राज्य संरक्षित गोपाळगडला आजही टाळे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:28 PM2019-07-27T12:28:10+5:302019-07-27T12:31:29+5:30

खासगी मालकीत अडकल्याचे उजेडात आल्यानंतर गेली १५ ते १७ वर्षे सतत चर्चेत असलेला गुहागर तालुक्यातील अंजनवेलचा गोपाळगड किल्ला राज्य संरक्षित स्मारक झाल्याचे घोषित झाले. मात्र, या किल्ल्याच्या आधुनिक लोखंडी ग्रीलच्या दरवाजावर दोन ठिकाणी कुलूप लावण्यात आल्याने निसर्गप्रेमींमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

Avoid state-protected Gopalgad even today! | राज्य संरक्षित गोपाळगडला आजही टाळे !

राज्य संरक्षित गोपाळगडला आजही टाळे !

googlenewsNext
ठळक मुद्देराज्य संरक्षित गोपाळगडला आजही टाळे !निसर्गप्रेमींमधून नाराजीचा सूर

रत्नागिरी : खासगी मालकीत अडकल्याचे उजेडात आल्यानंतर गेली १५ ते १७ वर्षे सतत चर्चेत असलेला गुहागर तालुक्यातील अंजनवेलचा गोपाळगड किल्ला राज्य संरक्षित स्मारक झाल्याचे घोषित झाले. मात्र, या किल्ल्याच्या आधुनिक लोखंडी ग्रीलच्या दरवाजावर दोन ठिकाणी कुलूप लावण्यात आल्याने निसर्गप्रेमींमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

त्याचबरोबर पश्मिेकडील आणखी एक दरवाजाही ग्रील आणि काट्याकुट्या टाकून बंद केलेला आहे. शासनाचा पुरातत्व विभागाचा संरक्षित स्मारक असा बोर्ड लागलेला असताना तिथे टाळे पाहायला मिळत आहे.


धीरज वाटेकर यांच्यासह स्थानिक दीपक वैद्य, चिपळूणचे सर्पमित्र अनिकेत चोपडे यांच्यासमवेत बहुचर्चित किल्ले गोपाळगडला भेट दिली. यावेळी किल्ल्याच्या गेटला टाळे लावण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

साधारणत: १५/१६ वर्षांपूर्वी सतीश झंजाड आणि बबन कुरतडकर या गिरीमित्र प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी गोपाळगडची शासन दरबारी विक्री झाल्याच्या विरोधात आवाज उठवला होता. त्यानंतर स्थानिक शिवतेज फौंडेशननेही या किल्ल्याच्या संरक्षणार्थ दखलपात्र काम केले आहे. शिवतेज फौंडेशनच्या मनोज बारटक्के यांनीही याबाबत नापसंती व्यक्त केली. याबाबत फौंडेशन पुन्हा आवाज उठवेल, अशी प्रतिक्रिया दिली.


या किल्ल्याच्या संवर्धनासाठी यापूर्वी शिवतेज फाऊंडेशन, अ‍ॅड. संकेत साळवी, सत्यवान घाडे, सुहास जोशी, डोंबिवलीचे गिरीमित्र मंगेश कोयंडे, खेडचे वैभव खेडेकर, दुर्गवीर संस्थेचे संतोष हासुरकर, अजित राणे यांच्यासह अनेकांनी प्रयत्न केले.

महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागामार्फत सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या वास्तू, स्मारके, किल्ले संरक्षित केले जातात. या ठिकाणांना राज्य संरक्षित स्मारके म्हणतात. या ठिकाणांची देखभाल आणि संरक्षणाचे काम राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागामार्फत केले जाते. ऐतिहासिक वास्तू व स्मारके जतन कायदा येथेही लागू करण्यात आला आहे. तरीही गोपाळगडावर टाळे का लावले आहे ?

संरक्षित स्मारकाचा दर्जा

शासनाने आॅगस्ट २०१६मध्ये ऐतिहासिक संरक्षित स्मारकाचा दर्जा दिला. स्वातंत्रप्राप्तीनंतरच्या दस्तऐवजामध्ये सरकारी कातळ अशी नोंद होऊन गोपाळगडाचे अस्तित्व नाहीसे झाले होते. विजापूरच्या आदिलशाही राजवटीमधे सोळाव्या शतकात गोपाळगड बांधण्यात आला. शिवाजी महाराजांनी इ. स. १६६०च्या दाभोळ स्वारीवेळी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला, याचे पुनरुज्जीवन केले. या ठिकाणी मराठ्याच्या नौदलासाठी एक सुसज्ज गोदी बांधण्यात आली.

किल्ल्याचे गोपाळगड असे नामकरण करण्यात आले. इ. स १६९९ मध्ये जंजिऱ्याचा सिद्दी खैरातखान याने किल्ला जिंकला. याच काळात त्याने किल्ल्याचा पडकोट बांधला. १७४५ साली हा किल्ला तुळाजी आंग्रे यांनी जिंकून घेतला. सन १७५५ च्या पेशवे आंग्रे करारानुसार आंग्रेनी हा गड पेशव्यांच्या स्वाधीन केला. पुढे १८१८ पर्यंत तो स्वराज्यात राहिला. १७ मे १८१८ मध्ये इंग्रज कर्नल केनेडीने हा किल्ला जिंकून घेतला.

अनेक राजवटी नांदल्या

वाशिष्ठी नदी ते दाभोळ बंदरपर्यंत व्यापारी गलबतांची ये-जा चालत असे. या मार्गावर नजर ठेवण्यासाठी वाशिष्ठी खाडीच्या उगमाच्या आणि संगमाच्या मुखाजवळ दोन किल्ले उभारण्यात आले. यात अंजनवेलचा गोपाळगड आणि गोवळकोटचा गोविंदगड होते. हे दोन्ही किल्ले वाशिष्ठीचे पहारेकरी म्हणून ओळखले जातात. गोपाळगडावर अनेक राजवटी नांदल्या. सन १६६० दरम्यान गोपाळगड स्वराज्यात आला.

गडकोट राज्याची मिळकत

स्वातंत्र्यात गोपाळगडाला खासगी मालकीचे ग्रहण लागले. गडात आंब्याची बाग झाली. किल्ल्याची तटबंदी कोसळून, खंदक बुजवून दरवाजा करण्यात आला. दरवाजाला ग्रील बसविण्यात आले. या ग्रीलवरून उड्या मारून आत जाऊन शिवप्रेमी हा किल्ला पाहात असतं. पूर्वी या गडावर खासगी मालमत्ता असे लिहिलेला बोर्ड असायचा. गडकोट ही राज्याची मिळकत आहे.

Web Title: Avoid state-protected Gopalgad even today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.