कोरोना बाधितांचा आकडा पावणेतीन हजारांच्या घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:32 AM2021-04-10T04:32:15+5:302021-04-10T04:32:15+5:30
कळंब : तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता पावणे तीन हजाराच्या घरात पोहोचली असून, सध्या १५४ रुग्णांवर उपचार चालू ...
कळंब : तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता पावणे तीन हजाराच्या घरात पोहोचली असून, सध्या १५४ रुग्णांवर उपचार चालू आहेत . तालुक्यात लसीकरण करणाऱ्यांची संख्याही सव्वापाच हजारांच्या पुढे गेली असली तरी त्याचा वेग वाढविण्याची आवश्यकता तज्ज्ञांमधून व्यक्त केली जात आहे.
तालुक्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. सध्या १५४ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी ६६ रुग्णांवर शासकीय आयटीआयमधील कोविड सेंटर मध्ये, ८ रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत तर ८० रुग्ण घरी राहून उपचार घेत आहेत.
तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज दोन अंकाच्या घरात जात आहे. शहरात तसेच ग्रामीण भागातही रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. बाधित रुग्णाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करणे, मास्कचा वापर न करणाऱ्यावर कार्यवाही करणे, शासनाने दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याकडे प्रशासनाने जोर लावला आहे.
तालुक्यात आतापर्यंत ७ हजार ५६१ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ६ हजार १४१ निगेटिव्ह तर १ हजार ३४० पॉझिटिव्ह आल्या आहेत. ९ हजार ४०५ जणांच्या रॅपिड अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ८ हजार १३ निगेटिव्ह तर १ हजार ३९२ पॉझिटिव्ह आल्या आहेत. तालुक्यात एकूण २ हजार ६४४ जण पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यापैकी २ हजार ३८६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, सध्या १५४ जणावर उपचार सुरू आहेत.
लसीकरणाला प्रतिसाद
कोविड लसीकरणाला मागील काही दिवसांपासून चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु, त्याचा वेग वाढविण्याची गरज आहे. लसीकरणाबाबत काही चुकीचे समज गैरसमज असल्याचेही समोर येते आहे. याबाबत लसीकरणाबरोबरच आता जनजागृती करण्यास शासन, प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात आतापर्यंत ५ हजार २३६ जणांनी कोविड प्रतिबंधक लस घेतली आहे. दररोज सरासरी शंभर ते सव्वाशे जण लसीकरणासाठी येत आहेत. ही संख्या वाढली तर कोरोना संसर्ग पसरण्याचा धोका कमी होऊ शकतो, असे वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींचे म्हणणे आहे.
व्यापाऱ्यांचा अर्धवट प्रतिसाद !
‘ब्रेक द चेन’ म्हणत शासनाने काही ठरावीक दुकाने वगळता इतर दुकानाना बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. पण, काही व्यापाऱ्यांनी यास विरोध दर्शविला. त्या मंडळींनी शासनास निवेदनही दिले. काही व्यापाऱ्यांनी आज आपली दुकाने अर्धवट उघडी ठेवून व्यापार केला. आधीच व्यवसाय मंदीमध्ये असताना पुन्हा ब्रेक द चेन म्हणत शासनाने दुकानावर निर्बंध आणल्याने आहे तो व्यापार मोडीत निघण्याची भीती व्यापारी व्यक्त करीत आहेत.
फळविक्रेते, भाजी विक्रेते गंभीर नाहीत
शहरातील मुख्य चौकात भाजी, फळ विक्री करणारे बहुतांश विक्रेते मास्कचा वापर करीत नाहीत. काहीजण नुसतेच नावाला मास्क अडकवितात. विशेष म्हणजे याठिकाणी लहान मुलांनाही फळे, भाजी विक्रीसाठी विनामास्कचे बसविले जाते. ही गंभीर बाब प्रशासनही गांभिर्याने घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.