401 गावांत पाणीटंचाईमुळे महिलांच्या डोक्यावर हंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 11:35 PM2021-03-07T23:35:00+5:302021-03-07T23:35:17+5:30

मार्चमध्येच तीव्र झळा : टॅंकरद्वारे करावा लागणार पाणीपुरवठा

Pots on women's heads due to water scarcity in 401 villages | 401 गावांत पाणीटंचाईमुळे महिलांच्या डोक्यावर हंडा

401 गावांत पाणीटंचाईमुळे महिलांच्या डोक्यावर हंडा

Next

सुरेश लोखंडे

ठाणे : जिल्ह्याला नैसर्गिक पाण्याचे स्राेत लाभलेले आहेत. मुबलक पाण्याचे वैभव लाभलेल्या या जिल्ह्यातील गावपाड्यांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. यंदाही १०७ गावे आणि २९४ पाडे आदी ४०१ गावपाड्यांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. सध्या जिल्ह्यातील बहुतांशी गावपाड्यातील महिला डोक्यावर हंडा घेऊन पिण्याच्या पाण्याच्या शोधात वणवण करत आहेत.

जागतिक दर्जाच्या बृहन्मुंबईच्या नगर आणि उपनगर या दोन्ही जिल्ह्यांसह ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगर परिषदा, दोन नगरपंचायती आदी शहरांना या गावपाड्यांच्या शेजारील धरणांतून पाणीपुरवठा होतो. धरणातील पाण्याचा लाभ या गावपाड्यांच्या पाणीपुरवठ्याला तसेच शेती सिंचनासाठी  मिळत नसल्याची खंत  ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. यंदाही ४०१ गावपाड्यांना तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. त्यावर दरवर्षाप्रमाणे यंदाही ३२ कोटी २९ लाख रुपये खर्चाच्या नियोजनाला जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली आहे. 
मुंबईसह जिल्ह्यातील महानगरांना मुबलक पाणीपुरवठा करण्यात धन्यता मानणारे पाडे प्रत्येक उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात असतात.  त्यांच्या या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी दरवर्षी कोटीच्या कोटी रुपये खर्च होतात. यंदाही १०७ गावे २९४ पाडे आणि  १३४ पाणीपुरवठा योजनांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. त्यासाठी तीन कोटी ८२ लाख रुपये खर्चाला मान्यता मिळाली आहे. 

पाणीटंचाईसाठी आराखडा तयार
यंदाच्या टंचाईवर मात करण्यासाठी ३२ कोटी २९ लाख रुपये खर्चाचे नियोजन केले आहेत. या खर्चातून ७६ गावे, ५२ पाडे आणि १२९ नळपाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती हाती घेण्यात आली आहे. त्यावर तब्बल १८ कोटी ९९ लाखांचा खर्च होणार आहे. सहा गावांच्या व ११ पाड्यांच्या आणि १७ योजनांच्या कूपनलिकांच्या दुरुस्तीलाही चार लाख रुपये खर्चाची तजवीज केली आहे.

शहापूरची धरणांचा तालुका म्हणून ओळख
ठाणे : शहापूर तालुक्यातील ७५ गावे, २४५ पाडे आणि १०६ योजनांसाठी टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. त्यासाठी तीन कोटी चार लाखांची तरतूद करण्यात आली आहे. याप्रमाणेच मुरबाडच्या २४ गावांसह ३८ पाडे आणि २१ योजना, भिवंडीचे आठ गावपाडे, तीन पाणीपुरवठा योजना आणि अंबरनाथमधील ११ गावपाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे.

बैलगाडी, टँकरने पाणीपुरवठा
शहापूर तालुक्यातील कसारा, खर्डी, वाशाळा आदी गावांसह परिसरातील पाड्यांमध्ये सध्या तीव्र टंचाई जाणवत आहे. त्यांना त्वरित बैलगाडी, टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी या गावांच्या दौऱ्याप्रसंगी शनिवारी केली आहे. जिल्ह्यातील गावपाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी तीन कोटी ८२ लाखांची तरतूद केली आहे.

तात्पुरत्या योजनांवर सात कोटी ९३ लाखांचा खर्च
 जिल्ह्यातील १५ गावे, १३ पाडे आणि २४ पाणीपुरवठा योजनांना तात्पुरता पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी सात कोटी ९३ लाख रुपये खर्चाचे नियोजन केले आहे. यामध्ये सर्वाधिक कल्याणची आठ गावे, तीन पाडे आणि दहा पाणीपुरवठा योजनांच्या तात्पुरत्या पाण्यासाठी दोन कोटी १९ लाखांचा खर्च होईल. तर शहापूरच्या चार गावांसह आठ पाडे आणि १२ योजनांवरही साडेतीन कोटींचा खर्च होणार आहे. मुरबाडच्या दोन योजना, सहा गावपाड्यांच्या तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनांवर दोन कोटी २० लाख खर्च करण्यात येणार आहे.

Web Title: Pots on women's heads due to water scarcity in 401 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.