'आमचे सरकार म्हणजे ‘सुपरहिट’ सिनेमा; मी कोणाला घाबरत नाही, हिंमत असेल तर समोर या'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 03:20 AM2020-01-16T03:20:32+5:302020-01-16T03:31:31+5:30

गुंड म्हणवून घेणे कमीपणाचे नाही. ती कामाची पद्धत आहे. मला अजूनही लोक म्हणतात, ये तो गुंडा है...मला त्याचे काही वाईट वाटत नाही.

'Our Government is a' superheat 'cinema; I'm not afraid of anyone, if you dare, come out Says Sanjay Raut | 'आमचे सरकार म्हणजे ‘सुपरहिट’ सिनेमा; मी कोणाला घाबरत नाही, हिंमत असेल तर समोर या'

'आमचे सरकार म्हणजे ‘सुपरहिट’ सिनेमा; मी कोणाला घाबरत नाही, हिंमत असेल तर समोर या'

Next

पुणे : मी कोणालाच घाबरत नाही, ना पंतप्रधान, ना गृहमंत्री! असे म्हणत हलकासा पॉझ व श्रोत्यांकडे सहेतूक पाहणे! प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर, एवढ्या दोनच नेमक्या कृतींमधून खासदार संजय राऊत यांचा नेमका आशय श्रोत्यांपर्यंत पोहोचला व सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. लोकमत पत्रकारिता पुरस्कारानिमित्त तब्बल दोन तासांच्या मुलाखतीमध्ये राऊत यांनी राजकीय व्यक्तींवर मारलेल्या अनेक शेरेताशेऱ्यांतून ही मुलाखत रंगतदार झाली. उदयनराजेंनी शिवसेना नावावर हरकत घेतली आहे असे सांगताच उसळून ते म्हणाले, ‘‘वंशज असूनही हरकत घेतली नाही असे ते म्हणतात, वंशज असल्याचे पुरावे त्यांनी आणून दाखवावेत. ते गादीचे वंशज आहेत.

शिवरायांचे नाव असते त्या प्रत्येक गोष्टीबद्दल आम्हाला आदर आहे. त्यांच्या गादीबद्दलही तसाच आदर आहे, मात्र कोणाचा फोटो कोणी कोठे लावला, हे विचारणारे ते कोण? त्यांना करायचे काय त्याचे?’’ ते भाजपचे माजी खासदार आहेत, असे ‘माजी’ शब्दावर जोर देत संजय यांनी त्याच सहेतूक नजरेने श्रोत्यांकडे पाहिले व त्यांना कायम म्हणायचे आहे ते श्रोत्यांना नेमके उमजले व सभागृहात हास्यस्फोट झाला.

मुलाखतीच्या सुरुवातीलाच त्यांनी मी कोणालाच घाबरत नाही, असे म्हणून षटकार लावला व नंतरही अशीच तुफान फटकेबाजी केली. मोदी मेहनती आहेत, मात्र त्यांनी आपल्या आजूबाजूला, आपल्या मंत्र्यांकडे पाहावे असे ते म्हणाले. त्याचबरोबर शहा प्रखर देशभक्त आहेत हे मान्य करायला हवे, मात्र आपल्या देशात लोकशाही आहे हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे या राऊत यांच्या रॅपिड फायरमधील वक्तव्यावर सभागृहात हास्यकल्लोळ उडाला.

शरद पवार जाणते राजे आहेतच असे ठासून सांगत राऊत म्हणाले, की जी व्यक्ती या देशातील शेतकऱ्यांच्या, महिलांच्या, मजुरांच्या समाधानाचा, चांगल्याचा विचार करते ती जाणताच म्हणायला हवे. जाणता राजा त्यांना लोक म्हणतात, ते स्वत:च स्वत:ला तसे म्हणून घेत नाहीत. बाळासाहेब व शरद पवार या दोनच नेत्यांच्या भोवती राज्याचे सगळे राजकारण केंद्रित झाले आहे. मग, त्यांना जाणता राजा का म्हणायचे नाही? सरकारच्या मागे ते खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्यामुळे सरकार आले हे खरे आहे, मात्र या सरकारात पवार हस्तक्षेप करत नाहीत हा माझा अनुभव आहे. तसला रिमोट ते कधीही चालवत नाहीत.

