेदवारी दिल्याने शेवटच्या क्षणी ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी तिकीट नाकारून आपल्याजागी वडील गणेश नाईकांना उभे केले आहे. उल्हासनगरात भाजपात गेलेल्या ज्योती कलानी यांनी तिकीट नाकारल्याने परत राष्ट्रवादीत उडी मारली आहे. शहापुरात राष्ट्रवादीने शिवसेनेचे माजी आमदार दौलत दरोडा यांना, तर शिवसेनेने राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार पांडुरंग बरोरा यांना उमेदवारी दिली आहे. मीरा-भार्इंदरमध्ये माजी महापौर गीता जैन यांनी बंडखोरी करून नरेंद्र मेहता यांची डोकेदुखी वाढविली आहे. तर, मोदी सरकारच्या धोरणांमुळे भिवंडीत आघाडीला लॉटरी लागू शकते.

प्रचारातील प्रमुख मुद्दे
१) ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीसह मीरा-भार्इंदरमध्ये युतीत नाराजी
२) अंबरनाथमध्ये काँगे्रस-शिवसेना आमनेसामने
३) जिल्ह्यात सर्वच शहरांत धोकादायक इमारतींचे पुनर्वसनासह पाणीटंचाई
४) बंद पडणारे उद्योग, बेरोजगारी, वाहतुकीसह वाढती प्रदूषणाची समस्या
५) ठाणे शहर, मुरबाडसह पाच ठिकाणी मनसेची राष्टÑवादीला टाळी

रंगतदार लढती
ठाणे शहरात राष्ट्रवादीचे सुहास देसाई यांनी माघार घेतली असून मनसेला पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे. आधीच असलेली शिवसेनेतील नाराजी अन् राष्ट्रवादीच्या माघारीमुळे आता ठाण्यात मनसेचे अविनाश जाधव विरुद्ध भाजपचे संजय केळकर अशी रंगतदार लढत होणार आहे.
बेलापूरमधून विजय नाहटांना तिकीट नाकारून ही जागा भाजपला सोडल्याने नाराज शिवसेनेचे शहरप्रमुख विजय माने यांनी बंडखोरी कायम ठेवल्याने येथे भाजपच्या मंदा म्हात्रे, राष्ट्रवादीचे अशोक गावडे आणि विजय माने अशी तिरंगी लढत.
कल्याण पश्चिमेत तिकीट नाकारल्याने शिवसेनेच्या विश्वनाथ भोईरांच्या विरोधात नरेंद्र पवार यांनी, तर कल्याण पूर्वेत भाजपचे गणपत गायकवाड यांना शिवसेनेचे धनंजय बोडारे अशी लढत.

Web Title: Maharashtra Election 2019: Rebels challenged in four constituencies in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.