औषधे कुचकामी; द्राक्षबागा रोगांनी निकामी : प्रभावहीन औषधांतून लाखोंची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 09:36 PM2019-12-05T21:36:46+5:302019-12-05T21:38:35+5:30

हजारो रुपये खर्च करूनही बोगस औषधे कुचकामी ठरत असल्याने द्राक्ष बागायतदारांना फटका बसला आहे. काही बोगस औषध कंपन्यांनी पाळेमुळे रोवल्याचे चित्र आहे.

Drugs ineffective | औषधे कुचकामी; द्राक्षबागा रोगांनी निकामी : प्रभावहीन औषधांतून लाखोंची फसवणूक

औषधे कुचकामी; द्राक्षबागा रोगांनी निकामी : प्रभावहीन औषधांतून लाखोंची फसवणूक

Next
ठळक मुद्दे बागायतदारांना फटका

दत्ता पाटील

तासगाव : तासगाव तालुक्यात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रित करून बोगस औषधांचा सुळसुळाट झाल्याचे चित्र आहे. खराब हवामानामुळे द्राक्षबागांत रोगांनी थैमान घातले आहे. पण बागेतील रोग आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या औषध फवारणींचा प्रभावच जाणवत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हजारो रुपये खर्च करूनही बोगस औषधे कुचकामी ठरत असल्याने द्राक्ष बागायतदारांना फटका बसला आहे. काही बोगस औषध कंपन्यांनी पाळेमुळे रोवल्याचे चित्र आहे.

तासगाव तालुक्यात द्राक्षक्षेत्र मोठे आहे. एक एकर द्राक्षबागेसाठी सुमारे एक लाख रूपये केवळ औषधांवर खर्च होतात. वाढत्या महागाईत औषधांचेही दर वाढले आहेत. द्राक्षबागांसाठी आंतरराष्टÑीय औषध कंपन्यांपासून अगदी लोकल कंपन्यांपर्यंत औषधांची निर्मिती करून विक्री केली जाते.

यंदा द्राक्ष हंगामात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात रोगांचा सामना करावा लागत आहे. हंगामाच्या सुरुवातीपासूनच निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्षबागांना रोगांनी घेरले आहे. द्राक्षबागा जतन करण्यासाठी शेतकºयांकडून मोठ्या जिद्दीने औषध फवारणीसाठी धडपड सुरु असते. कोणताही विचार न करता, अनेक महागडी आणि बाजारात उपलब्ध असणारी औषधे फवारणी करून बागा जतन करण्यासाठी धडपड सुरु आहे. पण बागा वाचवण्यासाठी फवारणी केलेल्या औषधांना गुणवत्ताच नसल्याने, हजारो रुपये खर्ची करूनही काही औषधांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचा अनुभव अनेक द्राक्ष बागायतदारांना आला आहे. त्यामुळे हजारो रुपये खर्च करूनही द्राक्षबागांना रोगांचा फटका बसतच आहे.

तासगाव तालुक्यात अनेक बोगस औषधांची राजरोसपणे विक्री सुरु आहे. काही बनावट कंपन्यांमार्फतही औषधे शेतकºयांच्या माथी मारली जात आहेत. बोगस औषधांप्रमाणेच बोगस औषध कंपन्यांचाही सुळसुळाट झाला आहे. केवळ लेबल लावून कंपनी प्रॉडक्ट असल्याचे भासवून अनेक बोगस औषधे शेतकºयांच्या माथी मारली जात आहेत.

औषधांची बोगसगिरी राजरोसपणे सुरु असताना, कृषी विभागाकडून मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. औषधांची गुणवत्ता आणि त्यांची पडताळणी न करताच औषधे खपवली जात आहेत. एकीकडे औषधासाठी खर्च आणि दुसरीकडे त्यांचा प्रभावच नसल्याने बागेचे होणारे नुकसान, अशा दुहेरी कात्रीत द्राक्ष बागायतदार सापडला असून, कृषी विभागाच्या अधिकाºयांनी याची सखोल चौकशी करून बोगस औषधांवर बंदी आणावी, अशी मागणी होत आहे.
 

तासगाव तालुक्यात बोगस औषधांची विक्री करून द्राक्ष उत्पादक शेतकºयांची राजरोस लूट सुरु आहे. मात्र याबाबत तालुका कृषी विभाग गांभीर्यहीन आहे. तालुक्यात औषध विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. मात्र ऐन द्राक्ष हंगामात गुणवत्तेची पडताळणी करणारे अधिकारी तालुक्यात दिसून येत नाहीत. औषध दुकानांची तपासणी करण्याचे गरज आहे. कृषी विभागाच्या अधिकाºयांकडून केवळ कागदी घोडे नाचवून कारभार सुरु आहे.
-संतोष आठवले, सदस्य, पंचायत समिती तासगाव.

 

Web Title: Drugs ineffective

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.