ठाणे, कल्याण रेल्वे स्थानकांनी दूर केला अस्वच्छतेचा ठपका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 02:07 AM2019-11-25T02:07:19+5:302019-11-25T02:09:08+5:30

रेल्वेस्टेशन म्हटले की अस्वच्छता हे ठरलेले आहे. हा अस्वच्छतेचा ठपका मागे लागल्यानंतर ठाणे, कल्याण स्थानकांनी मनावर घेत हा डाग पुसण्याचा चंग बांधला. त्यानुसार सुधारणा करून या दोन्ही स्थानकांनी स्वच्छतेच्या यादीत नाव पटकावले आहे.

Thane, Kalyan Railway Station removes unclean reprimands | ठाणे, कल्याण रेल्वे स्थानकांनी दूर केला अस्वच्छतेचा ठपका

ठाणे, कल्याण रेल्वे स्थानकांनी दूर केला अस्वच्छतेचा ठपका

Next


रेल्वेस्टेशन म्हटले की अस्वच्छता हे ठरलेले आहे. हा अस्वच्छतेचा ठपका मागे लागल्यानंतर ठाणे, कल्याण स्थानकांनी मनावर घेत हा डाग पुसण्याचा चंग बांधला. त्यानुसार सुधारणा करून या दोन्ही स्थानकांनी स्वच्छतेच्या यादीत नाव पटकावले आहे. प्रवाशांनीही स्वच्छता राखण्याबाबत पुढाकार घ्यायला हवा असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. एकूणच रेल्वेस्थानकातील स्वच्छतेचा आढावा घेतला आहे ‘लोकमत’चे प्रतिनिधी पंकज रोडेकर, अनिकेत घमंडी, प्रशांत माने, कुमार बडदे, पंकज पाटील, सदानंद नाईक यांनी.

