बसस्थानकासाठी अर्थसंकल्पात तरतूद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:32 AM2021-03-05T04:32:44+5:302021-03-05T04:32:44+5:30
उस्मानाबाद : अनेक वेळेस उद्घाटन सोहळे होऊनही उस्मानाबाद येथील मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनर्बांधणीच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही. यामुळे परिवहनमंत्री ...
उस्मानाबाद : अनेक वेळेस उद्घाटन सोहळे होऊनही उस्मानाबाद येथील मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनर्बांधणीच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही. यामुळे परिवहनमंत्री म्हणून याकडे वैयक्तिक लक्ष द्यावे व यासाठी ८ मार्च रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद करून हे काम शासन निधीतून हाती घेण्यात यावे, अशी मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी परिवहनमंत्री अॅड. अनिल परब यांच्याकडे केली आहे.
आघाडी सरकारने राज्यातील महत्त्वाच्या शहरात असलेल्या बस डेपोची जागा व्यापारी संकुल योजनेच्या मध्यमातून विकसित करण्याबाबत निर्णय घेतला होता. त्यात उस्मानाबादसह अन्य बसस्थानकांचा समावेश होता. यानुसार २४ ऑगस्ट २०१४ रोजी उस्मानाबाद बसस्थानकाचे भूमिपूजनही झाले होते; परंतु शासनाला वरील बसस्थानकांची कामे शासन निधीतून करणे अभिप्रेत असल्याने महामंडळाने १८ मे २०१६ रोजी सभा घेऊन त्यामध्ये उपरोक्त व्यापारी संकुल योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेली निवड रद्द करून त्याऐवजी मंजूर बसस्थानकांची कामे शासन निधीतून अथवा महामंडळाच्या निधीतून हाती घेण्याचे प्रस्तावित करण्याचा ठराव घेतला असल्याचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रामध्ये नमूद केले आहे.
यानंतर ९ ऑगस्ट २०१९ रोजी उस्मानाबाद येथील मध्यवर्ती बसस्थानकाचे उपकामासह पुनर्बांधणी करण्याकारिता प्रशासकीय मान्यता देऊन १०.१५ कोटींच्या निधीस शासनाकडून मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार २३ ऑगस्ट २०१९ रोजी ई-निविदा प्रकाशित करण्यात आल्या व १३ सप्टेंबर रोजी निविदा उघडण्यात आली. दरम्यान, ३१ ऑगस्ट २०१९ रोजी वा त्या सुमारास तत्कालीन मंत्र्यांच्या हस्ते सदर कामाचे पुन्हा एकदा उद्घाटनदेखील करण्यात आले होते, तरीही या कामास सुरुवात झालेली नाही. त्यामुळे ८ मार्च रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद करून हे काम शासन निधीतून हाती घेण्यात यावे, अशी मागणी यावेळी केली आहे.
चौकट..........
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई कार्यालयात ६ ऑक्टोबर २०२० रोजी पुन्हा उस्मानाबाद बसस्थानकाचे बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर आधुनिकीकरण करण्याबाबत प्रस्ताव मागविण्यात आला होता; परंतु यातही पुढे काहीच न झाल्यामुळे व अनेक वेळेस उद्घाटन सोहळे होऊनदेखील प्रत्यक्ष कामास सुरुवात न झाल्याने जिल्ह्यातील जनता शासनाप्रती नाराजी आहे. त्यामुळे परिवहनमंत्री म्हणून आपण स्वत: यात लक्ष घालावे, अशी मागणी आ. पाटील यांनी या पत्राद्वारे व्यक्त केली आहे.