Poverty Crisis: वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मोठा दावा; 33 तास अन् १० लाख लोक, गरीबीचा प्रचंड वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 10:07 AM2022-05-23T10:07:55+5:302022-05-23T10:13:28+5:30

स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये जगभरातील धनकुबेर आणि शक्तीशाली लोक एकत्र आले आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची दोनवर्षांनी पहिल्यांदाच वार्षिक बैठक होत आहे. ऑक्सफॅम इंटरनॅशनलने खळबळ उडवून देणारा दावा केला आहे.

कोरोनाच्या संकटाने जगाला मोठी जखम दिली आहे, जी बरी करता करता नाकीनऊ येणार आहेत. कोरोना काळात दर तीस तासाला एक नवा अब्जाधीश जन्माला आला होता. परंतू, आता कोरोनाच्या लाटांनंतर जगातील गरीबीचा वेग हा लाखो पटींचा असणार असल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे.

स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये जगभरातील धनकुबेर आणि शक्तीशाली लोक एकत्र आले आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची दोनवर्षांनी पहिल्यांदाच वार्षिक बैठक होत आहे. ऑक्सफॅम इंटरनॅशनलने खळबळ उडवून देणारा दावा केला आहे.

दावोसमध्ये 'प्रॉफिटिंग फ्रॉम पेन' (Profiting from Pain) या शीर्षकाचा एक अहवाल जारी करण्यात आला आहे. या अहवालात ऑक्सफॅमने हा दावा केला आहे. गरजेच्या वस्तूंच्या किंमती गेल्या काही दशकांच्या तुलनेत वेगाने वाढल्या आहेत.

खाद्यान्न आणि उर्जा क्षेत्रांतील अब्जाधीश दर दोन दिवसांमागे एक अब्ज डॉलरने आपली संपत्ती वाढवत चालले आहेत. परंतू हीच नफाखोरी जगातील मोठ्या लोकसंख्येला मारक ठरणार आहे.

ऑक्सफॅमच्या या अहवालानुसार महामारी दरम्यान दर 30 तासांनी एक नवीन अब्जाधीश उदयास आला आहे. या दरम्यान एकूण 573 लोक नवीन अब्जाधीश झाले आहेत. आम्हाला भीती आहे की यावर्षी दर 33 तासांनी 10 लाख लोकांच्या दराने 26.30 कोटी लोक गरीबीच्या गर्तेत अडकणार आहेत.

ऑक्सफॅम इंटरनॅशनलच्या कार्यकारी संचालक गॅब्रिएला बुचर यांनी म्हटले की, जगभरातील अब्जाधीश परिवर्तनाचा उत्सव साजरा करण्यासाठी दावोस येथे येत आहेत. कोरोना महामारी, अन्न आणि ऊर्जेच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ त्यांच्यासाठी वरदान ठरली आहे. मात्र, यामुळे गेल्या कित्येक दशकांपासून करोडो लोकांना गरीबीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न फोल ठरणार आहेत. लाखो लोक जिवंत राहण्यासाठी महागाईचा सामना करत आहेत.

कोरोना संकटाच्या पहिल्या दोन वर्षांत अब्जाधीशांच्या संपत्तीत गेल्या 23 वर्षांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. जगातील अब्जाधीशांची एकूण संपत्ती आता जागतिक जीडीपीच्या 13.9 टक्के इतकी आहे. 2000 मध्ये ते 4.4 टक्के होते, जे तीन पटीने वाढले आहे.

हे अब्जाधीश हुशार आहेत किंवा कठोर परिश्रम करतात म्हणून पैसे कमवत नसून अतिश्रीमंत देशांनी आतापर्यंत केलेल्या हेराफेरीचा फायदा उठवत असल्याने श्रीमंत होत चालले आहेत. खाजगीकरण आणि मक्तेदारीमुळे त्यांनी मोठा हिस्सा बळकावला आहे आणि तो टॅक्स हेव्हन्स बनलेल्या देशांमध्ये लपविला आहे, असा गंभीर आरोप बुचर यांनी केला आहे.