अजित पवारांच्या बंडखोरीबाबत त्यांना विचारणे स्वाभाविक होते. तसे विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘आमच्या गाडीचा एखादा तरी नटबोल्ट ते पळवणार याची खात्री होती, मात्र त्यांनी स्टेपनीच पळवली.’’ त्यानंतरचे सगळे प्रश्न स्टेपनीभोवतीच फिरले. अखेरीस राऊत यांनी स्टेपनी गाडीला नीट लागली. आता गाडी पळते आहे ना, असे म्हणत त्यातून सुटका करून घेतली.

प्रश्न : ‘लोकप्रभा’मध्ये तुम्ही क्राईमस्टोरी करायचात. मुंबईच्या अंडरवर्ल्डचे रिपोर्टिंग करायचात. रमा नाईकच्या अंत्ययात्रेच्या गाडीत तुम्ही चढून बसलात. तिथपर्यंत पोहोचलात कसे?
राऊत : मेलेल्या कशाला, मी जिवंत अंडरवर्ल्डमध्येही वावरायचो. मी रमा नाईकच्या अंत्ययात्रेत गाडीवर चढून बसलो. सध्या त्याला लाईव्ह रिपोर्टिंग म्हणतात. तेव्हा लिखाणात लाईव्ह रिपोर्टिंग असायचे. मुंबई हादरवणारा सगळ्यात मोठा अंडरवर्ल्ड डॉन रमा नाईक याची हत्या झाली. त्याचे एन्काऊंटर संशयास्पद होते, मुंबईत तणाव निर्माण झाला होता. काय होणार, माहीत नव्हते. त्यावेळी ‘लोकप्रभा’ने ठरवले की, यावर कव्हर स्टोरी करायची. पण करणार कोण? दगडीचाळीत जाणार कोण, अशी भीती अनेकांना असायची. भीती आपल्या मनात असते. तुमची हिंमत समोरच्या माणसाने बघितली तर तो पंतप्रधान असेल की गृहमंत्री असू द्या, काही फरक पडत नाही. मी तोंडावर सांगतो, की समोर या. हिम्मत है तो आ जाओ, मैं यहा हूं’ त्यांच्या या वाक्यातील टोला उपस्थितांनी अचूक पकडत दाद दिली. राऊत म्हणाले, ‘माणूस फक्त मृत्यूला आणि तुरुंगाला घाबरतो. मी या दोन गोष्टींना घाबरत नाही.’

विजय दर्डा : सध्या तुमच्या आजूबाजूला कोण खलनायक आहेत?
राऊत : राजकारण असो किंवा कोणतेही क्षेत्र, खलनायक हा समाजाचा भाग आहे. अशा वृत्ती, प्रवृत्ती असल्याही पाहिजेत. (विजय दर्डांना उद्देशून) तुम्हाला कोण वाटते खलनायक।

दर्डा : आम्हाला कोण वाटते ते गौण आहे... आज प्रश्न आमचे, उत्तरे तुमची. कोण खलनायक वाटते?
राऊत : कोणीच नाही. पक्षाच्या बैठका होतात. पक्ष खूष आहे, सत्तेत आहे. सत्तेवाचून जे बाजूला राहिले त्यांना असे वाटते की राऊतांमुळे आम्ही सत्तेत नाही. तोंडाशी आलेला घास गेला की लोक असे बोलतात. पण, राजकारणात, समाजकारणात अशा गोष्टी विसरून जायच्या असतात. दाऊद इब्राहीमलाही दम दिला आहे.

