देवेंद्र फडणवीसांना राज्यात फिरुन देणार नसल्याचा मराठा स्वराज्य संघाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 06:14 PM2021-06-22T18:14:12+5:302021-06-22T18:17:31+5:30
सांगली : देवेंद्र फडणवीस , भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कारस्थानांमुळेच मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही. त्यामुळे ...
सांगली : देवेंद्र फडणवीस, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कारस्थानांमुळेच मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही. त्यामुळे फडणवीसांना राज्यात फिरुन देणार नाही असा इशारा मराठा स्वराज्य संघाने दिला आहे. मराठ्यांना आरक्षण ही जबाबदारी राज्याची नसून केंद्राची असल्याचा दावा संघाने केला.
अध्यक्ष महादेव साळुंखे, प्रवक्ते पंडितराव बोराडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठकीत मराठा आरक्षणातील अडथळे विशद केले. ते म्हणाले, राज्यातील ९७ टक्के मराठा अत्यंत विपन्नावस्थेत दिवस कंठत आहे. त्यांना आरक्षण मिळू नये यासाठी भाजप, स्वयंसेवक संघ व फडणवीसांनी माणसे पेरली.
मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणारे सर्व याचिकाकर्ते त्यांचेच हस्तक आहेत. त्यामुळे फडणवीस म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहेत, तो धुवून काढण्याचे काम बहुजनांनी करायला हवे. आरक्षणाची प्रक्रिया सुरळीत सुरु असताना त्यांनी गोंधळ निर्माण केला. त्यांचा खरा चेहरा समोर आणण्याचे काम आम्ही करणार आहोत.
ते म्हणाले, ओबीसी आरक्षणाविरोधात फडणवीस सरकारने २०१७ मध्ये अध्यादेश काढला, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था व राजकारणातून ओबीसी हद्दपार होण्याची वेळ आली आहे. त्याचे खापर महाविकास आघाडीवर फोडण्याचा प्रयत्न सुरु आहे. राजकारणापोटी संपूर्ण महाराष्ट्राचे नुकसान केले जात आहे हे खपवून घेणार नाही. फडणवीस राज्यात कोठेही गेले तरी त्यांच्या गाड्या अडवू. फिरुन देणार नाही.
यावेळी संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष गायचकवाड, अविनाज शिंदे, मनपा क्षेत्र अध्यक्ष सुधीर चव्हाण, कवठेमहांकाळचे अमोल जाधव, शरद पवार, गोपाळ पाटील, सतीश पाटील, पंडित पाटील, शंकर शिंदे आदी उपस्थित होते.
भाजपमधील मराठ्यांनी विचार करायला हवा
साळुंखे म्हणाले, भाजपमधील मराठा नेत्यांनी समाजाशी निष्ठा दाखवून दिली पाहिजे. भाजपमध्ये राहून आपल्याच समाजबांधवांच्या आरक्षणाला विरोध करणे त्यांना शोभणारे नाही. पक्षाची तळी उचलताना आपण समाजाचे नुकसान करत आहोत हे लक्षात ठेवले पाहिजे.