शाळांची डाेळेझाक ठकेदाराच्या पथ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:02 AM2021-02-28T05:02:35+5:302021-02-28T05:02:35+5:30
कळंब : शालेय पोषण आहार योजनेचा धान्यपुरवठा करताना, वजनात अनियमितता येत असल्याचा गंभीर प्रकार शुक्रवारी समोर आला होता. ठेकेदाराने ...
कळंब : शालेय पोषण आहार योजनेचा धान्यपुरवठा करताना, वजनात अनियमितता येत असल्याचा गंभीर प्रकार शुक्रवारी समोर आला होता. ठेकेदाराने धान्यादी वस्तू माेजून दिल्या, तरी शाळेतील वजन काट्यावर माेजून घ्याव्यात आणि एखाद्या बॅगमध्ये धान्य कमी निघाले, तर तशी नाेंद ठेवण्याचे निर्देश आहेत. मात्र, काही शाळांत वजन काटे नाहीत आणि ज्या शाळांकडे आहेत, ते नादुरुस्त आहेत. त्यामुळे शाळांची ही डाेळेझाक धान्यपुरवठा करणाऱ्या ठेकेदारांच्या पथ्यावर पडत आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्या, तरी विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार पुरवठा केला गेला आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना शिजवलेला आहार देण्याऐवजी धान्यादी वस्तूंचे वितरण केले जात आहे. तालुका स्तरावरील गटशिक्षण कार्यालयाने पटसंख्येनुसार केलेल्या मागणीनुसार, हा आहार एका एजन्सीमार्फत पुरवठा केला जात आहे.
यानुसार, तालुक्यातील २०३ शाळांतील पहिली ते पाचवीच्या गटातील १४ हजार ३३५ व सहावी ते आठवी या गटांतील ८ हजार ५७६ विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेचे धान्य वाटप करण्यात येत आहे. यानुसार, तालुक्यात एका एजन्सीमार्फत एक लाख ४३ हजार किलो तांदूळ, २५ हजार किलो मसूर दाळ तर ५२ हजार किलो हरभरा पुरविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे धान्य घेताना ठेकेदारांच्या वजन काट्यावर विश्वास न ठेवता मुख्याध्यापकांनी शाळेकडील वजन काट्यावर माेजून घ्यावे, असे निर्देश आहेत. मात्र, या प्रक्रियेसाठी काही शाळांकडे वजन काटे नाहीत, तर काही शाळांकडील वजन काटे नादुरुस्त आहेत. हा दुर्लक्षित कारभार ठेकेदाराच्या पथ्यावर पडत आहे. दरम्यान, या संदर्भात ‘लाेकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर सीईओ डाॅ.विजयकुमार फड यांनी सक्त सूचना करीत, यापुढे धान्य माेजून घेण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर निश्चित करण्याचे फर्मान काढले आहे.
पदांसाठी अट्टाहास, कर्तव्याचा मात्र विसर...
शालेय पोषण आहार या महत्त्वाकांक्षी योजनेवर त्या-त्या शाळेतील शालेय व्यवस्थापन समित्यांचाही ‘वॉच’ असायला हवा. या पदासाठी मोठा अट्टाहास धरला जातो. प्रसंगी निवडणूक घ्यावी लागते. प्रत्यक्षात मात्र त्यांना कर्तव्याचा विसर पडतो. काही गावांतील ‘दक्ष’ व्यवस्थापन समित्यांचा अपवाद वगळता इतर गावात या समित्यांची निष्क्रियता दिसून येते.
या संदर्भात कळंब येथील प्रभारी गट शिक्षणाधिकारी परमेश्वर भारती यांच्याशी संपर्क साधला असता, शालेय पोषण आहार योजनेतील धान्यादी वस्तू पावतीप्रमाणे वजन करून घ्यावे, ते योग्य आहे का, याची खात्री करावी. आपल्या काट्यावर वजन करून घ्यावे, असे वारंवार सूचित केले आहे.