‘एक दिवस शरद पवारांना देखील ‘पुतण्या’ आठवेल!’; गोपीनाथ मुंडेंची भविष्यवाणी खरी ठरली!

By नंदकिशोर पाटील | Published: April 24, 2024 11:44 AM2024-04-24T11:44:38+5:302024-04-24T11:47:11+5:30

भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले अजितदादा ‘टायमिंग’ साधतील का, हा खरा उत्सकतेचा विषय आहे.

'One day even Sharad Pawar will remember his 'nephew'!'; Gopinath Munde's prediction came true! | ‘एक दिवस शरद पवारांना देखील ‘पुतण्या’ आठवेल!’; गोपीनाथ मुंडेंची भविष्यवाणी खरी ठरली!

‘एक दिवस शरद पवारांना देखील ‘पुतण्या’ आठवेल!’; गोपीनाथ मुंडेंची भविष्यवाणी खरी ठरली!

छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्राच्या राजकारणात तसे अनेक ‘दादा’ लोक आहेत. पण सध्या चर्चा आहे एकाच दादांची ते म्हणजे, अजितदादा! राज्य मंत्रिमंडळात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रिपदाचा सांभाळण्याचा एक आगळा विक्रम नावावर असलेले अजित पवार सध्या काकांकडून पळविलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हावर लोकसभा निवडणुकीत उतरले आहेत. भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले अजितदादा ‘टायमिंग’ साधतील का, हा खरा उत्सकतेचा विषय आहे.

१३ जून २०१३ साली गोपीनाथ मुंडे यांचे एक भाषण औरंगाबाद (तेव्हाचे) शहरातील संत एकनाथ रंगमंदिरात झाले होते. व्यासपीठावर विलासराव देशमुख, आर. आर. पाटील, पृथ्वीराज चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. विनायकराव मेटे यांनी तो कार्यक्रम आयोजित केला होता. या समारंभात मुंडे यांनी जोरदार भाषण केले. हसून-हसून उपस्थितांची पुरेवाट झाली. विषय पुतण्याचा निघाला. त्यावर मुंडे म्हणाले, ‘हल्ली राज्यातील पुतणे मंडळींना काय झालेय हेच कळेना! जो तो उठतो आणि मला वेगळं व्हायचंय म्हणतो!’ गोपीनाथरावांच्या या वाक्यावर सभागृहात जो हशा आणि टाळ्यांचा कडकडाटा झाला, तो आजही एकनाथ रंगमंदिरात घुमतो आहे. मुंडे पुढे जे बोलले ते खूप म्हत्त्वाचे आहे. ते म्हणाले, ‘लिहून घ्या, एक दिवस शरद पवारांना देखील ‘पुतण्या’ आठवेल!’ गोपीनाथरावांची ही भविष्यवाणी अकरा वर्षांनंतर खरी ठरली! आज मुंडे असते, तर त्यांनी हा किस्सा नक्कीच ऐकवला असता.

असो. शरद पवार यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याच्या तालमीत वाढलेल्या, त्यांच्याकडूनच राजकारणातील डावपेच शिकलेल्या अजित पवारांनी आपल्या काकांवर नव्हे तर, राजकीय गुरूंवर असा डाव टाकला की, गुरूंची तालीम आणि तालमीतील बहुसंख्य शिष्यगण पळवले! शिवाय, तालमीला स्वत:चे नावही लावले. महाराष्ट्राच्या राजकारणात आजवर अनेकांनी बंड केले. मात्र, सर्वाधिक चर्चा झाली ती अजित पवारांच्या बंडखोरीची! का नाही होणार? महाराष्ट्रातील मुंडे, मोहिते, नाईक, निंबाळकर या सारखी मोठी घराणी फुटली तरी, पवार घराण्यात दुभंग निर्माण होईल आणि अजित पवार कुटुंबातून बाहेर पडतील, अशी कल्पना देखील कोणी केली नव्हती. पण भाजपच्या चाणक्यांनी डावपेच आखले आणि अजितदादांचे पाऊल उंबऱ्याबाहेर पडले!

पक्ष फोडल्याची बक्षिसी काय?
अजित पवार यांना राष्ट्रवादी फोडल्याची बक्षिसी म्हणून उपमुख्यमंत्रिपद आणि आठ मंत्रिपदं मिळाली. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात त्यांच्या वाट्याला केवळ पाच जागा आल्या आहेत. त्यातही परभणीची जागा रासपचे महादेव जानकर यांना गेली आहे, तर शिरूरमध्ये शिवसेनेचे आढळराव पाटील यांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी द्यावी लागली. उस्मानाबादमध्ये भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी द्यावी लागली. उरल्या फक्त दोन जागा. बारामती आणि रायगड. तिथे अनुक्रमे पत्नी सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे हे दोनच उमेदवार खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

नऊ आमदार, तरी जागा एकच
राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडल्यानंतर मराठवाड्यातील तब्बल नऊ आमदार (विधान परिषदेवरील दोघांसह) अजित पवार यांच्यासोबत गेले. बीडचे संदीप क्षीरसागर हे एकमेव आमदार शरद पवार यांच्यासोबत राहिले. वास्तविक, मराठवाडा हा शरद पवारांना मानणारा प्रदेश आहे. १९७८ साली पुलोद सरकार स्थापन केले तेव्हा माजलगावचे सुंदरराव सोळंके यांना उपमुख्यमंत्रिपद दिले होते. असे असताना या प्रदेशातील बहुसंख्य आमदार अजित पवारांसोबत गेले. मात्र आमदारांच्या संख्येच्या तुलनेत त्यांना मराठवाड्यात केवळ उस्मानाबादची जागा मिळाली. तिथेही उमेदवार आयात करावा लागला. वास्तविक, परभणीत त्यांच्याकडे राजेश विटेकर यांच्यासारखा सक्षम उमेदवार होता. मागील निवडणुकीत विटेकर यांनी चांगली लढत दिली होती. परभणीत वंचितचा उमेदवार नसता तर विटेकर विजयी झाले असते. मात्र, बारामतीत धनगर समाजाची मते मिळावीत म्हणून ही जागा आता रासपच्या महादेव जानकरांना देण्यात आल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज आहेत. बीडचे बजरंग सोनवणे यांनी अजितदादांची साथ सोडून शरद पवारांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळवली. बीडमधील अजितदादांच्या तीन आमदारांना भाजपचा प्रचार करावा लागणार आहे.

Web Title: 'One day even Sharad Pawar will remember his 'nephew'!'; Gopinath Munde's prediction came true!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.