Vidhan Sabha 2019: रायगडच्या सात मतदारसंघांमध्ये युती विरोधात आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 12:11 AM2019-09-22T00:11:05+5:302019-09-22T00:11:28+5:30

सरळ लढतीची शक्यता; राजकीय नेत्यांच्या मोर्चेबांधणीला सुरु वात

Maharashtra Vidhan Sabha 2019 Leaders against the Alliance in seven constituencies of Raigad | Vidhan Sabha 2019: रायगडच्या सात मतदारसंघांमध्ये युती विरोधात आघाडी

Vidhan Sabha 2019: रायगडच्या सात मतदारसंघांमध्ये युती विरोधात आघाडी

googlenewsNext

रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघामध्ये युती विरोधात आघाडी अशीच सरळ लढत पहायला मिळण्याची शक्यता आहे. गेल्या दशकापासून सुरु असलेल्या काँग्रेसला आताची निवडणूक करो या मरो अशीच ठरणार आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेससोबत मजबूत स्थितीमध्ये असणाऱ्या शेकापला अलिबागमध्ये काँग्रेस आणि शिवसेना अथवा भाजपसोबत लढावे लागणार आहे. त्याचप्रमाणे पेण, पनवेल, उरण, कर्जत, महाड आणि श्रीवर्धन मतदारसंघात देखील कडवी झुंज देण्याची तयारी त्यांनी केली आहे. या निवडणुकीत सर्व लक्ष हे श्रीवर्धन मतदार संघावर राहणार आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांची कन्या अदिती तटकरे यांची लढत त्यांचा चुलत भाऊ अवधूत तटकरे यांच्याबरोबर होण्याची शक्यता आहे. युतीचे सध्या तळ््यात मळ््यात असल्याने शिवसेनेसह भाजपच्या उमेदवारांनीही लढतीची पूर्ण तयारी केली आहे.

- आविष्कार देसाई
अलिबाग : २०१४ च्या निवडणुकीत प्रामुख्याने शेकापने अलिबाग, पेणवर लाल बावटा फडकवला होता, तर महाड, उरणवर शिवसेनेचा भगवा फडकला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाची टिकटिक ही श्रीवर्धन आणि कर्जत मतदार संघात ऐकायला मिळाली होती आणि फक्त एकट्या पनवेल मतदार संघामध्ये भाजपचे कमळ फुलले पहायला मिळाले. गेल्या निवडणुकीच्या मानाने २०१९ साली होणारी निवडणूक सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांसाठी अतिशय महत्त्वाची ठरणारी आहे. शिवसेना आणि भाजपची जागा वाटपाबाबतची धुसफूस विरोधकांच्या पथ्यावर पडणार आहे. सध्या अलिबाग, पेण आणि उरण मतदार संघातील जागा भाजप आपल्याकडे खेचण्याच्या प्रयत्नात आहे.

शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असल्याने ते या निवडणुका एकत्र लढणार आहेत. यासाठी अलिबाग, पेण, पनवेल आणि उरण या जागांवर शेकाप लढवणार तर कर्जत आणि श्रीवर्धनची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे. जिल्ह्यात काँग्रेसला सोबत घेण्याबाबत अथवा काँग्रेस त्यांच्या सोबत जाण्याबाबतचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे अलिबाग, पेण, उरण, पनवेल, महाड या जागांवर काँग्रेसने लढत देण्यास तयार असल्याने काही ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढतीचे चित्र दिसल्यास नवल वाटायला नको.

अलिबाग मतदार संघामध्ये शेकापचे आमदार सुभाष पाटील हे उमेदवार आहेत, तर शिवसेनेकडून महेंद्र दळवी आणि रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे आणि भाजपकडून अ‍ॅड.महेश मोहिते यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. अ‍ॅड. मोहिते यांनी तयारीही पूर्ण केली आहे. मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावरही त्यांनी जोर दिला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या महेंद्र दळवी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तशीच परिस्थिती उरण आणि पेण मतदार संघामध्ये आहे. उरणमध्ये भाजपचे महेश बालदी तर पेणमधून काँग्रेसचे माजी मंत्री रवींद्र पाटील हे काही महिन्यापूर्वी भाजपत दाखल झाले आहेत. त्यांनाही भाजपने आमदारकीची उमेदवारी देण्याचे कबूल केले आहे. त्यामुळे तेही उमेदवारीच्या रेसमध्ये असल्याने तेथील शिवसेनेच्या उमेदवारासाठी डोकेदुखी ठरत आहे. उरणमध्येही महेश बालदी यांनी निवडणुकीची तयारी केली आहे. बालदी हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय असल्याने बालदी यांच्या समर्थकांनाही उमेदवारी मिळेल असे वाटत आहे. असा राजकीय तिढा निर्माण झाल्याने परिस्थिती आणखीन गंभीर बनली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे आणि शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्यासाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने त्या दोघांनीही जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. काँग्रेससाठी आताची निवडणूक करो या मरो अशा स्वरूपाची आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री बॅ.ए.आर. अंतुले यांच्यानंतर रायगड जिल्ह्याला सक्षम नेतृत्व लाभलेले नाही. त्यामुळे बिथरलेल्या काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एकसंघ ठेवण्यासाठी आणि मतांचे विभाजन टाळण्यासाठी उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरवावे लागणार आहे.

