''मला भाजपचेच आमंत्रण; स्वतःहून जात नाही''; नारायण राणेंचा पुण्यात गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 07:38 PM2019-09-21T19:38:36+5:302019-09-21T19:48:53+5:30
मी भाजपमध्ये स्वतःहून प्रवेश करण्यास जात नसून त्यांनी मला बोलावलं आहे असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला
![BJP Invite me : Narayan Rane | ''मला भाजपचेच आमंत्रण; स्वतःहून जात नाही''; नारायण राणेंचा पुण्यात गौप्यस्फोट BJP Invite me : Narayan Rane | ''मला भाजपचेच आमंत्रण; स्वतःहून जात नाही''; नारायण राणेंचा पुण्यात गौप्यस्फोट](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/narayan-rane_20171129292.jpg)
''मला भाजपचेच आमंत्रण; स्वतःहून जात नाही''; नारायण राणेंचा पुण्यात गौप्यस्फोट
पुणे : मी भाजपमध्ये स्वतःहून प्रवेश करण्यास जात नसून त्यांनी मला बोलावलं आहे असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला. पुण्यात आयोजित सातव्या पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलमध्ये 'युवर्स ट्रूली नारायण राणे' कार्यक्रमात ते बोलत होते. नारायण राणे यांनी नुकत्याच लिहिलेल्या 'झंझावात' या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या निमित्ताने पत्रकार राजू परुळेकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
पुढे ते म्हणाले की, माझा भाजप प्रवेश आणि मंत्रिपदही ठरले होते. मात्र शिवसेनेला मी नको असल्याने त्यांनी आडकाठी आणली.त्यांना माझी भीती वाटते. मात्र मी जाणार हे पक्के असल्याचेही स्पष्ट केले. यावेळी राणे यांनी शिवसेनेच्या सद्यःस्थितीवर टीका केली. ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे होते तोवर त्यांची पक्षावर पकड होती. ते प्रत्येक कार्यकर्त्याला नावानिशी ओळखायचे. आताची शिवसेना व्यावसायिक झाली आहे. शिवसेनेच्या आमदारांमध्ये वैचारिक नीतिमत्ता उरलेली नाही. मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होत असताना महापालिकेत टक्केवारी घेऊन कामे केली जात आहेत. पैसे देऊन आमदार, महापौर, नगरसेवक होता येते, हे शिवसैनिकांनाही आता माहिती आहे, त्यामुळे शिवसेनेचा वाघ आता राहिलेला नसून शेळ्या-मेंढ्या झाल्या आहेत.
त्यांनी काँग्रेसवरही सडकून टीका केली. ते म्हणाले की, काँग्रेसच्या पराभवाला नेते कारणीभूत काँग्रेसच्या पराभवाला त्यांचेच नेते कारणीभूत असून ते पक्ष तळागाळापर्यंत पोचला असतानाही लोकांपर्यंत गेले नाहीत. त्यात अध्यक्ष राहुल गांधी यांचा प्रभाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तुलनेत कमी आहे. अनेक नेत्यांनी पैशाने कामे करण्यास सुरुवात केली. त्या पक्षासाठी काही करावे अशी त्यांची नीतिमत्ता नाही अशा शब्दात त्यांनी फटकारले.