Corona virus : प्रतिकारशक्ती वाढवा; कोरोनाला हरवा !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 04:00 PM2020-03-18T16:00:25+5:302020-03-18T16:04:18+5:30

कोरोनाचा विषाणू शरीरात शिरला, की तो प्रतिकारशक्तीवर हल्ला करतो व शरीराला नामोहरम करतो.

Corona virus : Increase immunity; Defeat Corona! | Corona virus : प्रतिकारशक्ती वाढवा; कोरोनाला हरवा !

Corona virus : प्रतिकारशक्ती वाढवा; कोरोनाला हरवा !

googlenewsNext
ठळक मुद्देडॉक्टरांचा सल्ला : फळे, पालेभाज्या आणि हवी व्यवस्थित झोपकोणतेही औषध न घेता विषाणूंना निष्प्रभ करण्याची शरीराची शक्ती.

पुणे : ‘कोरोनाचा धसका बसला असला, तरी काळजी करायचे कारण नाही. तुमची प्रतिकारशक्ती चांगली असेल, तर कोरोनाच काय, कोणताही साथीचा आजार तुमच्यासमोर टिकणारच नाही,’ असा विश्वास ‘प्रतिकारशक्ती’ या विषयावर आयुर्वेदिक व अ‍ॅलोपथी या दोन्ही वैद्यकीय उपचार पद्धतींमधील डॉक्टरांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला. ‘भारतीय आहार घ्या व नीट झोप घ्या अशा दोनच गोष्टी करा; तुमची प्रतिकारशक्ती वाढेल,’ असे या डॉक्टरांचे म्हणणे आहे.
कोरोनाचा विषाणू शरीरात शिरला, की तो प्रतिकारशक्तीवर हल्ला करतो व शरीराला नामोहरम करतो. प्रतिकारशक्ती चांगली असेल, तर कोरोनाच्या विषाणूने विशेष फरक पडणार नाही, असे कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून सातत्याने सांगण्यात येत आहे. ही प्रतिकारशक्ती म्हणजे काय? याविषयी काही डॉक्टरांबरोबर संवाद साधला असता त्यांनी भारतीय आहार पद्धतीचे महत्त्व उलगडून दाखविले. गेल्या काही वर्षांत घराबाहेरच्या खाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे शरीरातील मेदाचे प्रमाण वाढून प्रतिकारशक्ती कमी होत चालली असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदविले. विशेष म्हणजे, आयुर्वेदिक व अ‍ॅलोपथी या दोन्ही उपचार पद्धतींमधील डॉक्टरांचे एरवी औषधोपचारांबाबत मतभेद असले, तरी याविषयी मात्र एकमत आहे. 
इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) माजी अध्यक्ष डॉ. मोहन जोशी म्हणाले, ‘‘प्रतिकारशक्ती म्हणजे शरीरात बाहेरून प्रवेश करणाºया विषाणू किंवा अन्य कोणत्याही गोष्टींना प्रतिकार करण्याची शरीरांतर्गत क्षमता. ती काही जन्मजात नसते. ती कमी-जास्त होते; मात्र त्याला ती व्यक्तीच कारणीभूत असते. अतिश्रम, आहार वेळेवर नसणे, चुकीचा म्हणजे अती तिखट- अती तेलकट असा असणे, त्यात बदल न करणे, झोप पुरेशी न घेणे या सगळ्या गोष्टी प्रतिकारशक्ती कमी करण्यास कारणीभूत ठरतात. असे केले नाही, तर प्रतिकारशक्ती निश्चितपणे वाढते. 
मोसमी फळे, पोळी-भाजी, त्यातही पालेभाज्या व ताक, असा आहार आणि पुरेशी झोप घेतली, तर प्रतिकाराच्या क्षमतेत वाढ होते व असा किमान साथीचा म्हणजे संसर्गजन्य आजार तरी त्वरित होणार नाही.’’
आयएमएच्याच पदाधिकारी पद्मा अय्यर म्हणाल्या, ‘‘प्रतिकारशक्ती म्हणजे शरीरातील वेगवेगळी प्रथिने (प्रोटिन), कर्बोदके (कार्बोहायड्रेड), जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन)  यांचे प्रमाण व्यवस्थित असणे. ते नीट असले तर प्रतिकारशक्ती चांगली असते व त्यामुळे शरीर कोणत्याही विषाणूचा सक्षमपणे प्रतिकार करू शकते.