प्रवाशांनीही स्वच्छता राखणे गरजेचे
ठाणे रेल्वे स्थानकाचे नाव २०१८ मध्ये अस्वच्छतेच्या यादीत आठव्या क्रमांकावर आले. त्यातून ठाणे रेल्वे प्रशासनाने लागलेला डाग पुसण्यासाठी चांगलेच दंड थोपटले आणि २०१८-१९ या वर्षाची मुंबई विभागातून स्वच्छतेसाठी दिलेली जाणारी शील्ड ठाणे रेल्वे प्रशासनाने मिळून सर्वांना आर्श्चयचकित केले आहे. त्यानंतर, अस्वच्छतेकडून ठाणे रेल्वे स्थानकाची स्वच्छतेकडे वाटचाल सुरू झाल्याने सद्यस्थितीत ठाणे रेल्वेस्थानक स्वच्छ आणि सुंदर असे दिसत आहे.
ठाणे स्थानकात एक ते दहा ए असे अकरा फलाट असून त्यांच्यावर एकूण १८ उपाहारगृहे आणि एक फूडप्लाझा आहे. त्याचबरोबर तीन शुद्ध पाण्याच्या मशीन बसवल्या आहेत. तसेच रेल्वे स्थानकात तीन स्वच्छतागृहे आहेत. स्थानकातील उपाहारगृहांमधून लिंबू सरबत मिळणे बंद झाल्याने,उन्हाळ्यात दररोज एक लीटरच्या १२ बाटल्या असलेले ५०० बॉक्स म्हणजे ६,००० लीटर पाणी दिवसाला विक्री होते. त्यातच, बाहेर गावांवरून येणाºया एक्स्प्रेसमधील प्रवासी ७ आणि ८ फलाटासह मुंबईकडे जाणाºया रुळांवर रिकाम्या बाटल्या फेकल्या जात असल्याने या बाटल्यांमुळेही रेल्वे स्थानकात अस्वच्छता पसरली जात होती. मात्र, कॅशर मशीन बसवल्याने तेही कमी झाले आहे.
या स्थानकातील ११ फलाटांसह तिकीट खिडक्या,रेल्वेची इतर रेल्वेची विविध कार्यालय साफसफाई करण्यासाठी तीन शिफ्टमध्ये २०१८ पूर्वी अवघे ४० कर्मचारी होते. दिवसभरात स्थानकातून दोन डम्पर इतका कचरा गोळा होत होता. त्यामध्ये प्लास्टिक नव्हे तर, कागद आणि फळे अधिक प्रकाराचा कचरा असून तो एकत्र केल्यावर महापालिकेमार्फत उचलून नेण्यासाठी डम्परमागे हजारो रूपये रोजचा खर्च रेल्वे प्रशासनाकडून केला जात होता. मात्र,सद्यस्थितीत रेल्वे स्थानकातून दर दीड ते दोन टन कचरा उचलला जातो. यापूर्वी अस्वच्छतेबाबत ठाणे स्थानकाचे नाव कधी आले नाही. पण, २०१८ मध्ये अस्वच्छतेच्या यादीत अचानक आठव्या क्रमांकावर ठाण्याचे नाव आल्याने सर्वांनी आर्श्चय व्यक्त केले. याचदरम्यान, रेल्वे स्थानकातील स्वच्छता करण्यासाठी ठेकेदार मिळाल्याने रेल्वे स्थानकातील स्वच्छतेसाठी १५० जणांची फौज मिळाली. ही मंडळी सद्यस्थिती तीन पाळ््यांमध्ये वेगवेगळ्या मशीनद्वारे स्वच्छता करतात. तसेच फलाटावरील फरशीच नाहीतर ब्रीज आणि फलाटांवर पत्रे येथीलही स्वच्छता त्यांच्यामार्फत रोज केली जाते.
अस्वच्छतेचा लागलेला डाग पुसून काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तेव्हा जगजागृतीवर विशेष भर देत, कारवाईचाही बडगा उगारला होता. त्याचबरोबर मध्यंतरी सामाजिक संस्थांमार्फत रेल्वे स्थानकातील भिंती रंगवल्या होत्या. त्यानंतर गुटखा आणि तंबाखू खाणाऱ्यांनी त्या भिंती बेरंग केल्या. त्या भिंतीसह इमारतीची डागडुजी करत,इमारतीला पांढरा रंग चढवल्याचे दिसून आले.


जनजागृतीवर भर
प्रवाशांमध्ये स्वच्छता राखण्याबाबत जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. ही जनजागृती करताना रेल्वे प्रवाशांना तो कायदेशीर कसा गुन्हा आहे त्यानुसार कितपत शिक्षा होऊ शकते याची माहिती देत प्रवाशांमध्ये जागरूकता करण्याचा प्रयत्न केला जात आहे. रेल्वे स्थानकाबरोबर लोकलही स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात येते.

अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई
रेल्वेस्थानक परिसर स्वच्छ करताना, प्रवासी थुंकून पुन्हा तो परिसर अस्वच्छ करतात, म्हणून आता रेल्वे प्रशासनाने अशाप्रकारे अस्वच्छ करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

गर्दुल्ल्यांना हुसकावणे गरजेचे
ठाणे स्थानकात गर्दुल्ले आणि भिकाºयांची संख्या जास्त आहे. दिवसेंदिवस त्यांची रेल्वेस्थानकात वाढणारी संख्या रोखण्याची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दल आाणि लोहमार्ग पोलिसांनी घेतली तर, ते प्रमाण नक्की कमी होईल.

उंदीरही झाले कमी
कचरा उचलण्याबरोबर उंदरांचा बंदोबस्त करण्याचेही एक आव्हान होते. त्यामुळे ज्या-ज्या भागात जास्त उंदीर होते. त्या ठिकाणी औषधाचा मारा करत, त्यांचे प्रमाण कमी करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले, असा दावा केला जात आहे.

