उत्तर प्रदेशात योगींचे स्थान धोक्यात? २०२२ मध्ये भाजपाचा चेहरा कोण असेल; उपमुख्यमंत्र्यांनी दिले असे संकेत, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 05:27 PM2021-06-13T17:27:29+5:302021-06-13T17:27:56+5:30
Uttar Pradesh Politics: २०२२ मध्ये भाजपा कोणाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार याबाबत अद्याप अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी सूचक संकेत दिले आहे.
लखनौ - पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमुळे उत्तर प्रदेशमधील राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपानेही (BJP) राज्यातील आपली सत्ता टिकवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र २०२२ मध्ये भाजपा कोणाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार याबाबत अद्याप अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. (Uttar Pradesh Assembly Election 2022) या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी सूचक संकेत दिले आहे. २०२२ ची निवडणूक कुणाच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार याबाबतचा अंतिम निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल, असे केशव प्रसाद मौर्य यांनी म्हटले आहे. (Yogi Adityanaths' place in Uttar Pradesh in danger? Who will be the face of BJP in 2022; The hints given by the Deputy Chief Minister KP Maurya)
आज तक या हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केशव प्रसाद मौर्य नेतृत्वाच्या विषयावर माहिती देताना म्हणाले की, २०२२ मध्ये पक्षाचे नेतृत्व कोण करेल, कुणाच्या नेतृत्वात निवडणुका लढवल्या जातील. हा माझा विषय नाही आहे. तर तो केंद्रीय नेतृत्वाचा विषय आहे. ज्या चर्चांना तुम्ही मंथन वगैरे नाव देत आहात त्या नियमित चर्चा आहे. आता प्रसारमाध्यमे आपले तर्कवितर्क लढवण्यासाठी स्वतंत्र आहेत.
दरम्यान, ओबीसी पक्षांच्या मुद्द्यांवर केशव प्रसार मौर्य म्हणाले की, ओबीसी समुदाय पक्षावर नाराज नाही आहे. जर अनुप्रिया पटेल, संजय निषाद किंवा निषाद पक्षाबाबत बोलायचे झाल्यास ते आमचे मित्र पक्ष आहेत. आधीपासून आमच्याबरोबर आहेत. आता गरज भासली तर आम्ही अजून पक्षांना सोबत घेऊ.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांना समजवण्याचा आणि सोडून गेलेल्या जुन्या सहकाऱ्यांना पुन्हा सोबत आणण्याचा प्रयत्न भाजपाने सुरू केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी नुकतीच अनुप्रिया पटेल आणि निषाद पार्टीचे प्रमुख संजय निषाद यांच्यासोबत चर्चा केली होती. तसेच सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष ओपी राजभर यांच्यासाठीही आघाडीचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार भाजपाला जो फिडबॅक मिळाला आहे त्यानुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील अव्यवस्थेचे आरोप आणि आमदार-खासदारांविरोधात असलेल्या नाराजीमुळे पक्षाला गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. भाजपाच्या मतांच्या टक्केवारीतही घट होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये पक्षाची सत्ता पुन्हा कशी येईल याबाबत विचार करण्यासाठी लखनौपासून दिल्लीपर्यंत नेत्यांची चर्चा सुरू आहे.