भीती वाटत असल्याने यादीत नाव असूनही लसीकरणासाठी पुढे येण्याचे धाडस होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:15 AM2021-01-24T04:15:43+5:302021-01-24T04:15:43+5:30
उस्मानाबाद : कोरोना संसर्गापासून बचावासाठी जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला आहे. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या ...
उस्मानाबाद : कोरोना संसर्गापासून बचावासाठी जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला आहे. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. शिवाय, महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनाही लस देण्यात येणार आहे. मात्र, लस घेण्याबाबत अनेक कर्मचाऱ्यांमध्ये अकारण भीती असल्यामुळे मागील सात दिवसांत केवळ ८०० जणांनी लस घेतली आहे, तर अद्यापही ७ हजार कर्मचारी बाकी आहेत. दरम्यान, लस सुरक्षित असल्याबाबत आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृती केली जात आहे.
जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून कोरोनाचा शिरकाव झाला. जुलै महिन्यापासून झपाट्याने रुग्ण वाढू लागले होते. साडेनऊ महिन्यांच्या कालावधीत साडेसोळा हजार रुग्ण बाधित झाले होते. मात्र, यावर प्रभावी औषध उपलब्ध नसल्याने साडेपाचशे रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णवाढीचा वेग काही अंशी मंदावला आहे. मात्र, कोरोनाचा धोका अद्यापही टळलेला नाही. अशाच कोरोना प्रतिबंधासाठी लसही दाखल झाली आहे. जिल्ह्यात कोविन ॲपवर ९ हजार १०० व्यक्तींनी लसीकरणासाठी नोंद केली आहे. पहिल्या टप्प्यात फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या शासकीय व खाजगी वैद्यकीय सेवेत काम करणारे डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून उस्मानाबाद जिल्हा रुग्णालय, उमरगा उपजिल्हा रुग्णालय, तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला आहे. या केंद्रावर प्रतिदिन शंभर याप्रमाणे तीनशे जणांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, लसीकरणाबाबत अनेक कर्मचाऱ्यांमध्ये अकारण भीती असल्यामुळे लसीकरणासाठी नाव असतानाही लस घेण्याकडे दुर्लक्ष केले होते. जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांनी लस घेऊन लस सुरक्षित असल्याची कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती केली आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून लसीकरण मोहिमेला गती मिळाली आहे.
२०० जणांना रोज लस दिली जात आहे
८०० जणांना आतापर्यंत लस दिली
१२० जणांना लस देणे अपेक्षित होते
रिॲक्शन काय
कोरोनाची लस घेतल्यानंतर काही तासांनंतर अंगाला ताप येऊन अंगदुखी जाणवते. यामुळे थकवा येताे, असे असले तरी ही रिॲक्शन फार काळ राहत नाही. काही वेळेनंतर व्यक्ती पूर्वीप्रमाणेच वावरायला लागते. असे अनुभव काही कर्मचाऱ्यांनी बोलून दाखविले.
कोट...
जिल्ह्यात लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला असून, पहिले तीन दिवस लसीकरण ७० ते ८० टक्के झाले होते. शुक्रवारपासून लसीकरण मोहिमेस गती आली आहे. जिल्हा रुग्णालयात शंभर टक्के लसीकरण होत आहे. लस पूर्णपणे सुरक्षित असून, कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घ्यावे.
-डॉ. धनंजय पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक,
प्रतिक्रिया...
कोरोना लस घेण्याबाबत मनात बऱ्यांपैकी संभ्रम होता. मात्र, मंगळवारी लस घेतली. त्यानंतर कोणतीही रिॲक्शन आली नाही किंवा अन्य त्रासही झाला नाही. लस पूर्णपणे सुरक्षित आहे.
-डॉ. सतीश आदटराव
शुक्रवारी लस घेतली आहे. लस घेतल्यानंतर काही तास अंगदुखीचा त्रास झाला व ताप आला होता. त्यानंतर मात्र कोणताही त्रास जाणवला नाही.
-डॉ. सचिन बोडके
लसीकरणासाठी कोविन ॲपवर नावही नाेंदविण्यात आलेले आहे. लसीकरण सुरू झाले आहे. लस किती सुरक्षित आहे, याबाबत सांशकता आहे. त्यामुळे अद्याप लस घेतली नसल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर एका आरोग्य कर्मचाऱ्याने सांगितले.