सर्वोच्च न्यायालयात वकील का दिला नाही? याचा खुलासा सरकारने करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 01:07 PM2021-09-14T13:07:45+5:302021-09-14T13:08:55+5:30

 ओबीसी समाजाचा विश्वासघात करणाऱ्या आघाडी सरकार विरोधात भाजपा तर्फे राज्यभर आंदोलन 

Why not give a lawyer in the Supreme Court? This should be disclosed by the government | सर्वोच्च न्यायालयात वकील का दिला नाही? याचा खुलासा सरकारने करावा

सर्वोच्च न्यायालयात वकील का दिला नाही? याचा खुलासा सरकारने करावा

Next

सोलापूर - ओबीसी समाजाचा विश्वासघात  करून ओबीसी आरक्षण घालविणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी तर्फे उद्या 15 सप्टेंबर रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी घोषणा  सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी मंगळवारी केली. आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकिलच दिला नाही, या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपावर मुख्यमंत्री ठाकरे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उत्तर द्यावे, अशी मागणीही श्रीकांत देशमुख यांनी केली.

श्रीकांत देशमुख यांनी सांगितले की, गेले सहा महिने आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत टोलवाटोलवी करत आहे. ओबीसी समाजाचा इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करा, असे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने राज्य सरकारला सातत्याने सांगितले आहे. मात्र आघाडी सरकारने गेल्या सहा महिन्यांत काही हालचालीच केल्या नाहीत.  इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आघाडी सरकारने निधीही दिला नाही. या हलगर्जीचा परिणाम ओबीसी आरक्षणाशिवाय 5 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यात झाला आहे.

सत्ताधारी पक्षातील वजनदार गटाला पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका ओबीसी समाजाला आरक्षण न देताच घ्यावयाच्या असल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडली नाही. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात वकिलच उभा केला नाही असे सत्ताधारी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणतो आहे. विधी व न्याय खात्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी व आघाडी सरकारचे पालक म्हणविणाऱ्या शरद पवार यांनी नाना पटोले यांच्या आरोपावर खुलासा करावा, असेही त्यांनी सांगितले. 

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत असे वारंवार सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आरक्षण टिकविण्यासाठी काहीच हालचाल केली नाही.ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे उद्या 15 सप्टेंबर रोजी तालुका पातळीपर्यंत आंदोलन केले जाईल, असेही श्रीकांत देशमुख यांनी नमूद केले.

या पत्रकार परिषदेला जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, भाजपा शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, भाजपा ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ढगे, ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष राम वाकसे, ओबीसी मोर्चा महिला शहर अध्यक्ष अर्चना वडनाल, ओबीसी मोर्चा महिला जिल्हा अध्यक्ष माया माने आदी उपस्थित होते.

Web Title: Why not give a lawyer in the Supreme Court? This should be disclosed by the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.