पालकमंत्र्यांचीही प्रतिष्ठा पणाला
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रायगडच्या पालकमंत्री पदाची धुरा हातामध्ये घेतल्यापासून जिल्ह्यात भाजपची ताकद वाढवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. भाजपला सक्षम करताना त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आणि शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही भाजपमध्ये खेचले आहे. त्यामुळे भाजपची ताकद वाढण्यास मदत झाली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जागा पदरात पाडून त्या जागांवर भाजपचे उमेदवार उभे करणे ही त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे. कारण चव्हाण यांच्या भाजपचा सामना तटकरे आणि पाटील यांच्याशी होणार आहे. त्यातच युती होण्याबाबत स्पष्ट नसल्याने तिढा वाढला.

काँग्रेसचा भोपळा फुटणार
काँग्रेसच्या स्थापनेनंतर रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या निवडणुकीत काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस भोपळा फोडणार का? हे प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

आमदारांचे भवितव्य पटलावर
विधानसभा निवडणुकीसाठी रायगडमधील सात मतदारसंघामध्ये राजकीय पक्षांकडून तयारी सुरू आहे. अलिबागचे आमदार पंडित पाटील, श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे, उरणचे आमदार मनोहर भोईर, कर्जतचे आमदार सुरेश लाड आणि पेणचे आमदार धैर्यशील पाटील यांचे राजकीय भवितव्य पटावर लागले आहे.

‘वंचित’चे काय?
रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघामध्ये वंचितची ताकद नसल्याने सध्या कोणताच प्रमुख राजकीय पक्ष त्यांना गंभीरपणे घेताना दिसत नाही. वंचितकडूनही काही मतदार संघामध्ये त्यांचे उमेदवार विधानसभा निवडणुकीत उभे राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

तटकरे-पाटील यांच्याभोवतीच राजकारण
रायगड जिल्ह्यात खा.सुनील तटकरे आणि आ. जयंत पाटील या दोन दिग्गजांचे वर्चस्व आहे, जिल्ह्याचे राजकारण यांच्या भोवतीच फिरत आले आहे. मात्र २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर जिल्ह्यातील चित्र हळूहळू बदलत असल्याचे दिसून येते. भाजपने जनतेच्या मनात विश्वास निर्माण करताना विकासकामांवर जोर दिला आहे. यातील प्रमुख बाब म्हणजे भाजपचे नेते स्वत: ठेका घेत नाहीत तर विकासकामे कार्यकर्त्यांना देतात, त्यामुळे त्यांच्यावर थेट आरोप होत नाहीत. ग्रामपंचायत,नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपने चांगलीच मुसंडी मारली आहे, या मागे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे तटकरे, पाटील यांच्याविरोधात चव्हाण असा तगडा सामना रंगणार आहे.

प्रथमच नशीब आजमावणार
अदिती तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
राजेंद्र ठाकूर (काँग्रेस)
अ‍ॅड. महेश मोहिते (भाजप)
महेश बालदी (भाजप)
सुरेश टोकरे (शिवसेना)
समीर शेडगे (शिवसेना)
प्रीतम म्हात्रे (शेकाप)

सर्वांत ज्येष्ठ आमदार
सुरेश लाड (राष्ट्रवादी काँग्रेस)
प्रथम निवडून आलेले
सुभाष पाटील (शेकाप)
मनोहर भोईर (शिवसेना)
अवधूत तटकरे (राष्ट्रवादी )

दुरंगी लढत
महाड
श्रीवर्धन

तिरंगी लढत
अलिबाग
पेण
उरण
पनवेल

बहुरंगी लढत
कर्जत

सध्याचे पक्षीय बलाबल
शेकाप 02
शिवसेना 02
राष्ट्रवादी 02
भाजप 01

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 Leaders against the Alliance in seven constituencies of Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.