रेल्वेस्थानकात स्वच्छतेबाबत विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. दिवसभरातून रेल्वे स्थानकातील प्रत्येक फलाटांची स्वत: पाहणी करून तेथे अस्वच्छता दिसल्यास तातडीने कर्मचाºयांना सांगून ती जागा स्वच्छ केली जाते. मे महिन्यात मुंबई विभागीय स्वच्छ रेल्वे स्थानकांमध्ये ठाणे स्थानकाला स्वच्छतेबाबत शील्ड मिळाली. तसेच बाटली कॅशिंग मशीन आल्याने आणखी स्वच्छता वाढली. त्याचबरोबर उपहारगृहधारकांनाही स्वच्छता राखण्याबाबत सूचनाही केल्या आहेत.
- राजेंद्र वर्मा, डायरेक्टर, ठाणे रेल्वे स्थानक.

‘त्या’ सर्वेक्षणातून घेतला बोध आणि केला स्वच्छतेचा निर्धार

मागीलवर्षी मध्य रेल्वेच्याकल्याण स्थानकावर अस्वच्छतेचा शिक्का बसला होता. भारतीय रेल्वेने गेल्यावर्षी केलेल्या सर्वेक्षणात ही धक्कादायक बाब समोर आली होती. देशातील सर्वात जास्त रहदारी असलेल्या कल्याण स्थानकाने अस्वच्छ स्थानकाचा दर्जा मिळविला होता. अस्वच्छ स्थानकामध्ये गणना झाल्यावर खडबडून जाग आलेल्या रेल्वे प्रशासनाने स्थानकात विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली. या मोहीमेंतर्गत स्थानकातील सर्व फलाट, कॅन्टीन, प्रसाधनगृह, तिकिटघरांचा परिसर, रेल्वे रूळांमध्ये स्वच्छता राखण्याकडे भर राहिला आहे. दरम्यान, कल्याण स्थानक परिसरात स्वच्छता दिसत असली तरी या स्थानकांच्या पुलाला लागून असलेल्या केडीएमसीच्या स्कायवॉकवर मात्र फेरीवाले, भिकारी आणि गर्दुल्ले यांचा वावर कायम राहिल्याने याठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसून येते. एकीकडे स्वच्छता सर्वेक्षण २०२० राबविताना केडीएमसीने रेल्वेकडून स्वच्छतेचे धडे गिरवून प्रवाशांची वाट सुकर करावी अशी मागणी होत आहे. कल्याण स्थानक मध्य रेल्वेवरील एक महत्वाचे स्थानक आहे. दररोज लाखो प्रवाशांची ये-जा असलेले हे स्थानक जंक्शन असल्याने उपनगरी गाडयांबरोबरच देशाच्या कानाकोपºयात जाणाºया मेल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या याठिकाणी थांबतात. दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात, कर्नाटक ते तामिळनाडू अशा सर्वच राज्यांमध्ये जाण्यासाठी येथून गाडया मिळतात. दिवसाला दीडशेहून अधिक लांबपल्ल्याच्या गाड्या येथून ये-जा करीत असतात. तसेच कल्याण ते कर्जत आणि कसाºयापर्यंत तर ठाण्यापासूनचे प्रवासी मेल एक्स्प्रेस पकडण्यासाठी कल्याण स्थानकात येत असतात. त्यामुळे येथे कायमच प्रवाशांची वर्दळ असते. कल्याण स्थानकातून दिवसभरात अडीच लाख प्रवासी प्रवास करतात तर ९० जलद आणि ५७२ लोकलगाडया या स्थानकात येत असतात. दरम्यान भारतीय रेल्वे गेल्यावर्षी देशातील सर्व स्थानकांमधील