मजबूत संघटन ही पक्षाची ताकद असून, संघटन मजबुतीसाठी प्रयत्न करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2021 05:00 AM2021-10-04T05:00:00+5:302021-10-04T05:00:07+5:30
शेतकऱ्यांना पंचनामे सांगणारे दळभद्री हे सरकार असून, संघर्ष करा. राज्यात भाजपचे सरकार आल्याशिवाय शेतकऱ्यांचे तसेच महात्मा गांधींचे स्वप्नही पूर्ण होणार नाही, असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले. खा. तडस यांनी, अल्पमतातील नगर परिषद चालवणे कठीण आहे; परंतु संजय गाते यांनी किमया करून दाखविल्याचे सांगितले. भाजप-सेना युतीने दिलेला निधी महाविकास आघाडी सरकारने परत नेला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : मजबूत संघटन ही पक्षाची ताकद असून, संघटन मजबुतीसाठी भाजपच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्याने प्रयत्न करावेत. आपण जनतेमध्ये ईश्वराचा अंश बघतो, असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. पुलगाव येथे विकासकामांचा लोकार्पण सोहळा व भाजप कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे होते. व्यासपीठावर खा. रामदास तडस, आ. रामदास आंबटकर, प्रदेश सचिव राजेश बकाने, माजी खासदार सुरेश वाघमारे, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस संजय गाते, पुलगावच्या नगराध्यक्षा शितल गाते, जि. प. उपाध्यक्ष वैशाली येरावार, जि. प. सदस्य प्रवीण सावरकर, शहर अध्यक्ष नितीन बडगे, ओबीसी मोर्चाचे राजेंद्र डांगे, रवींद्र चव्हाण आदींची उपस्थिती होती. मुनगंटीवार पुढे म्हणाले, भाजपची सत्ता आल्याशिवाय अतिरिक्त तहसील होणार नाही. या मतदारसंघात काँग्रेसचे विसर्जन करून महात्मा गांधींचे स्वप्न पूर्ण करावे. शेतकऱ्यांना पंचनामे सांगणारे दळभद्री हे सरकार असून, संघर्ष करा. राज्यात भाजपचे सरकार आल्याशिवाय शेतकऱ्यांचे तसेच महात्मा गांधींचे स्वप्नही पूर्ण होणार नाही, असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले. खा. तडस यांनी, अल्पमतातील नगर परिषद चालवणे कठीण आहे; परंतु संजय गाते यांनी किमया करून दाखविल्याचे सांगितले. भाजप-सेना युतीने दिलेला निधी महाविकास आघाडी सरकारने परत नेला. तरीही ७० टक्के वचननाम्यातील कामे नगर परिषद पुलगावने पूर्ण केली, असे संजय गाते यांनी सांगितले. मराठा, ओबीसी समाजाचा विश्वासघात करणारे महाविकास आघाडी सरकार आहे. या सरकारला धडा शिकवण्याची आज गरज आहे. म्हणून विदर्भ मेळाव्यात जास्तीत जास्त ओबीसी समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ओबीसी प्रदेश मोर्चाचे अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी केले. प्रास्ताविक नितीन बडगे यांनी केले. सूत्रसंचालन आकाश दुबे यांनी केले. आभार गजेंद्र गालपेल्लीवार यांनी मानले. कार्यक्रमाला नितीन बडगे, मंगेश झाडे, राजू बत्रा, मानसिंग झांझोटे, भारत नागपाल, शिल्पा ठाकूर, संदीप बोरकुटे, मयूर निनावे, शकील खान, संगीता शहा, चंद्रकांत शहाकार, भरत नागपाल आदींची उपस्थिती होती.