प्रश्न : तुम्ही कशालाच घाबरत नाही म्हणूनच माधव गडकरी यांनी तुम्हाला गुंड असे नाव दिले का?
राऊत : गुंड म्हणवून घेणे कमीपणाचे नाही. ती कामाची पद्धत आहे. मला अजूनही लोक म्हणतात, ये तो गुंडा है...मला त्याचे काही वाईट वाटत नाही. पुत्र व्हावा ऐसा गुंडा! माझी ओळख करुन देताना बाळासाहेब म्हणायचे, हा संजय राऊत! माय फायर ब्रँड एडिटर!
आता काहीच अंडरवर्ल्ड उरलेले नाही. ज्यांनी त्या वेळचा काळ पाहिला, त्यांना शिकागोचे अंडरवर्ल्ड कमी वाटले असते. दाऊद इब्राहीम, छोटा शकील, शरद शेट्टी यांच्या हातामध्ये मुंबई होती. ते ठरवायचे की, मुंबईत काय होणार, कमिशनर कोण होणार. मंत्रालयात कोण बसणार, हाजी मस्तानला घ्यायला अख्खे मंत्रालय खाली यायचे, ही मी पाहिले आहे. करीम लालाला भेटायला स्वत: इंदिरा गांधी जायच्या. आता किरकोळ लोक राहिले आहेत. दाऊद इब्राहिमला मी अनेकदा पाहिले आहे, बोललो आहे. त्याला दमसुध्दा दिला आहे.’ यावेळी उपस्थितांमधून कोणीतरी ‘शंभर दाऊद, एक राऊत’ अशी आरोळी ठोकली.

प्रश्न : तुम्ही बाळासाहेबांची एक मुलाखत घेतली होती. ती मुलाखत त्यांनी दिलेल्या शिव्यांसह छापून आली होती. तो काय प्रसंग होता?
राऊत : बाळासाहेब हे माझे सर्वस्व हे काही लपून राहिलेले नाही. पत्रकारितेत मी
आलो, स्थिरावलो ते त्यांच्यामुळेच. मी सगळे काही शिकावे, असे त्यांना वाटायचे. एक्स्प्रेसमध्ये गेल्यावर त्यांना वाटायचे मी त्यांच्यापासून दूर गेलो. माझ्यावरच टीका करतोय. पण, पत्रकारितेत जवळच्या माणसावरही कधी कधी ओरखडे मारावे लागतात. बाळासाहेबांची मुलाखत घ्यायला गेलो तेव्हा ते खूप चिडले, पण चांगली मुलाखतही दिली. तुम्हाला उत्तम मुलाखत करायची असेल तर समोरच्याला चिडवता आले पाहिजे. तेव्हा तो सत्य, छान आणि मस्त बोलतो. सिनेमाध्ये खलनायक कशासाठी लागतो? आपल्या आजूबाजूला असे लोक पाहिजेत. माझ्यासारखे मारामारीचे प्लॅनिंग कोणीच करू शकत नाही

प्रश्न : ‘तुम्ही बाळासाहेब ठाकरेंपासून आदित्य ठाकरेंपर्यंतचा प्रवास पाहिला आहे. तुम्ही बी-कॉम करुन पत्रकारितेत आलात. तुमचा प्रवास खूप विलक्षण आहे. काय सांगाल?’
राऊत : ‘अहो, मी नीट शिकलोच नाही. मी उत्तम मारामाºया करायचो म्हणून बाळासाहेबांचे माझ्यावर लक्ष असायचे. मारामारीचे प्लॅनिंग माझ्यासारखे कोणीच करू शकत नाही. या शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळातील गोष्टी मी सांगतो आहे. तो आमचा यूएसपी होता. त्याला आताच्या भाषेत चळवळ म्हणतात. जेएनयूमध्ये जे चालते त्यालाही चळवळ म्हणतात.’

सोनिया गांधींना सीएएमधून बाहेर काढणार का?
प्रश्न : बाळासाहेब ठाकरे किंवा तुम्ही ‘सामना’मधून सोनिया गांधी यांचा उल्लेख ‘इटालियन बाई’ असा केला. आज त्या
सहयोगी पक्षाच्या नेत्या आहेत, तर तुमच्या वागण्यात किंवा त्यांच्या विचारात बदल झाला का?

राऊत : हा प्रश्न तुम्ही आम्हाला विचारत आहात, पण या मुद्यावर शरद पवार यांनी अख्खा पक्ष स्थापन केला. हो, आम्ही टीका केली. आता काळाच्या ओघात अनेक विषय वाहून घेतले आहेत. त्या आज ७० वर्षांच्या आहेत. भारतीय जनता पक्षानेही अशी टीका केली होती. त्यादेखील देशाच्या नागरिक आहेत. तुम्ही त्यांना काय ‘सीएए’मधून बाहेर काढणार का? आता आम्ही सगळ्यांनी मान्य केले आहे, की त्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आहेत. त्या नेतृत्व करीत आहेत. राष्ट्रीय विषयांवर त्यांनी भूमिका घेतल्या आहेत. आम्ही या कायद्यानुसार त्यांना बाहेर काढतो असे म्हणाल का? हा परदेशी पक्ष नाही. स्वातंत्र्यलढ्यासाठी निर्माण झालेला पक्ष आहे. तेव्हा काय भाजप होता काय? किंवा आम्ही होतो का? काँग्रेस पक्ष हा स्वातंत्र्यचळवळीची ठिणगी आहे. त्यांना नाकारून चालणार नाही. काँग्रेसला वगळून देशाचा इतिहास लिहिला जाऊ शकत नाही.

विद्यार्थ्यांचे रक्त सांडणे म्हणजे लोकशाही धोक्यात
प्रश्न : मघाशी तुम्ही जेएनयूचा मुददा उपस्थित केलात. दीपिका पदुकोण विद्यार्थ्यांना भेटून गेली. गांधीजींच्या मार्गाने काही
बोलल्या नाहीत. त्यावरून तिला ट्रोल केले गेले. ज्या शिवसेनेवर मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार विश्वास ठेवतात. पण अशा मुद्यांवर हिंदी चित्रपट क्षेत्रातले कलाकार रिअ‍ॅक्ट होतात. पण मराठी कलाकार भूमिका घेताना दिसत नाहीत. एक पत्रकार किंवा संपादक या नात्याने काय वाटते?
राऊत : भूमिका घ्यायला पाहिजेत. जे मूळ लोक आहेत ते दाक्षिणात्य आहेत. राष्ट्रीयस्तरावर काम करायचे म्हणजे दडपण येते. एकटी दीपिका पदुकोण गेली. इतर कुणी कुठे काँग्रेस-राष्टÑवादी पाकिस्तानातले पक्ष आहेत का?

प्रश्न : त्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस तुमच्यासोबत आले...
राऊत : काँग्रेस, राष्ट्रवादी हे पाकिस्तानातील पक्ष आहेत का? ते महाराष्ट्रातल्या मातीतले पक्ष आहेत. राजकीय मतभेद असू शकतात. मात्र प्रत्येक पक्ष, नेता राष्ट्रावर प्रेम करणारा असतो. शरद पवारांवर माझी प्रचंड श्रद्धा आणि विश्वास

प्रश्न : उद्धव ठाकरेंपेक्षा तुम्ही शरद पवारांच्या जास्त जवळचे आहात, असे म्हटले जाते. सर्वांना कळले तरी पाहिजे.
राऊत : शरद पवार यांच्याशी संबंध, संपर्क असणे गैर नाही. त्यांच्यावर माझी प्रचंड श्रद्धा आणि विश्वास आहे. बाळासाहेब आणि पवार हे दोन नेते असे आहेत, ज्यांचा जनमानसावर कायम प्रभाव आणि पगडा राहिला आहे. हे दोन नेते महाराष्ट्रात परिवर्तन घडवू शकतील, ही माझी कायमची भूमिका राहिली आहे. आताचे महाराष्ट्रातील सरकारलाही कोणी खिचडी म्हणत नाही. लोक याला सरकार म्हणतात. शरद पवार यांनी सरकार बनवले होते तेव्हा लोक त्याला पुलोदची खिचडी म्हणत असत. पण, सध्याच्या सरकारचे नेतृत्व उद्धव ठाकरे करताहेत आणि पाठीशी शरद पवार ठामपणे उभे आहेत.

भाजप शब्द पाळणार नाही हे मला आधीच माहिती होते
प्रश्न : निकाल लागण्याआधीच बाळ जन्माना घालायचे असे ठरवले होते का? शब्द देणे, पाळणे वगैरे सर्व खोटे होते का?

राऊत : असे म्हणू शकता... ते शब्द पाळणार नाहीत, हे मला आधीच माहीत होते. निकाल भाजपच्या सोयीने लागले. महाराष्ट्रातही उत्तम यश मिळाले. देशात ३०० हून अधिक जागा जिंकून मोदी पंतप्रधान झाले, याचाही आनंद झाला. मात्र, राजकारणात एक स्वभाव असतो. तुझे ते माझे तुझ्या बापाचे तेही माझे. विधानसभा जागावाटपावेळी अनेक गोष्टी घडत गेल्या. मी विश्लेषण करत होतो. तेव्हाच, हे लोक नंतर गडबड करणार, याची कुणकुण हळूहळू लागू लागली. त्यातून हे नवे सरकार स्थापन झाले.

हे सरकार टेस्ट ट्यूब बेबी नव्हे; पूर्ण वाढ झालेले बाळ
प्रश्न : काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कचाट्यात शिवसेनेचे भवितव्य काय?

राऊत : कोणीही कोणाच्या कचाट्यात येऊन सरकार बनले नाही. महाराष्ट्राला वेगळी दिशा देणे, हे तीन पक्षांची बैठक घेऊन ठरवले. सर्वांत प्रथम शरद पवारांनी हे ठरवले. मी त्यांना भेटायला गेलो होतो. हे सरकार म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी नव्हे. पूर्ण वाढ झालेले हे बाळ आहे, त्याचे बारसे झाले आहे. त्याचा वाढदिवस होईल, सर्व सोहळे होतील.

सरकार पूर्ण पाच वर्षे टिकेल
प्रश्न : हे सरकार किती वर्षे टिकवायचे, असे दोन काकांनी ठरवले आहे. एक राजेश खन्नाची उपमा मिळालेले तुम्ही आणि दुसरे पवार काका...
राऊत : सरकार बनवण्याच्या प्रक्रियेत अनेक लोक एकत्र येऊन चर्चा करत होते. हे सरकार बनवायचे, टिकवायचे आणि सरकार आदर्श पद्धतीने चालवायचे, असे शरद पवार यांचे विधान होते. विरोधी पक्षाला वाटत असेल की, सरकार टिकणार नाही. जनतेत सरकारबद्दल सकारात्मक भावना आहेत. शंभर दिवस, मग पाचशे दिवस असे कोणते सोहळे करायचे ते आम्ही ठरवले आहे. सरकार पूर्ण पाच वर्षे टिकेल. आत्ताच बारसे झाले आहे, लग्नाचा विचार कशाला करायचा?

हे सरकार म्हणजे सुपरहिट सिनेमा, चालला पाहिजे
विजय दर्डा : हे सरकार म्हणजे सिनेमा आहे का? कसा निर्माण झाला?
राऊत : हा सुपरहिट सिनेमा आहे. सिनेमा चालला पाहिजे, तो सुपरहिट झाला पाहिजे. सरकार ही कलाकृती. हे शिल्प घडवण्यात अनेकांचे योगदान आहे. कदाचित भाजपचे लोकांचेही त्यात योगदान असेल. एक कलाकृती घडवताना अनेकांचा हातभार लागतो. आम्ही उत्तम कलाकृती तयार केली आहे. त्याला नाटक म्हणा, चित्रपट म्हणा. सरकार हा समाजाभिमुख सिनेमा आहे. प्रत्येक घटकाने आस्वाद घ्यावा आणि टाळी वाजवावी. कॉँग्रेसची पाळेमुळे राज्यात रुजलेली, दिल्लीतील नेत्यांनी लक्ष घातले असते तर आणखी पुढे गेली असती

प्रश्न : शरद पवारांचा राष्ट्रवादी किंवा उद्धव ठाकरेंचा शिवसेना स्वबळावर राज्यात सरकार बनवू शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे, याचे कारण काय?
राऊत : इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती, सामाजिक आणि राजकीय परंपरा वेगळी आहे. महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. देशात इतरत्र काँग्रेस पराभूत झाला तरी महाराष्ट्रात कायम राहील, असे मी कायम म्हणतो. कारण, पक्षाची पाळेमुळे येथे खोलवर रुजलेली आहेत. शरद पवारांचा पक्ष राष्ट्रवादी असला, तरी तो काँग्रेसच आहे. पक्ष, संघटना, माणसे आणि जिल्हास्तरावर मजबूत नेते महाराष्ट्रात आहेत. बाळासाहेबांसारखा महान नेता असतानाही शिवसेनेला बहुमत मिळाले नाही. राजकीय यश मिळविण्यासाठी त्यांना भाजपबरोबर युती करावी लागली. महाराष्ट्रात प्रादेशिक पक्ष जास्त झाले आहेत. प्रत्येक जण आपापला वाटा घेत असतो. दिल्लीतील नेत्यांनी थोडे लक्ष घातले असते तर काँग्रेस अजून पुढे गेली असती.