स्वच्छतेचे सर्वेक्षण केले. यात पहिल्या दहा अस्वच्छ स्थानकांमध्ये कल्याण स्थानकाचा समावेश झाला होता. रेल्वेमार्गावरील विष्ठा, कचरा यामुळे दुर्गंधी पसरणे, मोठमोठया घुशींचे रेल्वेमार्गावर आणि फलाटावर वावरणे, स्थानकातील भिंती, कोपरे याठिकाणी पान, तंबाखू खाऊन मारलेल्या पिचकाºया असे काहीसे चित्र त्यावेळी करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले होते. प्रवाशांशी साधलेल्या संवादात त्यांनीही स्वच्छतेबद्दल समाधानी नसल्याचे सांगितले होते. रात्रीच्यावेळी या स्थानकाचा ताबा भिकारी, गर्दुल्ले, भटके कुत्रे घेतात त्यामुळे असुरक्षितेची भावनाही व्यक्त करण्यात आली होती. रेल्वेने प्रवाशांच्या ट्रेन आणि स्थानकावरील सुविधा सुधारण्यासाठी प्रवाशांकडून अभिप्रायही मागितला होता. यात ट्रेन व स्थानकातील स्वच्छता, खाण्याची सोय, एसी, अन्न पदार्थ, वक्तशीरपणासह अन्य मुद्यांवर लक्ष वेधण्यात आले होते. त्या सर्वेक्षणानंतर अस्वच्छतेबद्दलची बाब समोर आली होती. दरम्यान या सर्वेक्षणानंतर मात्र कल्याण रेल्वे प्रशासनाने स्वच्छतेची खबरदारी घेतल्याचे चित्र सध्यातरी दिसून येत आहे. स्थानकात आठ फलाट आणि सात पादचारी पूल आहेत. या परिसरात स्वच्छता राखण्यावर अधिक भर दिला गेला आहे. जागोजागी कचरा टाकण्यासाठी डस्टबीन ठेवले गेले असून गर्दुल्ले आणि भिकाºयांकडून ते चोरीला जाण्याची शक्यता लक्षात घेता डस्टबीनच्या सुरक्षेला प्राधान्य दिले गेले आहे. रेल्वे प्रशासनाकडून स्वच्छतेच्या कामाचे चार वर्षाचे कंत्राट दिले गेले आहे. १५० कामगार यासाठी घेण्यात आले असून सकाळ, दुपार आणि सायंकाळ अशी तीन शिफ्टमध्ये स्वच्छतेचे काम चालते. स्विपींग मशीन, व्हॅक्युम क्लिनर, जेट मशीन, सिंगल डिस्क अशा अत्याधुनिक साहित्यांचा वापर करून स्वच्छता केली जात आहे. फलाटावरील कॅन्टीनच्या ठिकाणीही स्वच्छता राखली जात आहे. दरम्यान पुलावरील भिंती तंबाखू आणि पान खाऊन थुंकून रंगविण्याचे प्रकार प्रवाशांकडून सुरूच आहे. त्याचबरोबर रेल्वे रूळामध्ये खाद्यपदार्थ टाकणे, खाऊच्या पिशव्या भिरकावणे हे प्रकारही प्रवाशांकडून होत आहेत. हे प्रवाशांनी टाळणे गरजेचे आहे. रात्रीच्या सुमारास भिकारी आणि गर्दुल्ले यांचा वावर स्थानकावर प्रामुख्याने दिसून येतो. त्याला कुठेतरी आळा घातला गेला पाहिजे. दरम्यान, २०१८ मध्ये स्वच्छतेत कल्याण स्थानकाचा सर्वात खाली क्रमांक होता. त्यावेळी ७२० क्रमांक होता परंतु आता ३६० क्रमांकापर्यंत प्रगती केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. प्रवाशांनीही सहकार्य करून स्वच्छता राखण्याला प्राधान्य दिले पाहिजे असे आवाहन त्यांनी
केले आहे.


