तगड्या उमेदवारापुढे ‘बंगला’ डगमगतो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 05:00 AM2019-10-29T05:00:00+5:302019-10-29T05:00:19+5:30

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, मनोहरराव नाईक यांनी मागील निवडणुकीपर्यंत ‘बंगल्या’त राजकीयदृष्ट्या कोणाला प्रवेश दिला नाही. या घराण्यातील प्रत्येक उमेदवाराने अपवाद वगळता २५ हजारांहून अधिक मतांची आघाडी घेत विजयाची नोंद केली. पण, जेव्हा केव्हा बंगल्यातील उमेदवारांपुढे ‘भारी’ उमेदवारा उभा ठाकला तेव्हा त्यांचे मताधिक्य घटलेलेच आहे.

'Bungalow' stinks before strong candidates! | तगड्या उमेदवारापुढे ‘बंगला’ डगमगतो !

तगड्या उमेदवारापुढे ‘बंगला’ डगमगतो !

Next
ठळक मुद्देपुसद मतदारसंघात काठावर विजय : वर्षागणिकचा मताधार घटतोय

विलास गावंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लोकप्रियता म्हणा की आणखी काही. पुसद विधानसभा मतदारसंघात ‘बंगल्या’चा अर्थात नाईक घराण्याचा विजय जणू विधिलिखित आहे. मात्र जेव्हा केव्हा प्रतिस्पर्धी तगडा असतो तेव्हा ‘बंगल्या’च्या अढळ स्थानाला धोका तर पोहोचणार नाही ना, अशी हुरहुर समर्थकांमध्ये असते. १९९५ च्या विधानसभेत केवळ दोन हजार १५८ मताधिक्याने ‘बंगल्या’ची प्रतिष्ठा राखली होती. जनता दलाचे उमेदवार नरेंद्र मुखरे यांनी मनोहरराव नाईक यांना नाकीदम आणला होता. अशीच काहिशी परिस्थिती यावेळच्या निवडणुकीत दिसून येत होती. इंद्रनील नाईक नऊ हजार ७०० मताधिक्य घेत विजयी झाले. ‘बंगल्या’चा घटत चाललेला मताधार नाईक घराण्यासाठी चांगले संकेत नाही, असे म्हणायला मोठा वाव आहे.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, मनोहरराव नाईक यांनी मागील निवडणुकीपर्यंत ‘बंगल्या’त राजकीयदृष्ट्या कोणाला प्रवेश दिला नाही. या घराण्यातील प्रत्येक उमेदवाराने अपवाद वगळता २५ हजारांहून अधिक मतांची आघाडी घेत विजयाची नोंद केली. पण, जेव्हा केव्हा बंगल्यातील उमेदवारांपुढे ‘भारी’ उमेदवारा उभा ठाकला तेव्हा त्यांचे मताधिक्य घटलेलेच आहे. १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत जनता पार्टीचे वसंतराव पॉल हे सुधाकरराव नाईक यांना विजयापासून दूर ठेवतील असे वातावरण तयार झाले होते. त्यावेळी नाईक यांना ११ हजार ५२७ मतांच्या आघाडीने विजय नोंदविता आला.
बंगल्याच्या विजयाची मालिका १९९५ मध्ये नरेंद्र मुखरे यांच्या रूपाने खंडित करण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. मुखरे यांचा विजय त्यावेळी थोडक्यात हुकला. कुटुंबातील नवीन उमेदवार मनोहरराव नाईक यांच्या रूपाने घराण्याने दिला होता. मनोहरराव नाईक यांना ६३ हजार ७३२, तर मुखरे यांनी ६१ हजार ६६४ मते घेतली होती. ते जनता दलाचे उमेदवार होते. मनोहरराव नाईक यांचा काठावर झालेला विजय पाहता पुढील निवडणुकीत पुन्हा सुधाकरराव नाईक रिंगणात उतरले. शिवसेनेच्या तिकीटावर नरेंद्र मुखरे त्यांच्यासमोर आले. यावेळी मात्र सुधाकरराव नाईक १५६७० मताधिक्य घेत विजयी झाले.
२००४ च्या निवडणुकीनंतर मात्र नाईकांसमोर स्ट्राँग उमेदवार आला नाही. दोनवेळा आरती फुफाटे, प्रकाश देवसरकर यांनी शिवसेनेचे उमेदवार म्हणून नाईक घराण्याला टक्कर देण्याचा प्रयत्न केला. यात ते यशस्वी झाले नाही. पुढे मनोहरराव नाईक यांचा विजय ३० ते ६५ हजार मताधिक्यावर गेला. २०१४ च्या निवडणुकीपर्यंत बंगल्यातील अनुभवी माणसं रिंगणात उतरली. आता २०१९ च्या निवडणुकीत नाईक घराण्यातील चौथ्या पिढीचे वारसदार इंद्रनील नाईक या तरूणाला मैदानात उतरविले. त्यांच्यासमोर नाईक कुटुंबातीलच भाजपचे अ‍ॅड. नीलय नाईक यांनी जोरदार लढत दिली. कदाचित या मतदारसंघात नीलय निघतील असे आराखडेही मांडले जात होते. अखेरच्या क्षणी इंद्रनील नाईक यांनी विजय मिळवित बंगल्याचा गड कायम राखला. पण नाईक घराण्याने १९९५ च्या अपवाद वगळता आतापर्यंत घेतलेल्या मताधिक्यापेक्षा सर्वात कमी (९७०१) मतांनी विजयी ठरलेले ते उमेदवार आहेत.

आत्मचिंतनाचा विषयबंगल्याचा मताधार कमी होत असल्याच्या बाबीला मोठा आधार मिळतो आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतही अनिता नाईक यांना अतिशय कमी मतांनी विजय नोंदविता आला. अपेक्षेपेक्षा कमी मते त्यांनी घेतली होती, हे विसरता येणार नाही. निसटता का होईना विजय मिळत असल्याने बंगल्याची इभ्रत अद्याप शाबूत असली तरी सातत्याने घटणारे मताधिक्य हा बंगल्यासाठी चिंतेचा आणि तेवढाच आत्मचिंतनाचा विषय ठरला आहे.

Web Title: 'Bungalow' stinks before strong candidates!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :pusad-acपुसद