मंत्रिमंडळातील सर्वच खाती महत्त्वाची
प्रश्न : सत्तेत आल्यावर समान वागणूक मिळायला हवी होती. खातेवाटप समान झाले नाही. राष्ट्रवादीने सर्व महत्त्वाची खाती त्यांच्याकडे ठेवली आहेत. संख्येने त्यांची मंत्रिपदे जास्त आहेत. तुलनेने शिवसेनेकडे मंत्रिपदे कमी महत्त्वाची आहेत.

राऊत : हा पूर्ण गैैरसमज आहे. आमदारांच्या संख्येनुसार, खातेवाटप बैठकीत ठरले. पृथ्वीराज चव्हाण यांनी सगळी आकडेमोड केली. आम्ही आकडे लावत असलो, तरी आम्हाला आकडे कळत नाहीत. केंद्र अथवा राज्य सरकारमधील प्रत्येक खाते लोकांसाठी, राज्यासाठी महत्त्वाचे. कोणतेही खाते कमी महत्त्वाचे नाही. सरकार प्रत्येक घटक मिळून चालते. शिक्षण, उच्च शिक्षण, वन, मराठी भाषा विभाग ही सध्या सर्वांत महत्त्वाची आहेत. सरकार आमचेच आहे. त्यामुळे कोणाला कोणतेही खाते दिले तरी काय फरक पडतो. मुख्यमंत्री बॉस असतो, तिन्ही पक्षांचा नेता असतो. कोणतेही संपादक असे म्हणतात का, की हा क्राईम रिपोर्टर माझा नाही, तो माझा आहे.

उद्धवजींनी मुख्यमंत्रिपद स्वीकारण्याचे ११ नोव्हेंबरलाच ठरले
प्रश्न : ११ नोव्हेंबरची तारीख होती. त्याच दिवशी आपण अ‍ॅडमिट झालात. त्याआधी एक मीटिंग झाली. त्यावेळी शरद पवार, सुनील तटकरे, अजित पवार असे अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. तेव्हा, पवारांनी सांगितले, की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार असतील तरच आपण पुढे जाऊ. आपण मातोश्रीवर गेलात, पवार आणि इतर लोक वायबी चव्हाण सेंटरकडे गेले. थोड्या वेळाने तुम्ही त्यांना फोन करून सांगितले, की उद्धवजी मुख्यमंत्रिपद घ्यायला तयार आहेत. २२ तारखेला नेहरू सेंटरमधील बैठक फिसकटली. त्यावेळी बाहेर येऊन शरद पवारांनी सांगितले, की आजच्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव तिन्ही पक्षांनी मिळून ठरवले आहे.

या गोष्टीला एवढे दिवस का लागले? ११ तारखेला ठरलेली गोष्ट २२ तारखेला जाहीर का केली?
राऊत : फार काळ लागला, असे मला वाटत नाही. मी उद्धव ठाकरेंना जवळून ओळखतो. कोणतेही शासकीय पद न स्वीकारण्याची भूमिका ठाकरे कुटुंबाने घेतली आहे. ११ तारखेच्या आधीही प्रत्येक वेळी मी सांगत आलो, की उद्धव ठाकरे हेच आमचे मुख्यमंत्री होतील. बैठकीत आम्हाला विचारले, की मुख्यमंत्री कोण होईल? आम्ही सांगितले, की या परिस्थितीत राज्याचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहील. ११ तारखेच्या बैठकीला उद्धव ठाकरेही हजर होते आणि ती निर्णायक बैठक होती. शरद पवार यांना बाहेर सोडायला आल्यावर ते म्हटले, की नेतृत्व कोण करणार? मी म्हटले, हा प्रश्नच येत नाही. आम्ही उद्धवजींना तयार करू. हे सरकार आणायचे असेल, टिकवायचे असेल तर उद्धव ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नाही, असे आम्ही सांगितले.

Web Title: 'Our Government is a' superheat 'cinema; I'm not afraid of anyone, if you dare, come out Says Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.