येथे स्वच्छता पण तिकडे बोंबाबोंब
रेल्वेने स्वच्छता सर्वेक्षणातून बोध घेऊन स्थानक परिसरातील स्वच्छता राखण्याला प्राधान्य दिले असताना दुसरीकडे याच स्थानकाला लागून असलेल्या केडीएमसीच्या स्कायवॉकवर मात्र स्वच्छतेचे तीनतेरा वाजल्याचे चित्र आहे. एल्फिन्स्टन पुलाच्या दुर्घटनेनंतर फेरीवाल्यांना रेल्वे स्थानकापासून १५० मीटर परिक्षेत्रात व्यवसाय करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मज्जाव केला आहे. न्यायालयाचा आदेश रेल्वे प्रशासनाकडून कटाक्षाने पाळला गेला आहे.
परंतु केडीएमसीने मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळत आहे. रेल्वेच्या पादचारी पुलांना जोडलेल्या केडीएमसीच्या स्कायवॉकवर सदैव फेरीवाल्यांचे अतिक्रमण असते. त्यात भिकारी, वारांगना आणि गर्दुल्यांनाही स्कायवॉक आंदण दिला आहे. त्यामुळे रेल्वेतून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांमध्ये येथून मार्गस्थ होताना असुरक्षिततेची भावना असते. गर्दुल्यांकडून प्रवाशांवर हल्ला करून लुटण्याचे प्रकारही याठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास घडले आहेत.
फेरीवाल्यांकडून होणारा कचरा त्याचठिकाणी टाकला जात असल्याने याठिकाणी नेहमीच घाणीचे साम्राज्य असते. मध्यंतरी खासदार कपिल पाटील यांनी रेल्वे स्थानकाची पाहणी करून प्रवाशांशी संवाद साधला होता. त्यावेळी केडीएमसीच्या स्कायवॉकवरील घाणीचे साम्राज्य पाहून खासदार पाटील यांनी महापालिकेचे क प्रभाग अधिकारी भारत पवार यांना चांगलेच फैलावर घेतले होते. त्यानंतर स्कायवॉक फेरीवाला मुक्त होता. परंतु पुन्हा अतिक्रमण झाले आहे.

चोरांचा सुळसुळाट
शहाड, विठ्ठलवाडी व उल्हासनगर रेल्वेस्टेशन समस्याग्रस्त व भकास झाली आहेत. पश्चिमेकडील स्वच्छतागृह कमी वेळेस सुरू असल्याने महिलांची गैरसोय होते. रात्रीच्या १० नंतर स्टेशन परिसरात गर्द्दुले, भुरटेचोर यांचा सर्रास वावर असतो. स्टेशनच्या पूर्वेला एकमेव स्वच्छतागृह असून अस्वच्छतेमुळे नागरिक तेथे जाण्याचे टाळतात. तसीच परिस्थिती पश्चिमेतील स्वच्छतागृहाची आहे. स्टेशनच्या पश्चिम बाजूला वालधुनी नदी व पालिकेचे आरक्षित मैदान आहे. तेथेच उघडयावर मच्छी मार्केट असून आठवडयाभरापूर्वी मार्केटवर कारवाई झाली होती. असे असतांना आजही तेथे माशांची विक्री सुरू आहे. येथील दुर्गंधी स्टेशनपर्यंत येते.

पानाच्या पिचकाऱ्यांनी भिंती रंगल्या

मध्य रेल्वेच्या प्रमुख एक असलेल्या दिवा जंक्शनवरील फलाट तसेच पादचारी पूल स्वच्छ राहावेत यासाठी रेल्वे प्रवासी संघटना वेळोवेळी येथील फलाट तसेच पादचारी पुलावर स्वच्छता मोहीम राबवून फलाट आणि पादचारी पूल स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करते. येथील जंक्शनवरून कोकणात जाणाºया मेल थांबतात तसेच पश्चिम रेल्वेच्या दिशेने धावणाºया शटल गाड्याही येथून सुटतात. यामुळे दिवा जंक्शनला अनन्यसाधारण महत्व आहे. येथील आठही फलाटावर नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते. रोज पावणेदोन लाख प्रवासी प्रवास करतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रवास करणाºया प्रवाशांसाठी येथील फलाट नंबर एक आणि दोनच्या टोकाला (मुंबईच्या दिशेला) फक्त एकच स्वच्छता गृह आहे. यामुळे तेथे नेहमी गर्दी असते. या स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेकडे अनेकदा दुर्लक्ष होते. यामुळे तेथून निघणा-या असाह्या दुर्गंधीमुळे प्रवाशांना त्रास होते.

येथील फलाट क्र मांक एक आणि दोनवरील काही पंख्यांची मागील काही महिन्यांपासून साफसफाई करण्यात आलेली नाही. फलाट क्र मांक ५ आणि ६ च्या दोन्ही दिशेला असलेल्या पादचारी पुलाच्या बाजूला कचरा पडला असून याचा गैरफायदा घेऊन काही प्रवासी त्याच्या आजूबाजूला उभे राहून लघुंशका करतात. यामुळे तेथे दुर्गंधी पसरते. येथील फलाटावरील सर्वच पाणपोई बंद असल्यामुळे प्रवासी त्यांचा वापर कचराकुंडीप्रमाणे करतात. तेथे नेहमी पाणी पिऊन रिकाम्या झालेल्या बाटल्या तसेच खाद्यपदार्थ खाऊन फेकलेल्या कागदांचा खच पडलेला असतो. काही कचराकुंड्यामधील कचरा वेळच्यावेळी तेथून हटविण्यात येत नसल्यामुळे त्या तुडुंब भरलेल्या असतात. फलाट क्र मांक सात आणि आठवर सुरु असलेल्या कामांमुळे काही भागात मातीचा तसेच लोखंडाचा किस पडला आहे. याचा प्रवाशांना त्रास होत आहे.

स्वछतेबाबत कितीही जनजागृती केली तरी कुठेही थुंकण्याच्या सवयीत बदल न करण्याचा तसेच हम नही सुधरेंगे या धोरणाचा काही रेल्वे प्रवाशांनी अवलंब केल्यामुळे काही महिन्यांपूर्वी विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून मुंब्रा रेल्वे स्थानकावरील भिंतीवर काढलेल्या जनजागृती चित्रांना अल्पवधीतच विद्रुप केल्याने विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले. पान खाऊन थुंकण्याच्या काही प्रवाशांच्या सवयीमुळे येथील दोन्ही फलाटा वरील खांबे तसेच भिंती पानाच्या पिचकाºयांनी रंगल्या आहेत.येथील आरक्षण केंद्र परिसरात अनेकदा वापर न केलेले अर्ज फेकून दिले जातात. येथील मुख्य तिकीट घराजवळ अनेक ठिकाणी जाळ््या लटकत आहेत.तसेच तिकीट खिडकीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या सज्जाचे प्लास्टर तेथेच पडले असून,तेथे इतरही अनेक टाकाऊ वस्तू ठेवलेल्या आहेत.


अंबरनाथमध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य
अंबरनाथ रेल्वेस्थानक परिसराच नेहमीच अस्वच्छता असते. स्टेशन परिसरात सोबतच स्टेशनच्या हद्दीतील परिसरही स्वच्छतेपासून वंचित राहिला आहे. आजूबाजूची झोपडपट्टी आणि त्यातील रहिवाशांचा प्रचंड त्रास रेल्वेस्थानकाला होत आहे. या भागातील नागरिक स्टेशन परिसरातच अस्वच्छता करीत आहेत. त्यावर रेल्वे प्रशासनाने अद्यापही तोडगा काढलेला नाही. अंबरनाथ रेल्वेस्थानक आज तीन फलाट
असून या तिन्ही फलाटाच्या स्वच्छतेची जबाबदारी ही रेल्वे प्रशासनाची आहे.

रेल्वेने आपल्या कामगारांमार्फत स्टेशनची स्वच्छता करण्याचे काम केले. मात्र हे कर्मचारी काम करताना हलगर्जीपणा करीत असल्याने आता रेल्वेने स्वच्छतेसाठी ठेकेदार नेमले आहेत. ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांकडून स्टेशनची स्वच्छता केली जाते. मात्र आजही अनेक ठिकाणी स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. स्टेशनच्या सुरूवातीलाच अनेक भाजीविक्रेते हे रात्री उरलेली भाजी थेट स्टेशनच्या आवारात फेकून निघतात.त्यामुळे कुजलेल्या भाजीची दुर्गंधी येते. स्वामीनगर भागातील नागरिकही अस्वच्छता निर्माण करतात.

