CoronaVirus News: कोरोनाकाळात आश्रमांतील वृद्धांची माणूसभेटीसाठी घालमेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 12:08 AM2021-04-08T00:08:51+5:302021-04-08T00:09:08+5:30

आप्तांनीही पाठ फिरवलेल्या अनेक आश्रमांतील वृद्धांची अशीच माणूसभेटीसाठी घालमेल होत आहे, तर कोणताही निधी नसताना वृद्धाश्रम चालविणे जिकिरीचे झाले आहे

CoronaVirus News senior citizens in old age homes unable to meet persons due to covid | CoronaVirus News: कोरोनाकाळात आश्रमांतील वृद्धांची माणूसभेटीसाठी घालमेल

CoronaVirus News: कोरोनाकाळात आश्रमांतील वृद्धांची माणूसभेटीसाठी घालमेल

Next

- निखिल म्हात्रे

अलिबाग : कोरोनाच्या जागतिक संकटाने तत्त्वज्ञानापासून ते सामान्य जीवन संघर्षाचे पैलू नव्याने पाहायला लावले. सोशल डिस्टन्सिंगमुळे बाहेरील व्यक्ती भेटत नसल्याने रोगापेक्षा उपाय भयंकर, असे म्हणण्याची वेळ आधीच विजनवासाचे चटके सोसत असलेल्या वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांवर आली आहे. कोरोनाचे फंडे काहीही असो. आप्तांनीही पाठ फिरवलेल्या अनेक आश्रमांतील वृद्धांची अशीच माणूसभेटीसाठी घालमेल होत आहे, तर कोणताही निधी नसताना वृद्धाश्रम चालविणे जिकिरीचे झाले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जगभरात टाळेबंदी व संचारबंदी करण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण जग थांबले. काहींना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. त्यामुळे रोजची देवाणघेवाणीची आर्थिक चेन तुटली. नागरिकांना आता संसार कसा चालवायचा, असा प्रश्न पडला होता. त्याचवेळी वृद्धाश्रम कसे चालवायचे, त्यामध्ये असलेल्या आजी-आजोबांचा कसा सांभाळ करायचा, असे विविध प्रश्न सतावत होते; मात्र अशावेळी आयुष्यभराची जमा केलेली ठेव मोडून वृद्धाश्रमातील आजी आजोबांचे संगोपन केल्याचे वृद्धाश्रमचालक ॲड. जयेंद्र गुंजाळ यांनी सांगितले. आरोग्याच्या अनेक समस्यांशी लढा देत असलेल्या ज्येष्ठांना या वयात धावपळ करणे शक्य होत नाही; मात्र आजही अनेक ज्येष्ठ नागरिकांना न्यायालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. कितीतरी वर्षांपूर्वीचे खटले आजही सुरूच असल्याने या सर्व गोष्टींमुळे त्यांना उतारवयातही मोठी दगदग सहन करावी लागते. यात त्यांना मोठा आर्थिक खर्चही सोसावा लागतो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसंबंधीचे खटले त्वरित निकाली काढावेत, असे ॲड. जयेंद्र गुंजाळ यांनी सांगितले. 

धकाधकीचे आयुष्य जगल्यानंतर उत्तरार्ध आनंदात आणि निवांत जावा, अशी त्यांची रास्त अपेक्षा आहे. वाढत्या प्रदूषणाचाही त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यांना फिरण्यासाठी निवांत जागा मिळावी यासाठी आता पुढाकार घेण्याची गरज आहे. वस्ती-वस्तीमध्ये विरंगुळा सेंटर असावेत, बगिचे असावेत. अनेक ज्येष्ठ नागरिकांना कुटुंबाचा आधार नसतो त्यामुळे नाइलाजाने त्यांच्यावर वृद्धाश्रमात राहण्याची वेळ येते. त्यामुळे वृद्धाश्रमांचे रूपांतर आनंदाश्रमात व्हावे, याचाही विचार होण्याची गरज असल्याचे गुंजाळ म्हणाले.

आपल्या समाजव्यवस्थेत नवीन काळाशी जुळवून घेण्यासाठी अजूनही कोणते नवीन कौटुंबिक किंवा कुटुंबाबाहेरील घटक यात आपण आणून संपूर्ण सामाजिक व्यवस्थेला एक नावीन्याची जोड देऊ शकतो, याबाबत विचार, तशी मागणी, आपण आपल्याच समाजाकडून, सरकारकडून किंवा संपूर्ण व्यवस्थेकडून का करीत नाही, असा प्रश्न वृद्धाश्रम चालक ॲड. जयेंद्र गुंजाळ यांना पडला आहे.

मुले आणि वृद्ध यांची काळजी, संगोपन हे स्त्रियांचे पारंपरिक कार्यक्षेत्र होते, मात्र आता गेल्या दोन ते तीन दशकांत स्त्रिया अर्थार्जन करून, कुटुंबाचा आर्थिक स्तंभ होऊ लागल्या आहेत. अशावेळी त्यांची पारंपरिक काळजी वाहकाची भूमिका बऱ्याच अंशी बदलली आहे. याची दखल, या पोकळीच्या अर्थकारणामुळे वृद्धांच्या बाबतीत संगोपन, देखभाल या साऱ्यासाठी म्हणावी तशी व्यवस्था अजून अस्तित्वात आलेली नाही.

Web Title: CoronaVirus News senior citizens in old age homes unable to meet persons due to covid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.