रेतीघाट मजुरांच्या हक्कासाठी बसपाचा मोर्चा
By Admin | Updated: February 21, 2016 01:18 IST2016-02-21T01:18:14+5:302016-02-21T01:18:14+5:30
रेतीघाटांमध्ये अनैसर्गिक संसाधनांचा अवैधरीत्या वापर केला जात आहे. परिणामी, सुमारे पाच हजार मजुरांवर उपासमारीची वेळ येत आहे.

रेतीघाट मजुरांच्या हक्कासाठी बसपाचा मोर्चा
कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
वर्धा : रेतीघाटांमध्ये अनैसर्गिक संसाधनांचा अवैधरीत्या वापर केला जात आहे. परिणामी, सुमारे पाच हजार मजुरांवर उपासमारीची वेळ येत आहे. रेती घाटावर यंत्रांचा वापर करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करावी, अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्यावतीने करण्यात आली. शनिवारी याबाबत मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
रेतीघाट मजुरांच्या हक्कासाठी बहुजन समाज पार्टीच्यावतीने शनिवारी धडक मोर्चा काढण्यात आला. सकाळी ११ वाजता कारला चौक पिपरी (मेघे) येथून निघालेला बसपाचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. दरम्यान, न्यायालय परिसरात मोर्चा अडविण्यात आला. यावेळी झालेल्या सभेत बसपाचे जिल्हाध्यक्ष मोहन राईकवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यानंतर शिष्टमंडळामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यात रेती घाटावर यंत्रांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. यामुळे जिल्ह्यातील सुमारे पाच हजार मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. रेती घाटावर पोकलॅण्ड, जेसीबी, डोंग्यांचा वापर केला जात आहे. याद्वारे क्षमतेपेक्षा अधिक उपसा केला जात आहे. परिणामी, नद्यांचे अस्तित्व धोक्यात आले असून निसर्गाचे संतूलन ढळत आहे. रेती घाटावरील मजुरांना न्याय मिळावा म्हणून अवैधरीत्या रेतीचा उपसा करणाऱ्यांवर त्वरित कारवाईकरावी, रस्त्यांचे नुकसान थांबवावे, अशी मागणी करण्यात आली. मोर्चात सुनील डोंगरे, भास्कर राऊत, शेख सलीम, प्रमोद सवई, संजय आत्राम, सुनील हजारे यांच्यासह बसपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.(कार्यालय प्रतिनिधी)