Maharashtra Election 2019: ईव्हीएमबद्दल शंकेमुळे मतदान कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 01:23 AM2019-10-20T01:23:18+5:302019-10-20T05:40:30+5:30

Maharashtra Election 2019: मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, हे माहीत असूनही शहरी भागात ग्रामीण भागापेक्षा कमी मतदान होते हे सत्य आहे.

Maharashtra Election 2019: Voting down due to doubts about EVM machine | Maharashtra Election 2019: ईव्हीएमबद्दल शंकेमुळे मतदान कमी

Maharashtra Election 2019: ईव्हीएमबद्दल शंकेमुळे मतदान कमी

Next

- प्रा. सुनीता कुलकर्णी

मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, हे माहीत असूनही शहरी भागात ग्रामीण भागापेक्षा कमी मतदान होते हे सत्य आहे. अनेक सुशिक्षित माणसे या काळात सहलीला जातात. वास्तविक, टी.व्ही व अन्य प्रसारमाध्यमांतून मतदानाचे महत्त्व व आवाहन वरचेवर केले जाते. तरीही मतदानाची टक्केवारी वाढत नाही. मतदारांच्या मनात इतकी उदासीनता का आहे? याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
या उदासीनतेची काही कारणे अशी आहेत.

१) उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी
२) घराणेशाही
३) राजकीय पक्षांनी दिलेली खोटी आश्वासने.

एकूणच राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. सेवेपेक्षा व्यवसाय असे स्वरूप प्राप्त झाले आहे. पैशांचा वाढता वापर हा गुंतवणूक व त्यातून परतावा या तत्त्वानुसार केला जात आहे. कोणीही निवडून आले तरी स्थितीत फरक पडत नाही, हा अनुभव असल्याने ही उदासीनता आणखीन वाढली आहे.

त्यातच ईव्हीएमबद्दल लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे, त्यामुळेही लोक मतदानाला उत्साहाने जात नाहीत. ही स्थिती बदलावी, याकरिता ठाणे मतदाता जागरण अभियान सतत प्रयत्नशील असते. नागरिकांना उत्तम आरोग्यसेवा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, योग्य त्या सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. याकरिता प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना उत्तरदायी करण्याचा आग्रह नागरिकांना बरोबर घेऊन आम्ही धरत असतो.

अभियानाने महापालिका निवडणुकीत सुशिक्षित उमेदवार देऊन एक प्रयत्न केला. त्यांचा सर्व प्रचार कमीतकमी पैशांत होऊ शकतो, हे प्रत्यक्ष करून दाखवले. मतदारांची वृत्ती बिघडवण्याचे काम सत्ताधारी व विरोधी पक्ष करीत असतात, आमिष दाखवून मते घेणे हे होत असले तरी अंतिमत: ते नागरिकांच्या हिताविरोधी असते हे आता कळायला लागले आहे. चिरागनगरमध्ये महिलांनी उमेदवारांना फक्त १० मिनिटे पाणीपुरवठा का करण्यात येतो, यावरून सतत प्रश्न विचारले. तसेच तरुणांनी आरेमधील वृक्षतोडविरोधी आवाज उठवला.

जेलमध्ये गेले, ही उदाहरणे बदल घडत आहेत, याची आहेत. याबाबत केवळ निवडणुकीच्या वेळी नाही तर सतत पुढील काळातही जनजागृती करणे ही अभियानाची भूमिका आहे. आपल्या मत देण्याने फरक पडू शकतो, याची जाणीव महत्त्वाची आहे. नागरिकांना गृहीत धरण्याची वृत्ती राजकारण्यांनी सोडायला हवी. संघटित मतदार हे करू शकतात, या दिशेनेच ठाणे मतदाता जागरण अभियानाचे काम सुरू आहे. प्रत्येकाने आपली सद्सद्विवेकबुद्धी शाबूत ठेवून मतदान करावे.
 

Web Title: Maharashtra Election 2019: Voting down due to doubts about EVM machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.