लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांना ‘आरटीपीसीआर’ चाचणीविना करता येणार प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 06:29 PM2021-07-20T18:29:10+5:302021-07-20T18:29:22+5:30
Corona Vaccine : दुसरा डोस घेवून १५ दिवसाचा कालावधी झालेल्या व्यक्तींना आरटीपीसीआर चाचणीशिवाय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार आहे.
वाशिम : कोविड-१९ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व दुसरा डोस घेवून १५ दिवसाचा कालावधी झालेल्या व्यक्तींना आरटीपीसीआर चाचणीशिवाय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार आहे. याकरिता त्यांच्याकडे कोव्हीन पोर्टलवरील लसीकरणाचे अंतिम प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे. याबाबतचा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी १६ जुलै रोजी जारी केला.
कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरणाला प्राधान्य देण्यात येत आहे. लस घेतल्यानंतरही यापूर्वी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी कोरोना चाचणी आवश्यक होती. आता यामध्ये बदल करण्यात आला आहे. लसीचा दुसरा डोस घेवून १५ दिवस झालेल्या व्यक्तींना आरटीपीसीआर चाचणीशिवाय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार आहे. मात्र, मास्क परिधान करणे, सामाजिक अंतर राखणे व वारंवार हात धुणे आदी कोरोना-१९ नियमांचे पालन करणे आवश्यक असणार आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ अन्वये तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६० नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल व संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले.