उत्पादन निम्मे, यंदा केवडा महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 11:12 PM2019-08-30T23:12:01+5:302019-08-30T23:13:43+5:30

गणेशोत्सवात वाढती मागणी : एक कणीस मिळते १५० ते २०० रूपयांना

Half of the production of kewada became expensive | उत्पादन निम्मे, यंदा केवडा महागला

उत्पादन निम्मे, यंदा केवडा महागला

googlenewsNext

अनिरु द्ध पाटील।
लोकमत न्यूज नेटवर्क
डहाणू/बोर्डी : गतवर्षीच्या कमी पर्जन्यमानाचा फटका या वर्षीच्या केवडा उत्पादनावर झाला असून निम्मे पीक आल्याने किमतीत वाढ झाली आहे. स्थानिक उत्पादकांकडून शहरातील व्यापऱ्यांना विकल्या जाणाºया केवड्याच्या प्रती नगात ५० रुपयांनी वाढ होऊन त्याची किमत १५० रुपयांवर आली आहे. त्यामुळे मुंबईसह उपनगरातील फूल बाजारात किमती वाढून त्याचा फटका गणेशभक्तांना बसणार आहे. दरम्यान केवड्याऐवजी त्याच्या कोवळ्या गाभ्याची विक्री करून ग्राहकांच्या फसवणुकीची शक्यता आहे.


गणपती पूजनाकरिता शहरातील फूल बाजारात ग्राहकांकडून केवड्याला प्रचंड मागणी असते. शिवाय मागील काही वर्षांपासून केवड्याची बनं झपाट्याने कमी होत असल्याने आवक घटून किमतीत वाढ झाली आहे. मागील वर्षी आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच पाऊस झाला होता. तर १३ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी होती. या उत्सवाकरिता लागणाºया केवड्याची काढणी साधारणत: कालाष्टमीपासून शेतकऱ्यांकडून केली जाते. त्यामुळे ३ सप्टेंबरपासून काढणीला प्रारंभ झाला होता. मात्र छाटणीनंतर पावसाने उघडीप दिल्याने नवीन फुटाव्याला आवश्यक पाण्याचा पुरवठा झाला नाही. त्याचा फटका या वर्षीच्या उत्पादनावर झाला आहे.


फुटवा कमी आणि पुढे-मागे आल्याने फूल केवड्यांची संख्या कमी झाली आहे. शिवाय काढणी योग्य केवडा पंधरा दिवसांपूर्वीच फुलण्यास प्रारंभ झाल्याने तो झाडवरच करपून गेला. तर काही केवडे फुलण्यास आणखी पंधरा दिवस लागतील असे केवडा उत्पादकांचे म्हणणे आहे. त्यामुळे यावर्षी पोषक पाऊस होऊनही निम्मेच उत्पादन हाती लागणार आहे. गतवर्षी शेतकºयांकडून व्यापºयांना विकल्या जाणाºया एका नगाची किंमत केवड्याच्या आकारानुसार १०० ते ११० रुपये होती. त्यामध्ये वाढ होऊन १५० रुपये करण्यात आली आहे. हाच केवडा दादर आणि उपनगरातील फूल बाजारात गेल्यावर एका पातीकरिता १५० ते २००0 रुपये दराने ग्राहकांना विकला जातो. तर वाढती मागणी लक्षात घेता आर्थिक फायद्यासाठी व्यापारी कोवळा गाभ्याची मागणी शेतकºयांकडे करून त्याद्वारे बक्कळ पैसा कमावतील. मात्र लोभापायी असे केल्यास पुढील वर्षीच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होईलच. शिवाय काही झुडपे दगावण्याची शक्यता असल्याचे मत चिखले गावातील केवडा उत्पादक अनिल किणी यांनी व्यक्त केली आहे.


येथील महिला रेल्वेने भाजीपाला नेऊन मुंबई आणि उपनगरातील सदनिकांमध्ये जाऊन विक्री करतात. गणेशोत्सव काळात त्या केवडा आणि पूजेची पत्री यांची विक्री करतात. शेतकरी या महिलांना ८० ते १०० रुपयांना याची विक्री करतात. त्यामुळे ग्राहकांना तो १५० रुपये नगाने केवडा उपलब्ध होईल.

खर्चात वाढ झाल्याचा फटका
शेतीला कुंपण म्हणून केवड्याची शेतकºयांकडून लागवड होते. मात्र शेती कसण्याचे प्रमाण घटल्याने केवडा क्षेत्रात घट, मागील पाच-सहा वर्षांपासून घटत्या पावसाचाही परिणाम, बाजारात वाढत्या मागणीमुळे कोवळ्या गाभ्याची चोरी व बनाला आग लावण्याचे प्रकार, १५ ते २० फूट उंच काटेरी झुडपावर चढून शेंड्यावरचा केवडा काढणीकरिता ३ ते ४ मजुरांची आवश्यकता, मात्र मजुरी वाढल्याने उत्पादन खर्चात वाढ यामुळे केवड्याचे उत्पादन दरवर्षी झपाट्याने घटते आहे.
 

गतवर्षी कमी पाऊस झाल्याने या वर्षीच्या केवडा उत्पादनात निम्म्यानी घट झाली आहे. शिवाय हंगामापूर्वीच आणि हंगामानंतर केवडा उमलण्याचा प्रकार यावर्षी घडताना दिसतोय. या सर्वांचा परिणाम होऊन प्रतिनग ५० रुपयांनी वाढ झाली आहे.

- अनिल किणी, केवडा उत्पादक शेतकरी, चिखले

Web Title: Half of the production of kewada became expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.