यवतमाळ, राळेगाव, पुसदमध्ये शिवसेना ‘प्लस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 09:56 PM2019-05-24T21:56:08+5:302019-05-24T21:56:44+5:30

लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवार भावना पुंडलिकराव गवळी एक लाख १७ हजार ९३९ मतांची आघाडी घेऊन विजयी झाल्या आहेत. त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला आहे. भावनाताई पाचव्यांदा लोकसभेवर निवडून गेल्या आहेत.

Yavatmal, Ralegaon, Shivsena 'plus' in Pusad | यवतमाळ, राळेगाव, पुसदमध्ये शिवसेना ‘प्लस’

यवतमाळ, राळेगाव, पुसदमध्ये शिवसेना ‘प्लस’

Next
ठळक मुद्देलोकसभा निवडणूक : भावना गवळींना १ लाख १७ हजार मतांची आघाडी, मात्र दिग्रस, वाशिममध्ये लीड ‘मायनस’

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवार भावना पुंडलिकराव गवळी एक लाख १७ हजार ९३९ मतांची आघाडी घेऊन विजयी झाल्या आहेत. त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला आहे. भावनाताई पाचव्यांदा लोकसभेवर निवडून गेल्या आहेत.
गुरुवारी रात्री उशिरापर्यंत मतमोजणी चालली. त्यानंतर भावनातार्इंच्या विजयाची अधिकृत घोषणा करण्यात आली. शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात भावनातार्इंना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अजयकुमार गुल्हाने यांनी विजयाचे प्रमाणपत्र सोपविले. १९ लाखांपैकी ११ लाख ६० हजार मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैैकी सर्वाधिक पाच लाख ४२ हजार ०९८ मते शिवसेनेला मिळाली. या खालोखाल चार लाख २४ हजार १५९ मते काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी घेतली. वंचित बहुजन आघाडीचे प्रा. प्रवीण पवार ९४ हजार २२८ मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिले. भाजप बंडखोर पी.बी.आडे चौथ्या क्रमांकावर राहिले. त्यांना २४ हजार ४९९ मते मिळाली. प्रहारच्या वैशाली येडे यांना २० हजार ६२० मते प्राप्त करता आली. बसपाचे उमेदवार अरुण किनवटकर यांना अवघी नऊ हजार ५८७ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसच्या विजयाचे गणित बिघडविल्याचे मानले जाते.
काँग्रेसला राळेगाव, पुसद, वाशिम या विधानसभा मतदारसंघातून मोठी अपेक्षा होती. त्यातही राष्टÑवादी काँग्रेस व नाईकांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाºया पुसद विधानसभा मतदारसंघावर सर्वाधिक भिस्त होती. तेथून किमान ४० हजार मतांची आघाडी अपेक्षित धरली गेली होती. परंतु प्रत्यक्षात या मतदारसंघाने शिवसेनेला पाच हजार ८९५ मतांची आघाडी मिळवून दिली. पुसदमध्ये पहिल्यांदाच शिवसेनेला मतांची आघाडी मिळाली आहे. त्याचे श्रेय शिवसेना कार्यकर्त्यांच्या परिश्रमाला दिले जात आहे. या आघाडीमध्ये भाजपचे विधान परिषद सदस्य नीलय नाईक यांचाही मोठा वाटा असल्याचे सांगितले जाते.
काँग्रेसचा असाच अपेक्षा भंग राळेगाव व वाशिम मतदारसंघातसुद्धा झाला. २०१४ पेक्षा यावेळी राळेगावमध्ये शिवसेनेच्या मतांची आघाडी एक हजार मताने वाढली आहे. गतवेळी काँग्रेसचे जे प्रमुख चेहरे सेनेसोबत होते, ते यावेळी उघडपणे काँग्रेससोबत होते. मात्र त्यानंतरही त्यांना काँग्रेससाठी फार काही खेचून आणता आले नाही. काँग्रेसचे नेते, माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, नुकतेच काँग्रेसमध्ये एन्ट्री केलेले प्रवीण देशमुख यांचा मतदारांवर फारसा प्रभाव पडला नसल्याचे दिसून येते. वाशिमनेही पुन्हा सेनेलाच साथ दिली. केवळ तेथील मतांची आघाडी चार हजाराने घटली. शिवसेना नेते महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या दिग्रस विधानसभा मतदारसंघात शिवसेनेलाच आघाडी मिळाली असली तरी त्यात ८ हजार ५५७ ची घट झाली आहे. अर्थात ही मते काँग्रेसकडे वळल्याचे मानले जाते. या मतांमध्ये काही वाटा वंचित आघाडी व भाजप बंडखोराचाही असण्याची शक्यता आहे. माणिकरावांच्या गृह तालुक्यानेही त्यांना साथ दिली नाही. पालकमंत्री मदन येरावार यांच्या यवतमाळ विधानसभा मतदारसंघात २०१४ च्या तुलनेत शिवसेनेला आठ हजार ८७९ मतांची आघाडी अधिक मिळाली आहे. मुळात सर्व सहाही विधानसभा मतदारसंघात शिवसेनाच मतांच्या आघाडीत ‘प्लस’ राहिली आहे. काँग्रेसला पक्षांतर्गत गटबाजीचा फटका बसल्याचे मानले जाते. तर शिवसेनेच्या विजयामध्ये ‘मोदीच पाहिजे’ म्हणणाºया मतदारांचा वाटा अधिक आहे. भावनातार्इंनी आतापर्यंत मनोहरराव नाईक, हरिभाऊ राठोड, माणिकराव ठाकरे या सारख्या दिग्गजांना पराभूत केले आहे. त्यामुळे साहाजिकच त्यांचे राजकीय वजन वाढले आहे.

भावनाताई मंत्रिपदाच्या दावेदार
लोकसभेत सलग पाचव्यांदा निवडून गेलेल्या भावनाताई गवळी मंत्रिपदाच्या दावेदार मानल्या जात आहेत. शिवसेनेतून त्या एकमेव महिला खासदार आहेत. अनंत गिते, आनंदराव अडसूळ, चंद्रकांत खैरे, आढळराव पाटील हे प्रमुख ज्येष्ठ खासदार पराभूत झाल्याने आता ज्येष्ठतेत भावनाताई वरच्या क्रमांकावर आल्या आहेत. त्यामुळेही त्यांचे मंत्रिपद यावेळी पक्के असल्याचे मानले जाते. ‘मातोश्री’वर आपले वजन असल्याचे भावनातार्इंनी यापूर्वी अनेकदा संघटनात्मक फेरबदल करून दाखवून दिले आहे. त्यामुळे हे वजन यावेळी त्यांना मंत्रिपदी वर्णी लावून घेण्यात उपयोगी पडते का याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

२०१४ च्या तुलनेत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची मते ६४ हजार १९३ तर काँग्रेसची ४० हजार ७० ने वाढली आहे. मतदान झालेल्या ११ लाख ६० हजारमधील सर्वाधिक ४६.१७ टक्के मते शिवसेनेने मिळविली आहेत. तर काँग्रेसला ३६.१२ टक्के मते मिळाली आहेत. पोस्टल कर्मचाऱ्यांमध्येही शिवसेनेनेच सर्वाधिक मते घेतली. यावरून शासकीय कर्मचारी केंद्र व राज्य शासनातील भाजप आघाडी सरकारच्या कामकाजावर खूश असल्याचे स्पष्ट होते.

Web Title: Yavatmal, Ralegaon, Shivsena 'plus' in Pusad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.