मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ! मोदी धक्कातंत्राचा वापर करणार; वसुंधरा, शिवराज उमेदवार नाहीत...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 07:42 PM2023-09-28T19:42:26+5:302023-09-28T19:48:02+5:30

या वर्षाच्या अखेरीस तेलंगाना, मिझोराम यांच्यासह मध्य प्रदेश राजस्थान, छत्तीसगढ अशा पाच राज्यांमध्ये निवडणूक होणार आहे.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल कधीही वाजणार आहे. या वर्षाच्या अखेरीस तेलंगाना, मिझोराम यांच्यासह मध्य प्रदेश राजस्थान, छत्तीसगढ अशा पाच राज्यांमध्ये निवडणूक होणार आहे. पैकी भाजपासाठी महत्वाच्या असलेल्या तीन राज्यांत मोदी धक्कातंत्राचा वापर करण्याची शक्यता आहे.

एमपीचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमन सिंह यांना पुन्हा संधी मिळणार नसल्याचे संकेत येत आहेत. त्यांच्याजागी दुसरा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी भाजपा शोधत असल्याचे दिसत आहे.

वसुंधरा या दोनवेळा राजस्थानच्या मुख्यमंत्री होत्या. रमन सिंह तीनवेळा छत्तीसगढचे मुख्यमंत्री होते. शिवराज सिंह सध्या मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. भाजपने तिन्ही राज्यात एकत्रित नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे या तिघांपैकी एकालाही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवले जाणार नाही. या तीन राज्यांमध्ये भाजप त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांचा शोध घेत आहे.

रमणसिंग यांना तिकीटच दिले न जाण्याची शक्यता आहे. छत्तीसगडमधील 21 जागांसाठी भाजपने उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र माजी मुख्यमंत्री रमणसिंग निवडणूक लढवणार की नाही याबाबत सस्पेंस कायम आहे.

शिवराज सिंह चौहान आणि वसुंधरा यांना मुख्यमंत्री चेहरे म्हणून प्रोजेक्ट केले गेले नाही. भविष्यातही ही शक्यता नाहीय. शिवराज सिंह चौहान आणि वसुंधरा विधानसभा निवडणूक लढवू शकतात पण त्यांना मुख्यमंत्री चेहरा बनविले जाणार नाहीय.

मध्य प्रदेशात तीन केंद्रीय मंत्र्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. यामुळे शिवराज सिंहांचा पत्ता कट झाल्याचे बोलले जात आहे. भाजपा राजस्थान आणि छत्तीसगडमध्येही हाच फॉर्म्युला वापरेल असा अंदाज बांधला जात आहे.

राजस्थानमध्ये भाजपने आपली निवडणूक टीम जाहीर केली तेव्हाही अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. यामध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि त्यांच्या समर्थकांना स्थान देण्यात आले नव्हते. तेव्हा भाजपाने वसुंधरा राजे प्रचार करतील असे सांगितले गेले आहे.