दानवेंची 'मोहोब्बत' माझें 'इश्क' जालन्यात सुसाट !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 09:55 AM2019-10-12T09:55:19+5:302019-10-12T09:55:37+5:30

आगामी विधानसभा निवडणुकीत जालन्यातील आपल्या विजयात कोणताही अडथळा नसून आम्ही शंभरच्या स्पीडने सुसाट असल्याचं खोतकर यांनी म्हटले आहे.

Arjun Khotkar and raosaheb Danve relation vidhan sabha Election 2019 | दानवेंची 'मोहोब्बत' माझें 'इश्क' जालन्यात सुसाट !

दानवेंची 'मोहोब्बत' माझें 'इश्क' जालन्यात सुसाट !

Next

- राजा माने
जालना - भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध लोकसभा निवडणुकीपूर्वी सतत उमेदवारीचा शड्डू ठोकणारे व नंतर दानवेंच्याच आशिकीत रंगून गेलेले " इश्कबाज" आणि आताचे शिवसेनेचे उमेदवार अर्जून खोतकर म्हणतात,"आमच्या इश्कची गाडी सुस्साट आहे व दानवेंची "मोहोब्बत" कामी येत आहे.."

पहाटेच कार्यकर्त्यांच्या वर्दळीत आपल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला लागणाऱ्या अर्जून खोतकर यांनी आज सकाळी सात वाजता "लोकमत"च्या "टी विथ लीडर" कार्यक्रमात सहभाग नोंदला. आपल्या बिनधास्त आणि मिश्किल शैलीसाठी प्रसिध्द असलेल्या खोतकरांना "तुमची इश्कबाजी सुस्साट आहे पण विरोधक म्हणतात, मार्केट कमिटी आणि साखर कारखान्याच्या घोटाळ्याचे काय?"...असे म्हणताच खोतकर म्हणाले,"चौकशा झाल्या! मी कुठल्या व्यवहारात नाही आणि ते सिद्धही झाले आहे. आरोप करणाऱ्यांनी काय विकास केला ?"

जालन्यातील त्यांच्या निवासस्थानी अशाच अनेक प्रश्नांवर अर्जून खोतकर या कार्यक्रमात मनमोकळे पणाने बोलले. लोकसभा निवडणुकीच्या काळात अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातील अनबन महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली होती. परंतु, दोघांत समेट घडून आल्यानंतर खोतकरांचे इश्क आणि दानवेंची मोहोब्बत महाराष्ट्राला पाहायला मिळाली होती. आता तिच इश्कबाजी विधानसभा निवडणुकीत दिसेल, असा विश्वास जालना विधानसभा मतदार संघाचे शिवसेना उमेदवार आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला.

खोतकर यांनी दानवे यांच्यासोबत असलेल्या मैत्रीविषयी सांगितले. काही काळ आमच्यात दुरावा आला होता. परंतु, लोकसभा निवडणुकीत हा दुरावा कमी झाला. त्यावेळी मी त्यांच्या कामाला लागलो. आता ते देखील माझ्यासाठी विधानसभेला कामाला लागले आहेत. दानवे यांनी जिल्ह्याला पुढं नेण्याचं काम केल्याचे खोतकर यांनी नमूद केले.

विरोधकांवर जोरदार टीका करताना खोतकर यांनी जालन्यात शिवसेनेची गाडी सुसाट असल्याचे नमूद केले. तसेच जालना जिल्ह्याच्या विकासासाठी प्रत्येक क्षेत्रात कामं झाली आहेत. विरोधकांची अवस्था लहान बाळासारखी झाली आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपांना गांभीर्याने घेणे तितकेसे गरजेचे नाही. जालन्यात पाण्यासाठीची अडिचशे कोटींची योजना, आयसीडीसी कॉलेज, रेशीमकोष बाजारपेठ युती सरकारमुळेच आल्याचे ते पुढे म्हणाले.

दरम्यान जालना नगरपालिकेकडे बील भरण्यासाठी पैसे नव्हते. शिवसेना-भाजपमुळे नगरपालिकेची प्रतिष्ठा वाचली. अन्यथा विरोधकांची प्रतिष्ठा रस्त्यावर आली असती असं सांगताना खोतकर यांनी आपल्यावर आरोप करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले. आजपर्यंत आपल्यावर झालेल्या कोणत्याही आरोपात तथ्य आढळून आले नाही. सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे खोतकर म्हणाले.

आगामी विधानसभा निवडणुकीत जालन्यातील आपल्या विजयात कोणताही अडथळा नसून आम्ही शंभरच्या स्पीडने सुसाट असल्याचं खोतकर यांनी म्हटले आहे.

आदित्य ठाकरे यांचं नेतृत्व शाश्वत
आदित्य ठाकरे यांच नेतृत्व शाश्वत आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास असून महाराष्ट्र त्यांच्याकडे आशेने पाहत असल्याचे खोतकर यांनी नमूद केले. मी अनेकदा त्यांना जालन्यात बोलवले असून अनेक कार्यात ते आपल्या सोबत असल्याचे खोतकर म्हणाले.

 

Web Title: Arjun Khotkar and raosaheb Danve relation vidhan sabha Election 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.