बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचे २० टक्के रुग्ण चाळिशीच्या आतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 12:26 PM2020-09-29T12:26:44+5:302020-09-29T12:29:10+5:30

जागतिक हृदय दिन : बदलती जीवनशैली कारणीभूत, तणाव अन् फास्टफूडही धोकादायक

Due to changing lifestyles, 20% of heart patients are in their forties | बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचे २० टक्के रुग्ण चाळिशीच्या आतील

बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचे २० टक्के रुग्ण चाळिशीच्या आतील

googlenewsNext
ठळक मुद्देसोलापूर शहरात प्रदूषण व धूळ जास्त आहे. याचा थेट संबंध हृदयरोगाशी येत नाही फुप्फुसाचे आजार असल्याने त्याचा ताण हा हृदयावर पडतोकामाच्या बदललेल्या वेळामुळे तसेच आठ तासांपेक्षा अधिक काम केल्याने शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात

सोलापूर : हृदयविकाराच्या आजाराला चाळीस वर्षांपुढील लोक बळी पडतात, हा समज आता खोटा ठरत आहे. या आजाराच्या एकूण रुग्णांपैकी २० टक्के रुग्ण हे चाळिशीच्या आतील आहेत. २० वर्षांपूर्वी हे प्रमाण फक्त दोन टक्के होते. यात आता वाढ झाली आहे.

चाळिशीच्या आत हृदयविकार होणे याचे प्रमुख कारण म्हणजे बदलती जीवनशैली, खाण्याच्या पद्धतीत बदल, फास्ट फूड, तणाव ही आहेत. मधुमेह आणि रक्तदाबाचा आजार असणाºया रुग्णाला हृदयविकार होण्याची शक्यता जास्त असते. कामाचा ताण वाढल्यामुळे तरुणाई मोबाईल, लॅपटॉपशिवाय राहू शकत नाही. कामाव्यतिरिक्त स्वत:ला वेळ देणे महत्त्वाचे आहे. तणाव कमी करण्यासाठी आपल्या आवडीच्या क्षेत्र किंवा कलेला वेळ देऊन त्यातून आनंद घ्यायला हवा. वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप हे देखील महत्त्वाचे आहे. पुरेशी झोप घेतल्यास थकलेल्या शरीराला आराम मिळतो. शरीर पुन्हा काम करण्यास सज्ज होते. कामाच्या बदललेल्या वेळामुळे तसेच आठ तासांपेक्षा अधिक काम केल्याने शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात.

सोलापूर शहरात प्रदूषण व धूळ जास्त आहे. याचा थेट संबंध हृदयरोगाशी येत नाही, तरी देखील या वातावरणामुळे अस्थमा किंवा फुफ्फुसासंबंधी आजार उद्भवू शकतात. फुप्फुसाचे आजार असल्याने त्याचा ताण हा हृदयावर पडतो. यामुळे हृदयविकाराचा झटका येत नसला तरी हृदयासंबंधी इतर आजार होऊ शकतात.
--------
प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीची गरज
येत्या १० ते १५ वर्षांमध्ये हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना पाहण्यापेक्षा हा आजार होऊ नये, यावर काम करणाºया डॉक्टरांची संख्या वाढेल. याला प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी असे म्हणतात. काही पाश्चिमात्य देशात सध्या अशा पद्धतीचे उपचार मोठ्या प्रमाणात होत आहेत. भारतात हृदयविकाराचे रुग्ण वाढत असल्याने भविष्यात भारतातही ही उपचार पद्धती वाढण्याची शक्यता आहे. प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमध्ये हृदयविकार होऊ नये, यासाठी सल्ला देणे, उपचार करणे आदी बाबी येतात.

हृदयविकाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. याबाबत अधिक जागृती करण्याची गरज आहे. हृदयविकार झाल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा हा आजार होऊ नये, यासाठी प्रयत्न करायला हवेत. यासाठी जीवनशैलीत चांगले बदल, व्यायाम, योग्य पद्धतीचा आहार घेणे गरजेचे आहे.
- डॉ. अमजद सय्यद,हृदयरोगतज्ज्ञ 

Web Title: Due to changing lifestyles, 20% of heart patients are in their forties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.