निवडणूक आयोगाने तारतम्य बाळगणे गरजेचे होते - पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 01:55 AM2021-05-02T01:55:55+5:302021-05-02T01:56:23+5:30
महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी जयंत पाटील म्हणाले, देशात कोरोनाची लाट वेगाने वाढत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : संपूर्ण देशात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात पसरत असताना निवडणूक आयोगाने कोणत्याही निवडणुका घेणे चुकीचे होते. ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या आहेत तेथे कोरोनाचे गंभीर दुष्परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे निवडणुकांचे नियोजन करताना निवडणूक आयोगाने तारतम्य बाळगणे आवश्यक होते, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली.
महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी जयंत पाटील म्हणाले, देशात कोरोनाची लाट वेगाने वाढत आहे. संसर्ग टाळण्यासाठी देशभरात कोणत्याही निवडणुका घेणे उचित नव्हते. मात्र, निवडणूक आयोगाने देशभरात निवडणुका घेतल्या. निवडणूक आयोगाने जरा तारतम्य बाळगले असते तर परिस्थिती गंभीर बनली नसती. ज्या राज्यात निवडणुका झाल्या तेथे कोरोनाचे परिणाम दिसून येत आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणी पोलीस अधीक्षकांकडून माहिती घेतली आहे. पोलिसांनी याआधी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणात आणखी कोणीही दोषी आढळला तरी त्याच्यावरही कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.