वंचितांच्या रंगमंचात, मुक्तपणे अभिव्यक्त होण्याचं बळ  – निरजा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2020 04:53 PM2020-10-18T16:53:33+5:302020-10-18T16:54:00+5:30

Thane : वंचितांच्या रंगमंचाचे प्रणेते दिवंगत साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांना मानवंदना म्हणून प्रत्येक महिन्याच्या १७ तारखेला लोकवस्तीतील मुलांच्या कला दर्शनाचा, वैचारिक अभिचर्चेचा कार्यक्रम समता विचार प्रसारक संस्थेतर्फे घेतला जातो.

In the theater of the underprivileged, the power of free expression - literary Nirja | वंचितांच्या रंगमंचात, मुक्तपणे अभिव्यक्त होण्याचं बळ  – निरजा 

वंचितांच्या रंगमंचात, मुक्तपणे अभिव्यक्त होण्याचं बळ  – निरजा 

Next

ठाणे - लोकवस्तीतील मुली -  मुलांनी ज्या आत्मविश्वासाने, मुक्तपणे व निर्भीडपणे आपले विचार मांडले, त्याचे श्रेय वंचितांच्या रंगमंचाने त्यांना दिलेल्या आत्मबळात आहे. मुलांनी आजूबाजूच्या परिस्थितीचं निरीक्षण करून, त्यावर विचार करून आपली मतं मांडणे, सभोवतालात आणि स्वतः मध्येही होणार्‍या बदलांवर भाष्य करणे हे कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे, असे उद्गार सुप्रसिद्ध लेखिका, कवयित्रि निरजा यांनी समता विचार प्रसारक संस्थेने आयोजित केलेल्या मतकरी स्मृती मालेच्या चौथ्या कार्यक्रमात बोलताना काढले.

लोकवस्तीतील ही मुलं प्रवाहा बरोबर न वाहता स्वतःचा शोध घेताहेत, सत्याचा मागोवा घेत आहेत हे खूप आशादायी आहे, असं सांगत त्या पुढे म्हणाल्या, अभिव्यक्ती म्हणजे केवळ मांडणी नाही तर त्यात शिस्त आणावी लागेल आणि मनाचा तळही गाठावा लागेल. लोकवस्तीची अभिव्यक्ती या थीमवर सादर झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी समता विचार प्रसारक संस्थेचे विश्वस्त, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ होते. वंचितांच्या रंगमंचाचे प्रणेते दिवंगत साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांना मानवंदना म्हणून प्रत्येक महिन्याच्या १७ तारखेला लोकवस्तीतील मुलांच्या कला दर्शनाचा, वैचारिक अभिचर्चेचा कार्यक्रम समता विचार प्रसारक संस्थेतर्फे घेतला जातो.

यावेळी लोकवस्तीतील मुलांनी त्यांच्या कुटुंबात, समाजात घडणार्‍या गोष्टीवर, आपल्या  अनुभवांबद्दल मनमोकळे पणाने आपले विचार आपल्या शब्दात मांडायचे होते. प्रथितयश पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते राज असरोंडकर आणि सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता श्रीवास्तव यांनी निरीक्षक म्हणून काम केले आणि नोंदणी केलेल्या ३१ मुली मुलांमधून त्यांनी १४ जणांची अंतिम कार्यक्रमात सादरीकरणासाठी निवड केली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुप्रसिद्ध लेखिका, दिग्दर्शिका आणि नाट्यजल्लोषच्या संयोजक हर्षदा बोरकर यांनी केले. तर स्वागत आणि प्रस्तावना संस्थेच्या कार्यकर्त्या सीमा श्रीवास्तव यांनी केली.  

