बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचे क्षेत्र; राज्यात ढगाळ वातावरण, तापमानात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 04:05 AM2020-11-29T04:05:49+5:302020-11-29T04:05:49+5:30
पुणे : निवार चक्रीवादळ निवळल्यानंतर बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे तामिळनाडू, पाँडेचरी व ...
पुणे : निवार चक्रीवादळ निवळल्यानंतर बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे तामिळनाडू, पाँडेचरी व दक्षिणेत १ ते ३ डिसेंबरदरम्यान जोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात शनिवारी सर्वत्र ढगाळ वातावरण असून तापमानात वाढ झाली आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान वाशिम येथे १४.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.
गेल्या २४ तासांत विदर्भातील देऊळगाव राजा, रामटेक, दारव्हा, पौनी, पेंद्रा तसेच मध्य महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर परिसरात हलका पाऊस झाला.
मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागात लक्षणीय वाढ झाली आहे. २९ नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.