कचरा हा स्टेशन परिसरात टाकतात. फलाटावर स्वच्छता दिसत असली तरी फलाटाखाली घाणीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या भागातील स्वच्छता करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणेची गरज आहे. स्टेशन परिसरात जमा होणारा कचराही तासनतास डस्टबीनमध्ये पडून असतो. त्यामुळे दुर्गंधी पसरते. अंबरनाथ फलाट क्र मांक तीनवर असलेल्या एकमेव स्वच्छतागृहाची योग्य निगा राखली जात नाही. स्टेशन परिसरात बसण्यासाठी तयार करण्यात आलेले कठडे आणि बाकडेही नेहमी स्वच्छ केले जात नाहीत.

स्वच्छतागृहातून दुर्गंधी
मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक अशी ख्याती असलेल्या डोंबिवली रेल्वे स्थानकातून प्रवाशांना असंख्य गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सर्वाधिक गर्दीचे नव्हे तर सर्वाधिक गैसोयींचे स्थानक अशी नवी ओळख या स्थानकाची होत आहे. या स्थानकात एकूण ५ फलाट आहेत. दोन दशकांमध्ये या स्थानकाच्या रचनेत फारशी बदल झालेली नाही.
अद्ययावत स्वच्छतागृहांची सुविधा नसल्याने फलाट क्रमांक २ वरील स्वच्छतागृहामधून दिवसरात्र दुर्गंधी येत असते. लोकल फलाट १ वर येताना त्या स्वच्छतागृहाच्या घाणीमुळे प्रवाशांना दरवाजात उभे राहणे नको होते. फलाट ५ वरील स्वच्छतागृहाचे नूतनीकरण झालेले असले तरीही ते अनेकदा बंदच असते. त्यामुळे ते असून नसल्यासारखे आहे. फलाट ३/४ वरील कल्याण दिशेकडील स्वच्छतागृहाला परिसरातील रहिवाशांनी विरोध केला होता. त्यामुळे ते वादातच आहे. आता तर कल्याण दिशेकडील पादचारी पूल तोडल्यापासून त्या ठिकाणी प्रवासी जाणे टाळतात. त्यामुळे फलाट ३/४ वर स्वच्छतागृहासाठी अनेक प्रवासी मुंबईकडील पादचारी पुलाखाली स्वत:चा जीव धोक्यात घालून जातात. याची रेल्वे प्रशासन दखल घेत नसल्याने स्थानकातील स्वच्छतागृहाची समस्या कायम आहे.


कच-याचे ढीग
बदलापूर रेल्वेस्थानक हे प्रवाशांनी नेहमीच गजबजलेले असते. क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची ये-जा बदलापूर स्थानकातून होते. प्रत्यक्षात प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक असलेली स्वच्छता या ठिकाणी दिसत नाही. बदलापूर स्थानकाच्या कर्जत दिशेला आणि मुंबई दिशेला संपताच कचºयाचे ढीग दिसतात. मात्र हे ढिगारे स्वच्छ करायला कधी पंधरा दिवस लागतात तर कधी महिना लागतो. तसेच रेल्वेस्थानक परिसरातील कचºयाची स्वच्छता करण्यासाठी जे कामगार नेमण्यात आले आहेत ते नियमित काम करताना दिसत नाहीत. मुंबई दिशेला याठिकाणी फलाट संपतो त्याठिकाणी विक्रेते नियमित कचरा टाकतात. मात्र हा कचरा उचलण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासन करताना दिसत नाही.
 

Web Title: Thane, Kalyan Railway Station removes unclean reprimands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.