सत्य, तथ्य आणि विवेकाची सांगड आवश्यक 

सुरुवातीस या कार्यक्रमात, अनुजा लोहार, वैष्णवी करांडे, पंकज गुरव, सुनील दिवेकर, दीपक वाडेकर, प्रगती वीर, प्रवीण खैरालिया, लता देशमुख, मानसी खोंड, सई मोहिते, हेमाली शिंदे, कल्पना भोजने या निवड झालेल्या लोकवस्तीतील कलाकार - कार्यकर्त्यांनी कोरोना झाल्यावरचे अनुभव, लॉकडाउन मधले अनुभव, आयुष्यात बदल करणार्‍या घटना आणि त्यावरचे विचार, मी एक समलैंगिक, सामाजिक संस्थांचं महत्व, सार्वजनिक गणेशोत्सवाचे चांगले वाईट अनुभव, तंत्रज्ञानाची अपरिहार्यता, महिलांवरील अत्याचार, स्त्रीयांबद्दलचा अन्यायकारक दृष्टिकोन, अंधश्रद्धा अशा सारख्या विविध विषयांवर आपली मते स्पष्टपणे आपल्याच शब्दात मांडली. राज असरोंडकरांनी मुलांच्या अभिव्यक्तीवर प्रतिक्रिया देताना म्हटले, आज आजूबाजूला चाललेल्या उलट सुलट वैचारिक गदारोळात आपले विचार ओळखणे, ते पक्के करणे, आपले मत बनवणे आणि ते मांडणे हे अतिशय महत्वाचे आहे आणि ते या मुलांनी इथे करून दाखवले आहे. समाजात दिसणारे जे विचार आचार चुकीचे वाटतात त्या बद्दल विरोध प्रकट करणे ही मुले शिकली आहेत. सत्य, तथ्य आणि विवेक यांची सांगड घालणं ही आजच्या काळाची गरज आहे, हे या मुलांनी वंचितांच्या रंगमंचामूळे आत्मसात केले आहे असे नक्की वाटते. सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता श्रीवास्तव म्हणाल्या की या मुलांनी दिलखुलास पणे आपल्या मनातल्या गोष्टी अभिव्यक्त केल्या आहेत, हे पाहून यांना या वंचितांच्या रंगमंचाने स्वतःला ओळखायला शिकवले हे दिसून येते. अध्यक्षीय समारोपात डॉ. संजय मंगला गोपाळ म्हणाले, वंचितांच्या रंगमंचामुळे मतकरी सर मुलांच्या हृदयात वसले आहेत. त्यांच्या स्मृतींबरोबर त्यांच्या विचारांची, कलांची सुद्धा स्मृती जागवावी हाच हेतु मतकरी स्मृती माला चालवण्यामागे आहे. मुलांच्या भरभरून प्रतिसादाने हा हेतु सफळ होताना दिसतो आहे.  
या वेळी सन्माननीय पाहुणे असलेले सुप्रसिद्ध कलाकार पंकज विष्णु यांनी रत्नाकर मतकरी यांच्या ‘श्रद्धेला डोळे असतात का?’ या ललित लेखाचे रंगतदार वाचन केले. ते म्हणाले, मतकरी सरांना ऐकताना त्यांच्या जाणिवा आपल्यामध्ये झिरपतात हा अनुभव मी अनेक वेळा घेतला आहे, तोच प्रत्यय मला या मुलांच्या अभिव्यक्ती ऐकताना आला. प्रतिकूल परिस्थितीतही मुलांच्या सकारात्मक दृष्टीकोनाने आपला समाज आबाद होईल याची खात्री वाटते. मिलिंद अधिकारी म्हणाले वंचितांच्या रंगमंचामुळे मुले वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करतात, आपली मतं बनवतात, त्यांची विचार शक्ती वाढते, ते स्वतःचा शोध घ्यायचा प्रयत्न करतात हे या उपक्रमाचे फलित आहे. सुप्रसिद्ध लेखक व नाटककार अरविंद औधे यांनी संगितले की ही लोकवस्तीतील मुले आर्थिक दृष्ट्या वंचित असतील पण त्यांच्या विचारांची श्रीमंती आणि उत्स्फूर्तता मनाला स्पर्श करून गेली. या कार्यक्रमाला नेहमी आवर्जून उपस्थित असणार्‍या सुप्रसिद्ध कलाकार सुप्रिया विनोद म्हणाल्या, मतकरी सर म्हणायचे की प्रत्येक माणसाकडे सांगायला एक गोष्ट असते, त्याचा प्रत्यय आज इथे आला.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समता विचार प्रसारक संस्थेच्या अध्यक्ष मनीषा जोशी, उपाध्यक्ष लतिका सु. मो., सचिव हर्षलता कदम, सह संयोजक मीनल उत्तूरकर, खजिनदार सुनील दिवेकर, सह खजिनदार अजय भोसले आदींनी विशेष मेहनत घेतली, असे संस्थेचे विश्वस्त जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया यांनी सांगितले. झूम आणि फेसबुक माध्यमातून सादर झालेला हा कार्यक्रम जगभरातील रसिकांनी पाहिला, अशी माहिती या कार्यक्रमाचे तंत्रज्ञ सुजय ठाकूर यांनी सांगितले.

Web Title: In the theater of the underprivileged, the power of free expression - literary Nirja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे