कष्टिक पोशिंद्याच्या पोरांचेच पोट गेले खपाटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 05:00 AM2020-10-16T05:00:00+5:302020-10-16T05:00:23+5:30

उद्योगांची वाणवा असलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या २७ लाख लोकसंख्येच्या उदरभरणाचा जिम्मा प्रामुख्याने चार लाख ४२ हजार शेतकऱ्यांनी शिरावर घेतला आहे. हजारो शेतमजुरांच्या चुली याच पोशिंद्याच्या आसऱ्याने पेटत आहेत. आता सरकारी अनास्थेने या अन्नदात्याच्याच पोरांचे पोट खपाटीला गेले आहे. मागच्या वर्षी तुरी विकलेल्या अनेक कास्तकांना अजूनही पैसे मिळाले नाही. कितीही राबराबले तरी कापसाला भाव मिळत नाही. यंदा कापूस टाळून सोयाबीन पेरले तर पेरलेलेही उगवले नाही.

Hardworking Farmer's kids Hungry | कष्टिक पोशिंद्याच्या पोरांचेच पोट गेले खपाटीला

कष्टिक पोशिंद्याच्या पोरांचेच पोट गेले खपाटीला

Next
ठळक मुद्देकोरोनाने अनेकांचे ताट परावलंबी : साडेचार लाख शेतकऱ्यांवर २७ लाख लोकसंख्येचा भार, पण बेफाम जगणाऱ्यांना अन्नाच्या नासाडीची हौसच फार

 अविनाश साबापुरे
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : रस्त्यावरच्या भिकाऱ्यापासून तर एसी कारमधल्या कोट्यधीश उद्योजकापर्यंत साऱ्यांचाच दिवस उगवतो तो अन्नाच्या शोधात. कुणाला हात पसरावा लागतो, तर कुणाच्या घशात घास लोटावा लागतो.. पण ज्यांच्या कष्टातून अन्न उगवते, त्या शेतकऱ्यांच्या ताटातही यंदा तेलामिठाची सोय उरलेली नाही. कोरोनाने जगाला जेरीस आणले, थांबविले तेव्हा एकटा शेतकरी मात्र राबत होता. पण आता निसर्गाने त्याचाही घास हिरावलाय... शुक्रवारी जागतिक अन्न दिवस साजरा होत असताना पोशिंद्याच्या पोरांची अन्नान दशा मांडण्याचा हा प्रयत्न...
उद्योगांची वाणवा असलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या २७ लाख लोकसंख्येच्या उदरभरणाचा जिम्मा प्रामुख्याने चार लाख ४२ हजार शेतकऱ्यांनी शिरावर घेतला आहे. हजारो शेतमजुरांच्या चुली याच पोशिंद्याच्या आसऱ्याने पेटत आहेत. आता सरकारी अनास्थेने या अन्नदात्याच्याच पोरांचे पोट खपाटीला गेले आहे. मागच्या वर्षी तुरी विकलेल्या अनेक कास्तकांना अजूनही पैसे मिळाले नाही. कितीही राबराबले तरी कापसाला भाव मिळत नाही. यंदा कापूस टाळून सोयाबीन पेरले तर पेरलेलेही उगवले नाही. ४ एकरात सव्वाशे किलो बियाणे पेरले अन् उगवले केवळ ५० किलो... ही घाटंजीतील भयकारक परिस्थिती नुकतीच ह्यलोकमतह्णने उघडकीस आणली. रक्त आटवून अन्न पिकविणाऱ्यांचे हाल असताना, विलासी जगणाऱ्यांनी मात्र अन्नाची नासाडी चालविली आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या आकडेवारीनुसार भारतात ४० टक्के अन्न वाया जाते. तर १९ कोटी नागरिक कुपोषित आहेत. ही दुर्दैशा टाळण्यासाठी अन्नाच्या कणा-कणाचा उपयोग करणे आणि तो पिकविणाऱ्यांचा सन्मान राखणे आवश्यक आहे... सामान्य माणसाने व सरकारमधल्या असामान्य माणसानेही!

चवदार मिरच्या, लिंबाचे पोते, महागाचे तांदूळ फेकण्यात कसली धन्यता ?
मेहनतीने पिकविण्यात आलेल्या शेतमालाची सरकार किंमत करीत नाही अन् सामान्य माणसेही बावळटपणे तो माल फेकण्यात धन्यता मानतात. दुकानांमध्ये ह्यउतरवूनह्ण फेकलेल्या लिंबांचा, मिरच्यांचा पसारा यवतमाळच्या रस्त्यावर दिसतो. चवदार आणि आरोग्यदायक असलेली ही फळे केवळ अंधश्रद्धेपायी मातीमोल होतात. शहराचा विचार करता पोतंभर तरी माल असाच वाया जात आहे. लग्नसमारंभात तर ही उधळपट्टी मोठ्या प्रमाणात चालते. चुमडंभर महाग तांदळाच्या अक्षता फेकून नासविल्या जातात. तर बुफे जेवणात अर्धी भरलेली प्लेट डस्टबिनमध्ये निर्लज्जपणे टाकली जाते. कहर म्हणजे ह्यफोडणी जरा जमलीच नाहीह्ण असे ढेकर देत म्हणताना ना पोरीच्या बापाचा विचार होत नाही कास्तकाराचा!

लॉकडाऊनमध्ये भलेभले अन्नाला मोताद
कोरोनामुळे जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असताना भलेभले अन्नाला मोताद झाले होते. तेव्हा सामाजिक कार्यकर्त्यांनी धावपळ करीत हजारो लोकांच्या तोंडात घास पोचविला. धान्याच्या किट वाटप केल्या. सारेच उद्योगधंदे, दुकाने बंद असताना एकमेव शेतकरीच असा होता, जो लॉकडाऊनमध्येही अन्न उगविण्याच्या कामात व्यग्र होता. कारण लॉकडाऊननंतर बाजार उघडेलही, लोकांच्या खिशात पैसा येईलही.. पण बाजारात धान्यच आले नाही, तर जगणार कोण? या प्रश्नाचे उत्तर अन्नदात्याच्या घामातच आहे.

पोळीपेक्षा भाकरीवर जोर !
एकेकाळी ज्वारी हे जिल्ह्यातील प्रमुख उत्पादन होते. पण आता ज्वारीची लागवडच नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पूर्वी केवळ गरिबांच्याच ताटात दिसणाऱ्या भाकरीची आता गर्भश्रीमंतांनाही पोळीपेक्षा अधिक आस लागली आहे. पण माणसांनाच नव्हेतर ढोरांनाही ज्वारीचा कडबा मिळणे दुरापास्त झाले आहे. यासंदर्भात बोलताना कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नेमाडे म्हणाले, आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ज्वारीच्या उत्पादनावर भर द्यावा. कपाशीपेक्षा कमी खर्चात अधिक उत्पन्न यातून मिळू शकते. जनावरांच्या घटत्या संख्येलाही त्यामुळे आधार मिळेल. शिवाय ज्वारीची भाकर व इतर पदार्थ आरोग्यालाही पोषक आहेत. खाद्यतेलाची आयात करण्यामुळे देशाला बराच खर्च करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तेलवर्गीय पिकांची लागवड वाढवावी. विशेषत: तुरीला आता ६ हजारांचा हमीभाव जाहीर झाला आहे. रब्बीत करडई, जवस, तसेच उन्हाळी तिळाची लागवड फायदेशीर ठरू शकते.

Web Title: Hardworking Farmer's kids Hungry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.