लाॅकडाऊन करण्यापेक्षा आता आम्हालाच बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:31 AM2021-04-10T04:31:30+5:302021-04-10T04:31:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शासनाने शनिवार, रविवार लाॅकडाऊन घोषित केले असले तरी सोमवार ते शुक्रवार दिवसा जमावबंदी व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : शासनाने शनिवार, रविवार लाॅकडाऊन घोषित केले असले तरी सोमवार ते शुक्रवार दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदी जाहीर केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवसाय बंद ठेवण्याच्या सूचना केल्याने व्यावसायिक आर्थिक संकटात आले आहेत. व्यवसायासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते, विजेची बिले, देखभाल-दुरुस्ती खर्च, कामगारांचे वेतन, शिवाय अन्य खर्चासाठी पैसा कुठून आणावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनामुळे शासनाने ‘ब्रेक द चेन’ घोषित केले असले तरी खर्च भागविण्यासाठी व्यावसायिकांना गळ्यातील चेन मोडण्याची वेळ आली आहे.
गतवर्षी मार्चमध्ये लाॅकडाऊन घोषित झाले. दोन महिन्यांच्या कडकडीत बंदनंतर टप्प्याटप्प्याने विविध व्यवसाय सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली. मात्र कोरोनामुळे गेल्या आठ महिन्यांत व्यवसाय रडतखडतच सुरू होते. हाॅटेल व्यवसायाला तर उशिरा परवानगी मिळाली. मात्र बंद कालावधीत झालेले नुकसान भरून निघाले नाही. तोपर्यंत पुन्हा लाॅकडाऊन घोषित केल्याने कुटुंबाचा गाडा चालविणेही अवघड बनले आहे.
कर्जाचे हप्ते कसे भरावे?
उद्योग-व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते लाॅकडाऊनच्या काळात व्यवसाय ठप्प झाल्याने, कसे भरावेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गतवर्षी बँकांकडून सुरुवातीचे महिने सवलत दिली. मात्र नंतर एकत्रित हप्ते भरून घेतले. महागाईने उच्चांक गाठला आहे. व्यवसाय ठप्प असल्याने खर्च कसे भागवावेत? पुरुष कमावीत असले तर गृहिणींना घरखर्च भागविताना कसरत करावी लागते. गतवर्षीचेच नुकसान भरून काढणे अशक्य झाले असून आता नवीन प्रश्न निर्माण झाला आहे.
लग्नसराईच्या दिवसांत नवऱ्याचा फोटोग्राफी व्यवसाय चालतो. बंदमुळे स्टुडिओ बंद आहे. शिवाय लग्नासाठी मोजक्या माणसांच्या उपस्थितीची अट आहे. कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटल्यामुळे लग्नसमारंभातील खर्चावरही मर्यादा आली आहे. गतवर्षी लाॅकडाऊन झाले. त्याची झळ अद्याप सोसत असताना पुन्हा लाॅकडाऊन धोषित केले. अजून किती सोसावे, आता पोळपाट लाटणे घेऊन बाहेर येण्याशिवाय पर्याय नाही.
- मधुरा मालगुंडकर, गृहिणी
कॅटरिंग व्यवसाय चालवितो. बंदमुळे ऑर्डर रद्द झाल्या. व्यवसाय ठप्प झाला आहे. गतवर्षीचे नुकसान भरून काढणे शक्य झाले नाही. त्यातच आता नवीन संकट त्यामुळे दरवर्षी व्यवसाय बंद ठेवून आर्थिक संकटे सोसावी का? सर्वसामान्यांच्या व्यथा लक्षात घेऊन मार्ग काढावा.
- अंकिता चव्हाण, गृहिणी
हाॅटेल व्यवसाय गतवर्षी दीर्घकाळ बंद राहिला. त्या कालावधीतील कर्जाचे हप्ते, देखभाल-दुरुस्ती खर्च, विजेची बिले, आदी खर्च भागविणे अवघड झाले. कोरोनाचे रुग्ण वाढल्याने पुन्हा लाॅकडाऊन जाहीर केल्याने आता व्यवसायाशिवाय घरखर्च भागविणेही अवघड बनले आहे. शासनाने विचार करावा.
- रोशनी सुर्वे, गृहिणी