ताज्या फळांचा रस किंवा ती खाल्ली तरीही प्रतिकारशक्तीत वाढ होते. मात्र, आपण फळे खात नाही. थंड झालेले अन्न प्रतिकारशक्तीचा ऱ्हास करीत असते. गरम अन्न खाल्ले, तर त्यातील सर्व घटक शरीराला मिळतात. या सर्व गोष्टींच्या जोडीला व्यायामही हवा. तो नियमित असला तर चांगलेच.’’
.............
* प्रतिकारशक्ती म्हणजे काय?
श्वास किंवा घशावाटे शरीरात येणाऱ्या बाहेरच्या विषाणूंना प्रतिकार करण्याची शरीराची क्षमता
शरीरावर आघात करणाऱ्या या विषाणूंना शरीरात आधीच असलेल्या पेशी निष्प्रभ करतात
विषाणूंचा हल्ला बराच वेळ चालला तरीही त्यांच्यासमोर टिकाव धरण्याची शरीरातंर्गत क्षमता 
कोणतेही औषध न घेता विषाणूंना निष्प्रभ करण्याची शरीराची शक्ती.
..........
* प्रतिकारशक्ती कशी वाढवायची?
हंगामातील ताजी फळे खाणे किंवा त्यांचा रस पिणे.
पालेभाज्यांचा रोजच्या आहारात समावेश करणे.
जेवणातील सर्व पदार्थ ताजे व गरम खाणे.
जेवणाच्या वेळांचे पालन करणे.
मोकळ्या, शुद्ध हवेत नियमित व्यायाम करणे.
प्राणायामाद्वारे फुप्फुसातील शक्ती वाढवणे
किमान सहा तासांची शांत झोप घेणे.
प्रतिकारशक्ती कमी कधी होते?
शिळे व थंड झालेले अन्न खाणे.
तळलेले, तिखट पदार्थ सातत्याने खाणे.
फ्रिजमधील पदार्थांचे नियमित सेवन करणे.
फळांमधून मिळणाºया जीवनसत्त्वांची कमतरता.
पालेभाज्या, कडधान्ये यातून मिळणाऱ्या प्रथिनांचा अभाव.
पुरेशी झोप न होणे.
.........
आयुर्वेदात प्रतिकारशक्तीबाबत बरेच काही आहे. आहार, विहार, निद्रा अशा अनेक गोष्टींबाबत बारकाईने सांगितले आहे. त्या-त्या मोसमातील फळे, भाज्या आहारात ठेवल्या तरीही फार मोठा फरक पडतो. रोज किमान सहा तासांची झोप आवश्यक आहे. नोकरी, उद्योग-व्यवसाय व एकूणच जगण्याच्या लढाईत नेमके चांगले जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींकडेच आपण दुर्लक्ष करतो. त्यातून प्रतिकारशक्ती कमी होते व आजारांचा सामना करावा लागतो. कोरोनाला जिंकायचा असेल, तर खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. - वैद्य सुभाष शितोळे.
............
* उन्हामध्ये उभे राहा .. 
सूर्यप्रकाशात उभे राहिल्यास ते शरीरासाठी रोगनिवारणाचे काम करते. शरीर आणि त्वचेला सूर्यप्रकाश आजारांपासून दूर ठेवतो. नियमित सूर्यप्रकाशात गेल्यास शरीरात पांढºया पेशींची वाढ होते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि तुम्ही निरोगी राहता. रक्तप्रवाह देखील चांगला होतो. 

.....................................

* या गोष्टी नियमित करा 
किचनमध्ये हळद, आद्रक, लसूण, लवंग, इलायची आदींचे सेवन करा. त्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते. तुळशीचाही वापर करावा. 
कडुनिंब हा आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे. कडुनिंबाच्या झाडाखाली बसले तरी तुमचे आरोग्य चांगले राहील. 

Web Title: Corona virus : Increase immunity; Defeat Corona!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.